सुदृढ आणि सुजाण नागरिक ही देशाची गरज आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांसाठी जागरूक असणं गरजेचं आहे. देशाची अर्थव्यवस्था ग्राहकांवर अवलंबून असते.
मुंबई – सुदृढ आणि सुजाण नागरिक ही देशाची गरज आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांसाठी जागरूक असणं गरजेचं आहे. देशाची अर्थव्यवस्था ग्राहकांवर अवलंबून असते. छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारणे, तारीख संपलेल्या वस्तू विकणे, जुना माल आकर्षक सूट देऊन विकणे, ऑनलाईन शॉपिंग करताना होणारी फसवणूक या समस्या नेहमीच सामान्य ग्राहकांना भेडसावत असतात. ग्राहकांवर अन्याय होत असेल तर ते मुंबई ग्राहक पंचायत समितीमध्ये आपली तक्रार नोंदवू शकतात.
मुंबई ग्राहक पंचायत समिती ग्राहकांवर होणा-या अन्यायावर मार्गदर्शन करता यावं यासाठी स्थापन करण्यात आली. मुंबई ग्राहक पंचायत समितीमध्ये एका तक्रार नियंत्रण कक्षेत महिनाभरात जवळपास ६० तक्रारींच्या नोंद केल्या जातात. मोबाईल चोरी, बिल्डरांकडून फसवणूक आदी प्रकारच्या तक्रारी आजवर जास्त प्रमाणात ग्राहक पंचायत समितीमध्ये आढळून आल्या आहेत. ग्राहकांवरील अन्याय दूर करायचा असेल तर सरकार किंवा ग्राहक पंचायत समितीवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीकडे सापेक्ष आणि जागरूक नजरेने पाहणे गरजेचे आहे.
ग्राहकांना उद्भवणा-या प्रश्नांबाबत ग्राहक संरक्षण परिषदा होणे गरजेचे आहे. संबंधित बाजारपेठा, शासकीय अधिकारी यांची वेळोवेळी ग्राहक संरक्षण बैठक घेणे गरजेचे आहे, अशी कायद्यात नोंद आहे, परंतु या बैठका नियमित होत नाहीत. या चर्चामधून ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होते अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायत समितीमधील अधिका-यांनी दिली.
ग्राहक भवन संत ज्ञानेश्वर मार्ग कुपर हॉस्पिटलच्या मागे जे. व्ही. पी. डी. मार्केट, विलेपार्ले (पू.) येथे तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा ०२२२६२८१८३९ येथे संपर्क साधू शकता. ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सुरू असते.
वस्तू वा सेवा खरेदी करताना घ्यायची काळजी
» वस्तू खरेदी करताना छापील वजनाएवढे वजन आहे का, हे पाहणे.
» भाजी, फळे खरेदी करताना ती मोजण्यासाठी वापरण्यात येणा-या काटय़ांना वजन वाढण्यासाठी खाली दगड लावले जातात, तसे दिसून आल्यास त्वरित त्या विक्रेत्याला त्या गोष्टीचा जाब विचारावा.
» पॅकिंग वस्तू खरेदी करताना त्यावर संबंधित कंपनीचं नाव, नंबर, पत्ता आदी लेबल लावले आहे का? याची तपासणी करावी, जर नसेल तर ती वस्तू खरेदी करणं टाळा.
» मॅन्युफॅक्चरिंग तारीख व एक्सपायरी तारीख नेहमी पाहावी. काही मॉलमध्ये बाहेरगावहून माल आलेला असतो, त्यामुळे अशा वस्तूंकडे ग्राहक लगेच आकर्षित होतात; परंतु बाहेरगावहून आलेल्या वस्तूंची तारीख पाहिल्याशिवाय विकत घेऊ नये.
» वस्तू व सेवा विकत घेतल्यानंतर बील तपासणे गरजेचे आहे.
» व्हेज किंवा नॉनव्हेजचे चिन्ह पाहणेही गरजेचं आहे.
» खाण्याच्या वस्तूंमध्ये असलेले जिन्नस बाहेरील लेबलवर लावलेले असतात, ते जिन्नस पाहणे गरजेचे आहे.
लक्षात ठेवा
» तेलाचे डबे, पाण्याच्या बॉटल्स, यांचा उपयोग झाल्यावर त्यांची पूर्णपणे विल्हेवाट लावावी. कारण, तेलाचे डबे आणि बॉटल्स यांची पुनप्र्रक्रिया करून कमी किमतीत लहान वस्त्यांमध्ये विकल्या जातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
» कोणत्याही ऑफर्सना आकर्षित होताना त्या ऑफर्सची संपूर्ण माहिती करून घ्या.