कोकणातील शेतकरी आळशी आहे. तो उपलब्धतेचा फायदा करून स्वत:चा फायदा करून विकास साधून घेत नाही, अशी नेहमीच टीका कोकणातील शेतक-यांवर होते. परंतु येथील कृषीवलांनी रब्बी हंगामात मोठय़ा प्रमाणावर भाताची लागवड करून टीकाकारांचे शब्द फोल ठरवल्याचे चित्र येथे रब्बी हंगामातील लागवडीखालील क्षेत्राच्या वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
‘कोकणी आणि भात बोकणी’ ही म्हण कोकणात प्रचलित आहे. परंतु आहारावर नियंत्रण मिळवण्याच्या ‘फॅड’ मुळे सध्या जेवणामध्ये भाताचा वापर कमीच होत असल्याचे दिसून येते. अर्थात आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे सध्या चालू असलेला रब्बी भात ( वायंगणी) हंगाम! या वर्षी उशिरापर्यंत झालेला पाऊस या भातशेतीच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत असून जिल्हा कृषीअधीक्षक एन. जी. वाकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू हंगामात जिल्ह्यात एकूण ११८९ हेक्टर क्षेत्रात भातशेतीची लागवड करण्यात आली आहे. हेच प्रमाण मागील हंगामात साधारणपणे हजारभर हेक्टर एव्हढे होते. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व मालवण तालुक्यात मोठय़ा प्रमाणात भातशेती करण्यात आली आहे.
भातपिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी उष्ण व दमट हवामान लागते. असे अनुकूल हवामान कोकणात असते. तसेच हे पीक पाण्याचा उत्तम निचरा होणा-या जमिनीत चांगले येते. मालवण तालुक्यात वायंगणी, मोगरणे, त्रिंबक, बांदिवडे, मसुरे, ओवळीये, गोळवण, काळसे, चिंदर, बागायत, मसदे आदी गावांमध्ये वायंगणी शेती केली जाते.
उन्हाळी भाताची पेरणी विविध पाण्याच्या उपलब्ध स्त्रोतावर डिसेंबर अखेपर्यंत केली जाते. उन्हाळी शेतीची काही वैशिष्टय़े असून उन्हाळी हंगामात भात पिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे नत्रयुक्त खतास प्रतिसाद जास्त असतो.
भाताच्या वाढीस २८ ते ३३ अंश उष्ण तापमान चांगले मानवते. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आद्र्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही कीटक व रोगराईचे प्रमाण खरीपापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भात पिकाची उंची खरीप पिकापेक्षा कमी असते. तसेच खरीपापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण कमी असते. उन्हाळी हंगामामध्ये नियमित व नियंत्रित पाणीपुरवठय़ामुळे तण कमी असते, अशी माहिती मालवण तालुका सहाय्यक कृषी अधिकारी अभिजित मदने यांनी
दिली आहे.
भात जातीचे प्रमाणित बियाणे खरेदी केलेले असेल तर बियाण्यास प्रक्रिया करावयाची आवश्यकता नसते. स्वत:कडील बियाण्यास प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. रत्ना, रत्नागिरी २४, मसुरी, कर्जत ६, कर्जत ५, कर्जत ४ या जातींच्या बियाण्यापासून चांगले उत्पन्न मिळते. परंतु या सर्वाना पाण्याची भरपूर आवश्यकता असल्याने शेतक-यांची स्थानिक जातीनांच जास्त पसंदी आहे. जिल्हा कृषी विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार चालू हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागवड झालेल्या भातशेतीचे क्षेत्र तालुक्यानुसार पुढीलप्रमाणे आहे.
खत व्यवस्थापन महत्त्वाचे
खरीप हंगामाप्रमाणेच शेतीची नांगरणी व चिखलणी आपण करतो. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जास्तीत जास्त भातपिकाचे उत्पादन मिळविण्यासाठी १० टन शेणखत प्रति हेक्टरी नांगरट करताना जमिनीत मिसळावे. शिफारस केल्याप्रमाणे भातपिकला हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश खत द्यावे. त्यामध्ये लावणीच्या वेळी दिलेल्या खताखेरीज उरलेला ५० किलो नत्र ( ५४ किलो युरिया) लावणीनंतर ३० दिवसांनी आणि उरलेले २५ किलो नत्र ( ५४ किलो युरिया) लावणीनंतर ६० दिवसांनी द्यावे, असे कृषीतज्ज्ञ सांगतात.
पाणी व्यवस्थापन
लावणीनंतर ३० दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी २ ते ३ से. मी. एव्हढी ठेवावी. नंतर फुटवा येण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची पातळी ४ ते ५ सें. मी. एव्हढी वाढवावी. पीक तयार होईपर्यंत ही पाण्याची पातळी स्थिर ठेवावी. कापणीपूर्वी शेतातील पाण्याचा पूर्ण निचरा करावा. त्यामुळे भातपीक एकाच वेळी कापणीस तयार होईल.
कापणीआधी खोडकिडीग्रस्त भातरोपे उपटून त्याचा नाश करावा. त्यामुळे पुढील हंगामात खोडकिडय़ांचा प्रादुर्भाव कमी होतो.
चारसूत्री किंवा श्री लागवड फायद्याची
मित्रांनो, आपण पारंपरिक पद्धतीनेच ही भातशेती जास्त करतोय. परंतु यासाठी जर चारसूत्री किंवा श्री पद्धत वापरली तर फायद्यामध्ये मोठी वाढ होईल. श्री पद्धतीमध्ये केवळ एक किलो बियाण्यामध्ये एक हेक्टर एव्हढय़ा क्षेत्रामध्ये भात लागवड करता येते. तसेच जास्त पाणीसुद्धा या पद्धतीमध्ये लागत नाही. मुळांना आवश्यक ऑक्सिजन मिळेल एव्हढेच पाणी खाचरात ठेवणे आवश्यक असते.
त्यामुळे श्री पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी १०० ते १२० क्विंटल भात आपल्याला मिळतो. हेच प्रमाण पारंपरीक पद्धतीने भातशेती केल्यास ४० ते ५५ क्विंटल एव्हढे आहे. त्यामुळे शेतक-यांनी अधिकच्या फायद्याला न मुकता या श्री, चारसूत्री पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याची माहिती श्री मदने यांनी दिली आहे. शेतक-यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधल्यास याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी मित्रांनो चालू हंगामात मोठय़ा प्रमाणावर नदी, तसेच छोटय़ा वहाळांवर बांध बांधण्यात आले आहेत. अजूनही या शेतीसाठीचा हंगाम संपलेला नाही. मजुरांचा भेडसावणारा प्रश्न यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून दूर करणे आपल्याला शक्य आहे. फक्त मेहनत घेण्याचा निश्चय करा, पारंपारिकतेपासून थोडे दूर जावून श्री चारसूत्री पद्धत अवलंबल्यास फायदा तुमचाच असेल!