पाकिस्तान बेभरवशाचा असून सियाचीनमधून भारत मागे हटल्यास तेथे पाकिस्तान कब्जा करेल.
नवी दिल्ली – पाकिस्तान बेभरवशाचा असून सियाचीनमधून भारत मागे हटल्यास तेथे पाकिस्तान कब्जा करेल. त्यामुळे सियाचीनमधून भारत सैन्य मागे घेणार नाही, असे स्पष्ट मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले.
लोकसभेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात पर्रिकर म्हणाले की, सियाचीन हिमनदी परिसरातील सर्वात उंच भागात भारताचे सैन्य आहे. ती जागा भारताने सोडल्यास तेथे शत्रू कब्जा मिळवेल. ती परत मिळवण्यासाठी आणखी बळी द्यावे लागतील. ही जागा संरक्षणविषयक अत्यंत मोक्याची आहे.
ही जागा मिळवण्यासाठी भारताच्या अनेक सैनिकांचे बळी गेले आहेत. तेथे सैन्य ठेवण्याची मोठी किंमत भारत मोजत असल्याची मला जाणीव आहे. मी सैन्य दलाच्या जवानांना सलाम करतो. अत्यंत महत्त्वाच्या जागेवर भारतीय सैन्य आहे. पाकिस्तानच्या शब्दावर संसदेतील कोणताही सदस्य विश्वास ठेवणार नाही, याची मला खात्री आहे, असे पर्रिकर म्हणाले.
सियाचीन परिसरात गेल्या ३२ वर्षात ९१५ जणांचे बळी गेले आहेत. म्हणजेच दरवर्षी २८ जण मरण पावले आहेत. मात्र, हेच प्रमाण आता वर्षाला १० वर आले आहे. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या सैनिकांची अतिशय कठोर वैद्यकीय तपासणी होते. या सैनिकांना १९ पद्धतीचे कपडे पुरवले जातात. तसेच बर्फात चालणारी स्कूटरही पुरवली जाते. सैनिकांना सर्व वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे केला जातो. मात्र, निसर्गावर पूर्णपणे मात केली जाऊ शकत नाही, असे पर्रिकर म्हणाले.