काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भूसंपादन विधेयकावरुन केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले.
नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भूसंपादन विधेयकावरुन केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले.
त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या भूसंपादन कायद्याची हत्या केल्याचा आरोप केला.
शेतक-यांच्या जमिनी हस्तगत करण्याचा सूट-बटू की सरकारचा जो इरादा आहे त्याला आम्ही सभागृहाच्या आत आणि बाहेर प्रखरपणे विरोध करु असे राहुल यांनी यावेळी सांगितले. भूसंपादन विधेयक मंजूर करण्याची या सरकारला घाई झाली आहे.
पण इतक्या सहजपणे त्यांना हे शक्य होणार नाही. संसदेत या विधेयकाला रोखणे आम्हाला शक्य झाले नाही तर, प्रस्तावित कायद्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरु असे राहुल गांधी लोकसभेत भूसंपादन विधेयकावरील चर्चे दरम्यान म्हणाले.
प्रस्तावित कायद्याची त्यांनी दिवसाढवळया घालण्यात येणा-या दरोडयाशी तुलना केली. चोरांनी सूट घातले असून, आता ते दिवसाढवळया हात मारणार आहेत. आपल्या भाषणात राहुल यांनी मोदी सरकारला अनेक टोमणे मारले ज्याला सत्ताधारी बाकावरुन विरोध झाला.
ज्या जमिनीच्या किंमती वाढत आहेत त्या जमिनी केंद्र सरकार आपल्या उद्योगपती, भांडवलदार मित्रांसाठी अधिग्रहीत करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सूट-बूटवाल्यांचे सरकार असल्याने त्यांना शेतक-यांकडून जमिनी घेऊन आपल्या उद्योगपती, भांडवलदार मित्रांना द्यायच्या आहेत अशी टिका राहुल यांनी यावेळी केली.