सी-वर्ल्ड रद्द करणार, अशी आश्वासने देऊन लोकसभा निवडणुकीत मते मिळविलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या विधानात निवडणुकीनंतर दररोज बदल होत असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रकल्प राबवणार, असे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा प्रकल्प नकोच, असा जुना सूर वैभव नाईक यांनी लावला आहे.
मालवण– विविध प्रकल्पांना विरोध करून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेणारी शिवसेना वायंगणी-तोंडवळीतील सी-वर्ल्ड प्रकल्पामुळे स्वत: अडचणीत आली आहे. सी-वर्ल्ड रद्द करणार, अशी आश्वासने देऊन लोकसभा निवडणुकीत मते मिळविलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या विधानात निवडणुकीनंतर दररोज बदल होत असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रकल्प राबवणार, असे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा प्रकल्प नकोच, असा जुना सूर वैभव नाईक यांनी लावला आहे. जिल्हाप्रमुखांच्या दररोज बदलणा-या विधानांमुळे सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत शिवसेनेची निश्चित भूमिका काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, जैतापूरमध्येही लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने प्रकल्प विरोधात रान पेटविले होते. मात्र निवडणुकीनंतर केंद्राने प्रकल्प होणारच, असे ठामपणे सांगितल्याने वायंगणी-तोंडवळीतही विधानसभा निवडणुकीनंतर जैतापूरचीच पुनरावृत्ती होणार आहे. त्यामुळे केवळ ग्रामस्थांची मते मिळविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून प्रकल्प विरोधाचे गाजर दाखविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने देशात मंजूर झालेला एकमेव सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्याचे काम पालकमंत्री नारायण राणे यांनी केले. या प्रकल्पामुळे केवळ वायंगणी, तोंडवळीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे. प्रकल्पस्थळी हजारो नोक-या उपलब्ध होऊन येथील जनतेचे आर्थिक जीवनमान सुधारणार आहे. मात्र हा प्रकल्प साकारल्यास राणे विरोधकांना राजकारणासाठी मुद्दाच मिळणार नसल्याने शिवसेनेने या प्रकल्पावरून ग्रामस्थांना भडकवत राजकारण सुरू केले आहे. वायंगणी, तोंडवळीच्या माळरानावर हा प्रकल्प होणार असताना या प्रकल्पात ग्रामस्थांची घरे जाणार असल्याचा अपप्रचार शिवसेनेने केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात मोदी सरकार येताच हा प्रकल्प रद्द केला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेने दिली. त्यानुसार लोकसभेच्या निवडणुकीत येथील ग्रामस्थांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला. मात्र जैतापूर प्रकल्पाबाबत मोदी सरकारने घेतलेले धोरण लक्षात घेऊन सी-वर्ल्ड प्रकल्प रद्द करणे शक्य नाही, हे ओळखत कमी जागेत हा प्रकल्प व्हावा, असे विधान वैभव नाईक यांनी केले. नाईकांच्या या कोलांटउडीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाल्यानंतर याचा फटका विधानसभेत आपणाला बसणार हे ओळखत वैभव नाईक यांनी सी-वर्ल्ड प्रकल्प नकोच, असा सूर लावला आहे. त्यामुळे दररोज बदलत चालणा-या शिवसेनेच्या भूमिकेमुळे येथील ग्रामस्थही संभ्रमात आहेत.
दोन वर्षात तोंडवळी, वायंगणीत ७३ लाखांचा निधी पालकमंत्री नारायण राणे यांच्यासमोर आपला टिकाव लागणार नाही, हे ओळखून वैभव नाईक यांनी मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. वायंगणी गावात दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत राणेंनी २५ वर्षात तोंडवळी, वायंगणीत एक रुपयांचाही निधी दिला नसल्याचा जावईशोध नाईक यांनी लावला होता. मात्र मागील दोन वर्षातच या दोन गावात तब्बल ७३ लाख ३० हजारांचा निधी खर्च झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१३ मध्ये येथे ५३ लाखांचा निधी खर्ची पडला. यामध्ये वायंगणी-तोंडवळी-तळाशील मार्ग कारपेट करणे १५ लाख, वायंगणी-तोंडवळी- तळाशील रस्ता डांबरीकरण २५ लाख, वरची तोंडवळी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता ३ लाख, वायंगणी भटवाडी भंडारवाडी रस्ता ५ लाख व वायंगणी बौद्धवाडी भंडारवाडी रस्ता ५ लाख या कामांचा समावेश आहे.
चालू वर्षात या गावातील २३ लाख ३० हजारांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये वायंगणी बौद्धवाडी मार्ग सुधारणे ५ लाख, वायंगणी बौद्धवाडी सापळेबाग तोंडवळी मार्ग डांबरीकरण करणे ४ लाख ८० हजार, आचरा हिर्लेवाडी-वायंगणी रस्ता डांबरीकरण करणे ४ लाख ५० हजार, वायंगणी स्वामी समर्थ मठाकडे जाणारा रस्ता तयार करणे ५ लाख, वायंगणी बौद्धवाडी भंडारवाडी मार्ग नूतनीकरण करणे ४ लाख या कामांचा समावेश आहे. पालकमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून वायंगणीमध्ये झालेल्या विकासकामांमुळे मागील ग्रामपंचायत निवडणुकीत येथील मतदारांनी शिवसेनेला नाकारून काँग्रेसला १०० टक्के यश मिळवून दिले होते.
‘२५ वर्षात जिल्ह्याचा विकास उद्धव ठाकरेंनी केला का?’
पालकमंत्री नारायण राणे यांनी मागील २५ वर्षात केवळ घोषणांचाच पाऊस पाडल्याची टीका करणा-या वैभव नाईक यांचा मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. १९९० पूर्वीचा सिंधुदुर्ग व आताचा सिंधुदुर्ग याची तुलना करता या २५ वर्षात जिल्ह्याचा सर्वागिण विकास झाला आहे. वाडया वाडयांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्या असून हा सर्व विकास राणेसाहेबांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनी केला आहे का? असा सवाल तोडणकर यांनी केला आहे.