पालकमंत्री ना. केसरकरांच्या मतदारसंघातील प्रामुख्याने सावंतवाडी तालुक्यात कुपोषित बालकांबरोबरच महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या संख्येत दिवसेंदिवस भरमसाट वाढ होत आहे.
पालकमंत्री ना. केसरकरांच्या मतदारसंघातील प्रामुख्याने सावंतवाडी तालुक्यात कुपोषित बालकांबरोबरच महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या संख्येत दिवसेंदिवस भरमसाट वाढ होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील महिला समुपदेशन केंद्रात १०२ इतक्या पीडित महिलांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. तर १२० बालके कुपोषित असल्याचे सव्र्हेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कुपोषित बालके व पीडित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालल्याने सामाजिक कार्यकर्त्यांमधून या प्रश्नांबाबत चिंतेचा सूर उमटत आहे.
महिला अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार या समस्या सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या आहेत. राज्याच्या तुलनेत सावंतवाडी तालुक्यातील महिला अत्याचार किंवा कुपोषित बालकांची संख्या तुलनात्मकदृष्टया कमी असली तरी जिल्हयाच्या तुलनेत ही आकडेवारी धक्कादायक आहे.
वर्षभरापूर्वी अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी पोलीस ठाण्यात महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील पीडित महिलांना कायदेविषयक मार्गदर्शनाबरोबरच त्यांना योग्य समुपदेशन करून पीडितांना धीर देण्याचे काम या समुपदेशन केंद्रात चालते. समुपदेशिका नमिता परब व त्यांच्या सहकारी चांगल्या पद्धतीने पीडित महिलांना समुपदेशन करीत आहेत. अर्थात याकामी पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग आहे.
सावंतवाडी तालुक्यातील १०२ इतक्या तक्रारी पीडित महिलांनी या समुपदेशन केंद्रात दाखल केल्या आहेत. त्यातील ८५ तक्रारी समन्वयाने मिटविण्यात आल्या असून कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी अधिक आहेत. यात सासू-नणंदापासून जाच-छळ, हुंडाबळी, पतीकडून मारहाण अशा तक्रारी अधिक आहेत. विशेष म्हणजे सावंतवाडी शहरातील पीडित महिलांच्या तक्रारी जास्त असल्याचे समुपदेशिका नमिता परब यांनी सांगितले.
१०२ पैकी १८ प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून त्यापैकी ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. पीडित विवाहित महिलांच्या तक्रारी कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ अन्वये दाखल करण्यात येतात. दरम्यान, जिल्हयाच्या तुलनेत सावंतवाडी तालुक्यात पीडित महिलांची संख्या अधिक असल्याचे समुपदेशक नमिता परब यांनी सांगितले.
कुपोषित बालकांची संख्या देखील तालुक्यात जास्त आहे. कुपोषणमुक्तीसाठी या आधीच्या राज्य सरकारने प्रभावीपणे मोहीम राबवून निधीची तरतूद केली होती. मात्र, आता कुपोषण मुक्तीच्या निधीला कात्री लावण्यात आली असून निधी बंद करण्यात आला आहे. निधीच उपलब्ध नसल्याने सावंतवाडी तालुक्यात १५० हून अधिक कुपोषित बालके आढळली आहेत.
या दोन्ही समस्या ज्वलंत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तर पालकमंत्री केसरकरांच्याच मतदारसंघातील सावंतवाडी तालुक्यात पीडित महिला व कुपोषित बालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने सामाजिक स्वास्थाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.