जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या या रौद्ररूपामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
सावंतवाडी- जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. संततधार कोसळणा-या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर, भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या या रौद्ररूपामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, चालू वर्षी ४२३६.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ३५२७ मिमी इतकी पावसाची नोंद झाली होती.
सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढतच चालले आहे. गुरुवारी रात्री पावसाने दोडामार्ग तालुक्याला चांगले झोडपले. तर आज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सावंतवाडी तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. परतीच्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. पीक जोमाने वाढले असून भात कापणीची वेळ आली आहे. मात्र, सतत पडणा-या पावसामुळे शेतक-यांची भातकापणी लांबली आहे.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वेगाने वारे वाहू लागल्याने वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील मच्छीमारांनीही आपल्या नौका किना-यावर आणल्या आहेत. हवामान खात्याने कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाल्याने समुद्रामधील मासेमारीही बंद झाली आहे.