भारताच्या लष्करात २००२ साली दाखल झालेल्या सुखोई ३०-एमकेआय या लढाऊ विमानाला बुधवारी संध्याकाळी पुण्याजवळ अपघात झाला. पुण्यापासून अवघ्या २० किमी अंतरावरच्या कोलावाडी या गावाजवळ शेतामध्ये हे विमान कोसळले.
भारताच्या लष्करात २००२ साली दाखल झालेल्या सुखोई ३०-एमकेआय या लढाऊ विमानाला बुधवारी संध्याकाळी पुण्याजवळ अपघात झाला. पुण्यापासून अवघ्या २० किमी अंतरावरच्या कोलावाडी या गावाजवळ शेतामध्ये हे विमान कोसळले. विमान ज्या ठिकाणी पडले तिथून २०० मीटर अंतरावर वस्ती होती; परंतु कोसळलेले विमान घसरत पुढे गेले नाही. त्यामुळे ही वस्ती अपघातापासून सुरक्षित राहिली.
हे विमान उसाच्या शेतात कोसळले होते. ते मोकळ्या मैदानावर कोसळले असते तर मात्र घसरत या वस्तीपर्यंत गेले असते आणि मनुष्यहानी झाली असती; पण सुदैवाने ही उंद्रे वस्ती बचावली. हे विमान प्रशिक्षणार्थी वैमानिकाकडून चालवले जात होते. सुदैवाने हे दोन्ही वैमानिक वाचले आहेत. आता हवाई दल प्रमुखांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. सुखोई विमानाचा हा काही पहिला अपघात नाही. या आधी दोन अपघात झालेले आहेत. २०११ सालच्या १३ डिसेंबरला पुणे जिल्हयातच वाडे बोलाई या गावाजवळ सुखोई विमान कोसळले होते. त्याही विमानातील दोन वैमानिक बचावले.
सुखोई हे विमान सुरक्षित मानले जाते; परंतु या विमानांना अलीकडे अपघात होऊ लागला आहे. या घटनांमुळे हवाई दल चिंताग्रस्त झाले आहे. बुधवारी पुण्याजवळ झालेला अपघात हा सुखोई विमानाचा तिसरा अपघात आहे. मिग विमानांप्रमाणे सुखोईसुद्धा उडती शवपेटी बनू लागल्याचा संशय येऊ लागला आणि त्यामुळे विमानावरचा विश्वास उडण्याची वेळ आली होती; परंतु दुस-या अपघातावेळी तत्कालीन हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांनी या पुण्याजवळच्या लोहेगाव येथे असलेल्या विमानतळाला भेट दिली. त्यांनी स्वत: हे विमान चालवले. एवढेच नव्हे तर त्याच्या काही कसरतीसुद्धा करून दाखवल्या. हे विमान तांत्रिकदृष्टय़ा सक्षम आणि निर्दोष आहे; एखाद दुसरा अपघात झाला म्हणून पूर्ण विमानावरचा विश्वास उडण्याची काही गरज नाही, हे त्यांनी स्वत: सिद्ध करून दिले. हवाई दल प्रमुखांच्या या पुढाकारामुळे कर्मचा-यांना दिलासा मिळाला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा एक अपघात झाला. आता या तिस-या अपघाताची चौकशी होणारच आहे आणि त्यातूनच अपघातामागचे सत्य कारण समोर येणार आहे. परंतु तूर्तास तरी असे मानले जात आहे की, सुखोई विमानाच्या तंत्रज्ञानामध्ये किंवा बांधणीमध्ये कसलाही दोष नाही.
झालेले तिन्हीही अपघात विमान उड्डाण सुरू असताना अचानक आणि अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे झालेले आहेत. भारताने १९९० साली रशियाशी या विमानासाठी करार केला आणि २००२पासून भारतीय हवाई दलामध्ये या विमानाचा शिरकाव झाला. या विमानाचे तंत्रज्ञान रशियाने विकसित केलेले आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतामध्ये हे विमान बांधले जाते. २००२ सालापासून सुखोई बनावटीची ६० विमाने देशातच तयार करून भारतीय नौदलात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विमानामध्ये कसलाही तांत्रिक दोष नाही, अशी ग्वाही हवाई दलातले तज्ज्ञ देत आहेत. परंतु लढाऊ विमानांच्या बाबतीत असा वरवरचा निष्कर्ष काढून काही साध्य होणार नाही. म्हणून या प्रकाराची कसून चौकशी झाली पाहिजे.