सार्वजनिक क्षेत्रातील १० निवडक कंपन्यांचा समावेश असलेल्या सरकारच्या पहिल्याच सीपीईएसई-एक्स्चेंज ट्रेडेड फंडला गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी निर्गुतवणुकीचे लक्ष्य पार करण्यात यश आले.
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील १० निवडक कंपन्यांचा समावेश असलेल्या सरकारच्या पहिल्याच सीपीईएसई-एक्स्चेंज ट्रेडेड फंडला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी निर्गुतवणुकीचे लक्ष्य पार करण्यात यश आले. शेवटच्या दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) केलेल्या आक्रमक गुंतवणुकीने या योजनेतून सरकारच्या तिजोरीत ४००० कोटींची भर पडली. या वर्षी निर्गुतवणुकीतून एकूण १७,००० कोटींहून अधिक रक्कम सरकारी तिजोरीत पडली आहे.
ओएनजीसी, गेल इंडिया, कोल इंडिया, इंडियन ऑइल यांसारख्या १० कंपन्यांचा समावेश असलेल्या या ईटीएफमध्ये शेवटच्या दिवशी एकूण १६०० कोटींची बोली लागली. यामध्ये एफआयआयचा १००० कोटींपेक्षा जास्त वाटा राहिला. सरकारकडून या ईटीएफ योजनेमधून ३००० कोटी रुपयांची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र हा फंड बंद होताना ४००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाल्याने सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यात मोठी मदत होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निर्गुतवणुकीचे लक्ष्य ४०,००० कोटींवरून १६,०२७ कोटी रुपये करण्यात आले होते. हे लक्ष्य ओलांडताना सरकारच्या तिजोरीत १७,१०० कोटी रुपयांची भर पडली. पहिल्या दिवशी भारतीय स्टेट बँक आणि विमा कंपन्या यांसारख्या बडय़ा गुंतवणूकदारांनी ८३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
एलआयसी, भारती अक्सा लाइफ, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स यांनी या योजनेत पैसा टाकला आहे. ईटीएफ हा ओपन एंडेड फंड असून प्रति युनिट १० रुपये दर्शनी मूल्य आहे. १० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणा-या संस्थांसाठी ९०० कोटींचा कोटा देण्यात आला होता. तर वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ५००० रुपये आणि कमाल १० लाखांपर्यंत या फंडात गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आली होती.