पिण्याच्या पाण्याची समस्या, वाढत्या प्रदूषणामुळे खालावत चाललेले आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंची कमतरता त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांचे स्थलांतर वाढू लागले आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या, वाढत्या प्रदूषणामुळे खालावत चाललेले आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंची कमतरता त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांचे स्थलांतर वाढू लागले आहे. त्यामुळे गावे ओस पडत आहेत. शहरातील लोकसंख्या वाढल्यामुळे तेथील नागरी सुविधांवर ताण पडतो आहे. रोजगाराच्या शोधात, मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी कुटुंबे शहराकडे स्थलांतर करत आहे. अशीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातही निर्माण झाली आहे.
२६ लाख ३५ हजार लोकसंख्या असलेल्या रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांची सरासरी सातत्याने कमी होत आहे. ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची टंचाई, वीज, वाहतुकीच्या असुविधा यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी मोठय़ा प्रमाणात शहरांकडे स्थलांतर करत असल्याचे जिल्हा सांखिकी विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
सन २००१ च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात १६ लाख ७३ हजार लोकसंख्या होती. जन्म-मृत्यू दराचे प्रमाण लक्षात घेता यात वाढ होणे क्रमप्राप्त होते. मात्र या सरासरीमध्ये २०११ च्या जनगणननेत घट झाली असून १६ लाख ६३ हजार इतकेच नागरिक रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहत असल्याचे आढळून आले. त्यानंतरच्या पुढील दोन वर्षात यात सातत्याने घट होत आहे.
पावसावर अवलंबून असलेल्या शेतीतील अनिश्चिततेचे कारण स्थलांतरामागे कारणीभूत असल्याचे अनेकांचे ग्रामीण भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. डोंगरद-यांमध्ये राहणा-या नागरिकांचे स्थलांतर करणा-यांमध्ये प्रमाण जास्त आहे. पावसाच्या पाण्यावरील शेती हेच येथील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. खालापूर, कर्जत, सुधागड-पाली, रोहा पोलादपूर येथील अनेक डोंगराळ भागातील वाडयांपर्यंत अद्याप रस्ते पोहोचलेले नाहीत.
पाणीपुरवठा योजना असली तरी बाराही महिने पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही. अशा वेळेला शेती आणि गुरा-ढोरांसाठी पाणी पुरवणे शक्यच नसते. येथील अनेक वाडया सरकारच्या विकास आराखडयांमध्ये आलेल्या नाहीत. गाव तेथे शाळा चालवण्याचे सरकारचे धोरण असले तरी चौथीनंतरच्या शिक्षणासाठी येथील मुलांना पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत दारिद्रयात खितपत पडलेले ग्रामीण भागातील रहिवासी जवळच्या शहरांकडे स्थलांतर करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.