केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावरुन सलग तिस-या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहातील गदारोळ कायम आहे.
नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावरुन सलग तिस-या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहातील गदारोळ कायम आहे. विरोधकांनी ठाम भूमिका घेतल्याने केंद्र सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी यासंबंधी लोकसभेमध्ये निवेदन केले. सार्वजनिक जीवनात प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि भान राखून विधाने केली पाहिजेत.
संसदेत हा विषय उपस्थित होण्याआधीच मी साध्वी ज्योती यांचे विधान फेटाळून लावले होते. यापुढे असे शब्द वापरु नका असे मी भाजप खासदारांना बजावले आहे. अशा गोष्टी कोणीही मान्य करु शकत नाही. साध्वी निरंजन ज्योती यांनी सभागृहाची माफी मागितली आहे त्यामुळे आता हा विषय संपवावा असे आवाहन मोदी यांनी सभागृहाला केले.
मात्र पंतप्रधानांच्या या निवेदनाने विरोधकांचे समाधान झालेले नाही. विरोधकांनी साध्वी ज्योतीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर, राजीनामा घेणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.
मागच्या तीन दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात यावरुन गोंधळ सुरु आहे. संसदेबाहेर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शने केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तोंडाला काळीपट्टी बांधून यामध्ये सहभागी झाले होते. विरोधी पक्षाला जे बोलायचे आहे ते बोलण्यापासून आम्हाला सभागृहात रोखले जात आहे असे राहुल गांधी म्हणाले.