एक हजार चौरस फुटांचा गाळा उपलब्ध होणार, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू आणि आंबा उत्पादकांना आता आपला माल थेट वाशी मार्केटमध्ये आणून विकता येणार आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून एपीएमसी मार्केटमध्ये एक हजार चौरस फुटांचा गाळा उपलब्ध होणार आहे. दिलेले वचन तातडीने पूर्ण केल्याबद्दल काजूप्रक्रिया धारक संघ आणि रत्नागिरी शेतकरी संघटनेने याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे खास आभार मानले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण काजू आणि आंबा पिकावर असते. मात्र गेल्या काही दिवसांत काजूप्रक्रिया व्यवसाय अडचणीत आला आहे. काजूला स्थानिक बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणि पर्यायाने काजू उत्पादकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. यावेळी काजूप्रक्रिया धारक संघ आणि रत्नागिरी जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. कोकणच्या जनतेचे प्रश्न सोडविणे हेच आपले कर्तव्य मानणा-या नारायण राणे यांनी काजूप्रक्रिया धारक संघाला दिलासा दिला होता.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत, असे सांगितले होते. या समस्येतून काय मार्ग काढता येईल, असे विचारले असता. काजू आणि आंबे थेट नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकता आले तर प्रत्येक किलोमागे ३० ते ४० रुपयांचा फरक पडू शकतो, असे उत्पादकांच्या वतीने सांगितले होते. तेव्हा नारायण राणे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना या प्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या.
नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील शेतक-यांना आपला माल थेट विकता यावा यासाठी एक स्वतंत्र गाळा मिळाला पाहिजे, अशी मागणी करण्यासाठी बुधवारी माजी खासदार निलेश राणे एमपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले. तिथे नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे आणि अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासक सतीश सोनी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत काजूप्रक्रिया धारक संघाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पवार, सचिव विश्वनाथ साळुंखे, खजिनदार मुकेश देसाई उपस्थित होते.
माजी खासदार निलेश राणे यांनी या ठिकाणी शेतक-यांना आपला शेतमाल विकण्यासाठी एपीएमसी मार्केटमध्ये गाळा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्यावर सोनी यांनी एपीएमसी मार्केटमध्ये एक हजार चौरस फुटांचा गाळा देण्याचे मान्य केले. ही प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. निलेश राणे यांनी दिलेले वचन एक आठवडय़ात पूर्ण केल्याबद्दल काजूप्रक्रिया धारक संघ आणि शेतकरी संघटना रत्नागिरी जिल्ह्यातर्फे खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे खास आभार मानले आहेत. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतक-यांना आपला माल थेट नवी मुंबईत आणून विकता येणार आहे.