सेफ्टी झोन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उरण तालुक्यातील एन.ए.डी. सुरक्षा पट्ट्यातील बाधीत ग्रामस्थांन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला
अलिबाग – सेफ्टी झोन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उरण तालुक्यातील एन.ए.डी. सुरक्षा पट्ट्यातील बाधीत ग्रामस्थांन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. हिराकोट तलावाच्या समोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना आपले निवेदन सादर केले.
उरण तालुक्यातील बोरी, पाखाडी, केगांव, रानवड, हातवली, नागांव, उरण ही गावे या सेफ्टी झोनमध्ये बाधीत झाली आहेत. या गावातील घरे आणि जमिनी सेफ्टी झोनमध्ये समाविष्ट होत असल्याने येथील ग्रामस्थांवर टांगती तलवार आहे. हा सेफ्टी झोन रद्द करावा आणि घरे वाचवावी यासाठी घर व जमीन बचाव समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष महेश महादेव म्हात्रे आणि सचिव संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हिराकोट तलावासमोर पोलिसांनी मोर्चा अडविला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. महेश म्हात्रे, संतोष पवार, प्रशांत पाटील आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या कारवाईमुळे बोरी, पाखाडी, केगांव, रानवड, म्हातवली, नागांव, मोरा आदी गावातील सुमोर ४ हजार ५०० घरे या सेफ्टी झोनमुळे धोक्यात आली आहेत. येथे राहत असलेल्या जवळपास ३५ हजार नागरीकांचा निवा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सेफ्टी झोन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सेफ्टी झोनमध्ये शहरातील १० शाळा, ५ ज्युनिअर कॉलेज,१ सिनिअर कॉलेज, सरकारी हॉस्पिटल, उरणच्या दिवाणी न्यायालयाची इमारत, नगरपरिषद कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती कार्यालय, तालुका भूमिअभिालेख कार्यालय, वनविभागाचे कार्यालय, केगांव, नागांव, भातवली ग्रामपंचायत तेथील घरे, इमारती यामध्ये बाधीत झाले आहेत. त्यामुळे या बाबत उच्च न्यायालयाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा, असे या निवेदनात म्हटले आहे.