या पृथ्वीतलावर असेपर्यंत काही माणसांचे मोठेपण जाणवत नाही, मात्र त्यांच्या जाण्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व किती मोठे होते याची जाणीव होते आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते. ज्येष्ठ पत्रकार, कथाकार, कादंबरीकार अरुण साधू यांच्या अनंताच्या प्रवासाला जाण्याने सामान्यांचा हुंकार लेखणीद्वारे मांडणारा दिलदार मनाचा माणूस गेल्याचे जाणवले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे बोलायला ठीक आहे, पण आचरणात आणायला फारच कठीण आहे. मात्र सध्याच्या भपकेबाज जमान्यात अरुण साधू नेहमीच सामान्यात वावरले आणि सामान्यांसारखेच राहिले. नावात काय आहे, असे म्हटले तरी नावातच सर्वकाही असते असेही जाणवते आणि प्रत्ययासही येते. अरुण साधू यांच्या नावातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सार सामावलेले होते. नाव अरुण म्हणजे प्रकाश देणारा आणि आडनाव साधू.. साधू या नावाचा अर्थ लक्षात घेतला तर संत असाही होतो आणि साधा माणूस असाही अर्थ होतो. अरुण साधू या दोन्ही अर्थाने प्रतित होते.
आपल्या लिखाणाने नवसंदेश देणारे अरुण साधू नेहमीच साधेपणाने राहिले म्हणूनच ते त्यांच्या जाण्यानंतरही मोठे ठरले. मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणा-या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली आणि ते समृद्धही केले. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर असे साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली. पत्रकाराला ललित लेखनाचे अंग असले की किती उत्तम साहित्यनिर्मिती होऊ शकते, हे साधूंनी दाखवून दिले. राजकारण हा पत्रकारांच्या दैनंदिन जगण्याचा भाग असतो. मात्र, त्याला कल्पनेची जोड दिली तर चांगली साहित्यनिर्मिती होऊ शकते, हे त्यांच्या लिखाणाने सिद्ध केले. त्यांच्या ‘सिंहासन’ कादंबरीवरूनच पुढे ‘सिंहासन’ या चित्रपटाची निर्मिती झाली अणि राजकारणातले वास्तव समाजापुढे आले. ‘सिंहासन’ चित्रपटाने तर त्यांचा लौकिक फारच वाढवला. त्यासाठी त्यांची पत्रकारितेची दृष्टी आणि साहित्यिक व्यासंग उपयोगी पडला. त्यामुळे पुढे जब्बार पटेल यांच्याबरोबर आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील चित्रपटांचे लेखनकाम केले. टीकाकार असूनही त्यांनी कधी दरारा निर्माण केला नाही, पण आदर्श मात्र जरूर निर्माण केला. म्हणूनच पत्रकारितेत ते संपादकापेक्षाही मोठे ठरले.
पत्रकारितेबरोबर साहित्यातही ठसा उमटवणा-या अरुण साधू यांनी ‘माणूस’मधून राजकीय, साम्यवादी चळवळ आणि चीनमधील घडामोडी अशा विविधांगी विषयांवर लेखन केले. ‘स्फोट’ कादंबरीद्वारे विज्ञानावर भाष्य केले, तरीही त्यांना शिल्पकला आणि पॉटरी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात रस होता. म्हणजे पत्रकारिता, साहित्य आणि वास्तव यांचे भान त्यांनी सजगपणे जपले. त्यामुळेच ते सर्वसामान्यांना अधिक धार्जिणे ठरले. ते सर्वसामान्य राहू शकले, पण त्यातून घडलेले लेखक म्हणून ते असाधारण ताकदीचे ठरले. प्रत्येक चांगल्या लेखकात असलेले उत्तम संपादन कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यामुळेच त्यांनी स्वत:ची पुस्तके संपादित केलीच, शिवाय इतर अनेक लेखकांना त्या कामी मदत केली. अरुण साधू स्वभावत: संकोची होते. त्यामुळे ते त्यांच्या कर्तबगारीविषयी, यशाविषयी कधीच बोलले नाहीत. पण ‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ या त्यांच्या साहित्य कलाकृती बोलल्या. म्हणूनच त्या चित्रपट रूपाने जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या आणि ‘शोधयात्रा’, ‘मुखवटा’ या कादंब-यांनी त्यांची जीवनाची समज विश्वव्यापक व तेवढीच सखोल असल्याचे दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले.
मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांची पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला. त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढय़ा घडविल्या. वाईट घटनांवर काकदृष्टी ठेवण्याबरोबरच चांगल्या घटनांचेही कोकीळकूजन करा हे त्यांनी नवीन पत्रकारांना शिकविले. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि चतुरस्त्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका, नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून विपूल लेखन केले. विविधांगी स्वरूपाच्या लिखाणाने साधू यांनी पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. गेली ४० वर्षे सातत्याने समकालाचा वेध घेणारे लेखन अरुण साधू यांनी केले होते. तरीही प्रतिभावान कवी-लेखक जसे त्यांच्या स्वत:च्या कल्पनाविश्वाची मिजास मारतात व त्यांचे ते जग सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे असे सुचवतात, तशी त्यांची धारणा अजिबात नव्हती. ते सर्वसामान्यांना जवळ करणारे, समजून घेणारे होते आणि तेच त्यांचे बलस्थान होते.
म्हणूनच कादंबरी लेखनाइतक्याच उत्कटतेने त्यांचे कथालेखन सुरू होते. ‘झिप-या’, ‘विप्लवा’ या प्रथम कथा म्हणून अवतरल्या, नंतर कथासंग्रहात अवतरल्या. कथा कादंब-यांत रमलेल्या साधू यांना वास्तवाचेही भान होते. म्हणूनच रेल्वे स्थानकातील भटक्या मुलांचे जीवन टिपत होते. ‘त्रिशंकू’मधील महत्त्वाकांक्षा जागृत झालेली दलित नायिका एका बाजूला आणि दयनीय जिणे खेळकरपणे जगणारी आणि जगण्याची जिद्द न हरवलेली रेल्वे स्थानकातील अनाथ, बेवारस मुले दुस-या बाजूला. त्यांच्या लेखनात मानवी करुणा ओतप्रोत भरलेली आहे, ते अस्सल मानवी भावभावनांचे सामाजिक जग आहे. माणूस म्हणून जगणा-या अणि जगायला शिकवणा-या साधूंना ‘प्रहार’ परिवाराची विनम्र श्रद्धांजली!