महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक मार्गाने या विषयावर काम सुरू आहे. यासाठी जनजागृती व्हावी या हेतूने स्टार प्रवाह या वाहिनीने एका विशेष अशा पाण्याच्या भारुडाचे सादरीकरण नुकतेच केले.
मुंबई- महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक मार्गाने या विषयावर काम सुरू आहे. यासाठी जनजागृती व्हावी या हेतूने स्टार प्रवाह या वाहिनीने एका विशेष अशा पाण्याच्या भारुडाचे सादरीकरण नुकतेच केले. स्टार प्रवाह रत्न या त्यांच्या कार्यक्रमात हे भारूड सादर करण्यात आले असून ते महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड हिने गायले आहे. हा कार्यक्रम आपण गुढीपाडव्याच्या दिवशी स्टार प्रवाह वाहिनीवर पाहू शकणार आहोत.
या भारुडालाही लिक्विड भारूड असे नाव देण्यात आले असून यातून नर्म विनोदांच्या सहाय्याने लोकांना पाण्याचे, त्याच्या नियोजनाचे व जलस्त्रोताच्या संवर्धनाचे महत्त्व विशद करण्यात येणार आहे. पाणी जपून वापरावे, असा संदेश या भारुडातून देण्यात आला असून या भारुडाचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे. कार्तिकी गायकवाड हिच्या बरोबरीनेच या भारुडाच्या सादरीकरणात प्रियदर्शन जाधव व अनिता दाते यांचाही सहभाग असणार आहे. या भारुडाला सत्यजीत प्रभू यांनी संगीत दिले आहे.
स्टार प्रवाह रत्न या कार्यक्रमात या भारुडाचे सादरीकरण करण्यात आले असून या कार्यक्रमात मराठी करमणूक विश्वातल्या दिग्गजांच्या स्टार प्रवाह रत्न या पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष असून यात अशोक सराफ, सुबोध भावे, शंकर महादेवन, महेश काळे, महेश मांजरेकर आदींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांचा नव्या वर्षाचा आनंद अधिक वाढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख जयेश पाटील यांनी सांगितले आहे. हा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.