सीबीएसईच्या बारावीचा निकाल ८२.१० टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
मुंबई- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मार्च-एप्रिलदरम्यान घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सीबीएसईच्या बारावीचा एकुण निकाल ८२.१० टक्के इतका लागला असून सर्वात अधिक निकाल चेन्नई विभागाचा आहे. या विभागात ९१.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र मागील वर्षाप्रमाणेच यंदाही सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनीच अव्वल ठरल्या आहेत. यात एकुण निकालाच्या ८७.९८ टक्के विद्यार्थिनी तर ७७.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या परीक्षेला देशभरातून ९ लाख ४४ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सीबीएसईच्या परीक्षेत चेन्नई विभागात महाराष्ट्राचा एकुण निकाल ९३.८७ टक्के लागला आहे. राज्यातून या परीक्षेला ११ हजार २४७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १० हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ५ हजार ८१८ विद्यार्थी तर ४ हजार ७३९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९२.६३ तर विद्यार्थिनीचा तब्बल ९५.४३ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत सर्वात अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुंबईतील केंद्रीय महाविद्यालयांच्या शाळांतील आहे.
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा चेन्नई विभागात ४६४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला एकुण ७७ हजार ६१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७१ हजार २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ३३ हजार २१४ विद्यार्थीनी तर ३८ २हजार ५७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून ते १० जूनपर्यंत समुदेशनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सीबीएसईशी संबंधित असलेल्या सरकारी, खासगी विद्यालयाचे ४५ पा्रचार्य, प्रशिक्षित समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ आणि समाजशास्त्रातील तज्ज्ञ समुपदेशसाठी असलेल्या हेल्पलाईनवर उपलब्ध असतील. यात भारतात ३७ आणि भारताबाहेर जपान, कुवेैत, दोहा, कतार, सऊदी अरब, युएई आणि ओमान सल्तनत येथे ८ जण उपलब्ध असतील.
हेल्पलाईन
भारताच्या कोणत्याही राज्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईकडून हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात येते. यंदा ही हेल्पलाईन १८००११८००४ या क्रमांकावर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि इतर येणा-या अडचणी, चिंता याविषयी या हेल्पलाईनवरून थेट प्राचार्य अथवा मार्गदर्शकांशी संवाद साधता येईल.
सीबीएसईच्या तारखांचा गोंधळ
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली. तर दहावीचा निकालही रविवारी संध्याकाळी अचानक जाहीर करण्यात आला यामुळे सीबीएसईच्या तारखांच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला.