आघाडीच्या कंपन्यांनी समभागांची खरेदी केल्याने सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने ८६ अंकांनी उसळी घेतली.
मुंबई – आघाडीच्या कंपन्यांनी समभागांची खरेदी केल्याने सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने ८६ अंकांनी उसळी घेतली. निफ्टी निर्देशांकही २८ अंकांनी वधारला. आशियाई बाजारांत मजबुती दिसल्याने बाजारात उत्साह संचारला होता. सेन्सेक्स २४,८०४.२६ वर तर निफ्टी निर्देशांक ७,५३८.७५ वर बंद झाला.
५० कंपन्यांच्या निफ्टी बाजारात आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि वेदांता यांचे समभाग १.८८ ते ३.३८ टक्क्यादरम्यान वधारले. तर कोटक महिंद्रा बँक, एम अँड एम, आयडिया सेल्युलर, सन फार्मा आणि टीसीएसचे समभाग मूल्य घसरले. बँक ऑफ जपान आणि फेडरल रिझव्र्ह बँक धोरणात्मक आढावा जाहीर करण्याच्या काही दिवस अगोदर सलग तिस-या दिवशी आशियाई व युरोपियन बाजारपेठांनी उत्साहात आगेकूच केली.
सर्वाधिक फायदा आयसीआयसीआय बँकेचा झाला. तिचे समभाग ३.७० टक्क्यांनी वधारले. तर टाटा मोटर्सचे समभाग ३.३६ टक्क्यांनी वधारले. सेन्सेक्सची सुरुवात उच्च पातळीवरूनच झाली होती. २४,९६० वर गेला होता. परंतु त्याची घसरण सुरू झाली. अखेर २४,८०४.२८ वर स्थिरावला.