रत्नागिरी विधानसभेच्या निकालानंतर रत्नागिरीत सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली.
रत्नागिरी- रत्नागिरी विधानसभेच्या निकालानंतर रत्नागिरीत सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. रत्नागिरीतून शिवसेनेने विजय मिळवताच शिवसेनेतील सामंत समर्थकांनी भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा बाईंग यांच्या कार्यालयासमोरच घोषणाबाजी करीत फटाके फोडले. सामंत समर्थकांच्या या कृत्याने संतापलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हंगामा झाला.
पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झालेल्या भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये राडा झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी रविवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांनी प्रत्येक फेरीत मताधिक्य घेतल्यानंतर शिवसनेनेच्या गोटात विजयोत्सव सुरू झाला. सतराव्या फेरीअंती मताधिक्य वाढून २५ हजारांवर पोहोचल्यानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी मतमोजणीच्या ठिकाणावरून बाहेर पडणे पसंत केले. सामंत यांचा विजय निश्चित झाल्यानंतर सामंत समर्थकांपैकी काही कार्यकर्त्यांनी नाचणे येथील भाजपचेतालुकाध्यक्ष बाबा बाईंग यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडले.
या घटनेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार ठसन झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवघ्या काही मिनिटात या राड्याची खबर शहरात पसरली आणि वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला. या घटनेनंतर तालुकाध्यक्ष बाबा बाईंग कार्यकर्त्यांसह थेट शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. या ठिकाणी सामंत समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अपु-या पोलिस कर्मचा-यांमुळे वाद वाढण्याची शक्यता असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.