घरगुती हिंसाचाराचा आरोप असलेले दिल्लीचे माजी कायदा मंत्री आणि मालवीया नगरचे आमदार सोमनाथ भारती बुधवारी स्वत:हून दिल्ली पोलिसांना शरण गेले.
नवी दिल्ली – घरगुती हिंसाचाराचा आरोप असलेले दिल्लीचे माजी कायदा मंत्री आणि मालवीया नगरचे आमदार सोमनाथ भारती बुधवारी स्वत:हून दिल्ली पोलिसांना शरण गेले.
भारती यांच्यावर त्यांच्या पत्नीने छळ केल्याचा आरोप केला असून, या प्रकरणी त्यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तपासासाठी सोमनाथ भारती स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाले.
भारती यांनी अटकपूर्व जामिनीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने भारती यांच्या अटकेला १७ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिलेली असतानाही भारती स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाले.
या मुद्यावर रात्री उशिरापर्यंत त्यांची आपच्या नेत्यांबरोबर चर्चा झाली. आपने भारतींना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. बनावट पदवी प्रकरणात दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर, मनोज कुमार, सुरींदर सिंह यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आता भारती यांना अटक झाली तर, मागच्या चार महिन्यात अटक होणारे ते आपचे चौथे आमदार असतील.