देवगड तालुक्यात पावसाने गेले दोन दिवस जोरदार हजेरी लावल्याने कुणकवण, कोर्ले, धालवली, पोंभुर्ले, मालपे, मणचे, मुटाट तसेच मोंड, वानिवडे-पावणाई आदी गावातील बहुतांश शेतक-यांना फटका बसला आहे.
देवगड- देवगड तालुक्यात पावसाने गेले दोन दिवस जोरदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे कुणकवण, कोर्ले, धालवली, पोंभुर्ले, मालपे, मणचे, मुटाट तसेच मोंड, वानिवडे-पावणाई आदी गावातील बहुतांश शेतक-यांना फटका बसला आहे. तसेच देवगड परिसर, जामसंडे, गढीताम्हाणे, बागतळवडे आदी भागांतील मळेशेतीचे नुकसान झाले आहे. मच्छीमारांनाही या पावसाचा फटका बसला असून हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवली जातेय.
कातळी भागातील शेतीला हा पाऊस चांगला मानवला असला तरी तयार झालेल्या पिकाला उघडीप महत्त्वाची होती. मात्र मुसळधार पावसाने शेतकरी चिंतातूर बनला आहे. या जोरदार पावसाने भातशेती जमिनीवर कोसळल्याने शेतक-यांना नुकसानीचा मोठा फटका बसला आहे.
शेतक-यांची भातशेती परिपक्व होऊन कापणी योग्य झाली आहे. मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कुणकवण, कोर्ले, धालवली, पोंभुर्ले, मालपे, मणचे, मुटाट तसेच मोंड, वानिवडे-पावणाई आदी गावांतील बहुतांश शेतक-यांची शेती नदीकिनारी आहे. मृग नक्षत्रापासून पेरणी केल्यानंतर लावणी हंगाम योग्य रीतीने होऊन त्यावेळी पावसानेही चांगली साथ दिली होती. साहजिकच भातशेती परिपक्व होऊन लवकरच कापणीची कामे सुरू होणार होती. परंतु भातपिके भुईसपाट झाली असून पाऊस जर असाच कोसळत राहिला तर जमिनीवर पडलेल्या भातरोपांना नव्याने अंकुर फुटण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
भातशेतीप्रमाणेच आंबापिकाच्या बाबतीतही पाऊस किती पडतो यापेक्षा पाऊस केव्हा पडतो याला आंबा उत्पन्नामध्ये जास्त महत्त्व आहे. जर पावसाचा कालावधी लांबला तर त्याच प्रमाणात मोहोर येण्याचा कालावधीही वाढतो. मोहोर येण्यापूर्वी जर पाऊस पडला तर मोहोर येण्याऐवजी आंब्याला पालवी येण्याची शक्यता वाढते. सद्यस्थितीत नारळी पौर्णिमा उत्सवाच्या मुहूर्तावर समुद्राला नारळ अर्पण करून व्यवसायाला सुरुवात करण्याची येथील मच्छीमारांची लगबग सुरू झाली असतानाच, पावसाने चित्र बदलले असल्याने मासळी हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नारळी पौर्णिमेपासून पारंपरिक मच्छीमारीबरोबरच खोल पाण्यातील मच्छीमारीला सुरुवात होते. मात्र गेले दोन दिवस वादळी वा-यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने मासळी हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचा निष्टिद्धr(155)तच मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे.
मुसळधार पावसाचे नुकसानसत्र सुरूच
सिंधुदुर्ग- २७ जुलैपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने १७ ऑगस्टपासून पुन्हा जोर धरला आहे. १८ ऑगस्टला सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात एकूण पाऊस ७९३.६० मि. मी. पडला असून त्याची सरासरी ९९.२० मि. मी. इतकी आहे. दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यात पावसाने घरांचे नुकसान केले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे दोन घरांचे, वेंगुर्ला परबवाडा येथील दोन घरांचे नुकसान झाले आहे. दोडामार्ग-१२० मि. मी. आजपर्यंत एकूण-३४३९ मि. मी., सावंतवाडी-८६ मि. मी., एकूण-३५८९ मि. मी., वेंगुर्ले-७९.६० मि. मी., एकूण-२६२९.६२, कुडाळ ११९ एकूण-२७९६, मालवण-११२, एकूण-३०४६ , कणकवली-८६ एकूण-३३३१, देवगड-११२ मि. मी., एकूण-२३५६, वैभववाडी-७९ मि. मी., एकूण-३४७७ मि. मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या १० वर्षात सर्वाधिक पाऊस जुलै २०१३ मध्येच पडला आहे. २७ जुलैनंतर थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने नोकरदारांची त्रेधातिरपिट उडाली आहे. आतापर्यंत खासगी व सरकारी मालमत्तेचे मिळून लाखोंहून अधिक नुकसान झाले आहे. शिवाय या वर्षी जुलैमध्ये जिल्ह्यात पावसाने सहा जणांचे बळी घेतले आहेत.
जिल्ह्यात पुरामुळे बाधित गावे २४३ असून ५९८ कुटुंबातील १८६९ व्यक्तींचे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यात ४८ गावे, सावंतवाडी तालुक्यात ३९ गावे, दोडामार्गात १६, देवगडात ३०, वैभववाडीत ९, कणकवलीत ४२, मालवणात २४ तर वेंगुर्लेत ३५ गावे पूरबाधित आहेत. अशा एकूण २४३ गावांमध्ये पावसामुळे नुकसान झाले आहे.
पुराची बाधा झालेली कणकवली तालुक्यात ९८ कुटुंबे आहेत. मालवणात ९५, देवगडात ५०, वैभववाडीत १४, सावंतवाडीत ९७, कुडाळमध्ये १६०, वेंगुर्लेत ६०, दोडामार्गात २४ कुटुंबांना पुराची झळ पोहोचली आहे.