संगणकाच्या वाढत्या वापराबरोबरच या क्षेत्रातील गुन्हेगारीही वाढली आहे. हॅकिंगसोबतच आर्थिक गैरव्यवहार, अश्लीलता व छेडछाडीचे गुन्हेही वाढले आहेत.
मुंबई- संगणकाच्या वाढत्या वापराबरोबरच या क्षेत्रातील गुन्हेगारीही वाढली आहे. सायबर सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही संकेतस्थळे हॅक केली जाण्याचे गुन्हे कमी झाल्याचे दिसत नाही. हॅकिंगसोबतच आर्थिक गैरव्यवहार, अश्लीलता व छेडछाडीचे गुन्हेही वाढले आहेत.
सायबर गुन्हेगारांची डोकेदुखी गेल्या वर्षभरात वाढली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार (नॅशनल क्राइम रेकॉर्ड) ऑक्टोबरपर्यंत सायबर गुन्हेगारांनी १४ हजार संकेतस्थळे हॅक केली. २००९च्या तुलनेत हे प्रमाण ५७ टक्क्यांनी वाढले आहे. २००९ मध्ये हॅकिंगचे ९ हजार १८० प्रकार घडले. २०११ मध्ये हे प्रमाण १४ हजार ३९२ वर पोहोचले होते. तर यंदा ऑक्टोबरमध्येच हा आकडा पार झाल्याचे ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने (सीईआरटी-ईन) आपल्या अहवालात नमूद केले आहे. २०१०मध्ये सायबर गुन्हेगारांनी १६ हजार १२६ संकेतस्थळे हॅक केली होती. नॅशनल क्राइम रेकॉर्डनुसार आयटी कायदा आणि भारतीय दंड संहितेंतर्गत २००९ मध्ये ६९६, २०१० मध्ये १ हजार ३२२ व तर २०११ मध्ये २ हजार २१४ गुन्हे दाखल झाले.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने सहा ठिकाणी ‘सायबर सिक्युरिटी मॉक ड्रिल घेतले असून, जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात आला असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री कपिल सिब्बल यांनी नुकतेच संसदेत सांगितले. जानेवारी ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीत सरकारची २९४ संकेतस्थळे हॅक करण्यात आली. हे वाढते प्रमाण चिंतेची बाब असल्याने माहिती व तंत्रज्ञान यंत्रणेकडून त्याचे नियमित ऑडिट केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील गुन्हेगारी
राज्य गुन्हे शाखेने ‘महाराष्ट्रातील गुन्हेगारी’ हा अहवाल प्रकाशित केला होता. त्या अहवालानुसार माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० व भारतीय दंड विधान अशा दोन कायद्यांखाली या प्रकरणी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांचा विचार करता २०१० मध्ये पुण्यात सर्वाधिक गुन्हे घडले. अश्लील साहित्य प्रकाशित करण्याचे गुन्हे हॅकिंगपेक्षाही अधिक आहेत. हॅकिंगमध्ये २०१० मध्ये १ हजार ७३१ गुन्हे दाखल झाले. त्यात २६ जणांना अटक झाली. अश्लील साहित्य प्रकाशित केल्याचे ६१ गुन्हे दाखल झाले. त्यात ८४ जणांना अटक झाली. याशिवाय बदला घेणे, पैशाची हाव, अपहार, छेडछाड या कारणांसाठी इंटरनेटचा वापर केल्याचे दिसून येते. आणखी धक्कादायक बाब म्हणजे हे गुन्हे करणारे आरोपी १८ ते ३० या वयोगटातील आहेत. तर राज्यात विविध वयोगटांतील ८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४३ आरोपी ४५ ते ६० वयोगटातील आहेत. तर ५ जण १८ वर्षाखालील आहेत. मुंबईत विद्यार्थ्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.
चढता क्रम
वर्ष | दाखल गुन्हे |
२००९ | ६९६ |
२०१० | १,३२२ |
२०११ | २,२१४ |
२०११ मधील गुन्हे
गुन्ह्याचा प्रकार | दाखल गुन्हे | अटक |
हॅकिंग | १५७ | ६५ |
संगणकाचा गैरवापर, नुकसान | ८२६ | ४८७ |
अश्लील साहित्य प्रकाशन | ४९६ | ४४३ |