जगभरात आज (१८ एप्रिल) जागतिक वारसा दिन साजरा केला जात आहे. जगभरात साजरा केला जाणारा हा ३४ वा जागतिक वारसा दिवस आहे. भारतातील ३७ स्थळांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे. ही ऐतिहासिक वारसा स्थळे जतन करणे, त्यांचा बाज आणि आगाज कायम ठेवणे हे आपल्यासमोरील आद्य कर्तव्यच आहे.
झी मराठीवर सध्या गाजत असणा-या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादा आणि अंजलीबाईंनी आपल्या हनिमून प्रवासादरम्यान भेटणा-या हुल्लडबाज उत्साही तरुणांना आपली ऐतिहासिक परंपरा, आपले गड किल्ले ही आपली परंपरा आहे. या वास्तू आपल्या प्रेमाच्या प्रदर्शनासाठी वा आपली नावे कोरण्यासाठी नाहीत, असे प्रबोधन केले होते. कदाचित मालिकेतला हा ट्विस्ट अनेकांना पचला नसेलच. मात्र मिळेल त्या मार्गाने पर्यटकांना अशा कानपिचक्या देण्याची नितांत आवश्यकता आहे. आज राज्यातल्या कोणत्याही वारसा स्थळावर नजर टाकली, तर राज्याच्या कानाकोप-यातून सहलीला, भटकंतीसाठी आलेल्या अनेकांचा डेटा सहजपणे उपलब्ध होईल इतक्या ठळक अक्षरात वाट्टेल तिथे रेखाटून नतद्रष्टांनी आपली हौस भागवलेली दिसते.
सध्या उन्हाळी सुट्टय़ांचा हंगाम सुरु आहे. मुलांसोबत पर्यटनास बाहेर पडणा-या पालकांना सर्वात पहिल्यांदा आठवण होते ती, आपल्या आसपास, राज्यात असणा-या ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, समुद्र किनारे आणि वस्तू संग्रहालयांची. आपला ऐतिहासिक वारसा बघावा, त्याविषयी माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचावी याकरीता सर्वच पालक प्रयत्न करीत असतात. हल्ली कोणत्याही पर्यटनस्थळावर आलेल्या गर्दीवर नजर टाकली असता काय दिसते, तर तुफान गर्दी. ज्यात हौसे, गवसे आणि नवसेही असतात. अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी, अभ्यासक अशा सर्वांचीच हजेरी याठिकाणी असते. मात्र फक्त पर्यटन, मजा असे इतकेच याचे स्वरुप राहते. तिथे आपण निश्चितच कमी पडतो आहोत, असे वाटते.
मुळात जागतिक वारसा म्हणजे काय? तर ज्या स्थळांना, वास्तूंना सांस्कृतिक, भौगौलिक आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्व आहे. त्यासम दुसरी वास्तू तयार करणे कठीण आहे. १९८२ मध्ये टय़ुनेशियामध्ये एक जागतिक परिषद भरलेली होती. या परिषदेत अशाप्रकारच्या प्राचीन परंपरांचे जतन जगभरात केले जावे यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि १९८३ पासून १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून जगभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.
जगभरातल्या अशा वास्तूंचा शोध घेवून त्यांची नोंद युनेस्कोने जागतिक वारसा वर्गात केली आहे. शिवाय या सर्व स्थळांकरीता युनेस्कोच्यावतीने त्या त्या देशांना अनुदानही दिले जाते. सध्या जगभरातील १५३ देशांमध्ये ९३६ इतक्या जागतिक वारसा स्थळांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १८३ नैसर्गिक स्थळे, ७२५ सांस्कृतिक, तर २८ स्थळे ही मिश्र स्वरुपाची आहेत. भारतातील ३७ पैकी, २७ सांस्कृतिक, ७ नैसिर्गिक आणि १ मिश्र अशी जागतिक वारसा स्थळे आहेत.
इटलीमध्ये सर्वाधिक वारसा स्थळे आहेत. आपल्या देशांतील प्राचीन स्मारके, इमारती या देशाचा मौल्यवान खजिना आहेत. हा आपला सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत त्याच्या ऐतिहासिक नोंदीसह टिकविणे, तो जतन करणे, त्याचा प्रसार करणे आदी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.
युनेस्कोच्या वतीने दरवर्षी जागतिक वारसा दिवसाकरीता एक थीम ठरवली जाते आणि त्यानुसार वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. यंदाची थीम ‘सांस्कृतिक वारसा आणि शाश्वत पर्यटन’ अशी आहे. यानुसार जगभरातल्या जागतिक वारसा स्थळांना जाणा-या पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता विविध उपक्रमांसोबतच पर्यटकांनी अशा वारसा स्थळांची नासधूस करू नये, तसेच या स्थळांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, याकरीता प्रयत्न केले जातील.
एकट्या मुंबईतील वारसा स्थळांचा विचार केला असता, असे लक्षात येते की, दरवर्षी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबई वारसा संवर्धन समितीद्वारा मुंबईतल्या प्राचीन वास्तू, मंदिरे, हॉस्पिटल्स, स्मारके, पादचारी पूल, आदींचे जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली जात असली तरी कधी अधिका-यांची नेमणूक नसणे, वा विरोधाला विरोध ही भूमिका घेत अनेक चांगल्या सुधारणांना होत असणारा विरोध यात मुंबईतल्या अनेक वास्तूंचे जतन करण्यात, त्यांची डागडूजी करण्यात अडचणी येतात. अनेक वारसा स्थळांबाबत समितीच अनभिज्ञ आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मुंबईकर नेटक-यांनी आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याकरीता फेसबुकच्या माध्यमातून एक मोहिम सुरु केली आहे. उदा. गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळाबाबत ज्यांनी ज्यांनी इथे भेट दिलेली आहे, त्यांनी त्यांनी आपला अनुभव शेअर करावयाचा आहे आणि जगभरातून फक्त भारतीयांचाच नाही तर विदेशी पर्यटकांनीही या पेजला मोठया प्रमाणात आपले अनुभव शेअर करीत प्रतिसाद दिला आहे. याच पद्धतीने अनेक सोशल ग्रूपने पुढाकार घेत मुंबईतल्या विविध वास्तुंच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. असे प्रयोग प्रत्येकानेच आपापल्या गावातील ऐतिहासिक खुणा, वास्तू, आठवणीं यांचे जतन करण्याकरीता करावेत, असे वाटते. यातून एकतर आपलाच इतिहास आपल्याला नव्याने कळतो, त्या निमित्ताने ज्येष्ठांशी संवाद साधला जाईल, त्यांच्या आठवणीतल्या मात्र पुसट होत चाललेल्या अनेक गोष्टी संग्रही ठेवता येतील. आजच्या दिवशी फक्त जागतिक नोंद असणा-या वास्तूंच्या जतनाविषयीच विचार व्हावा, असे काहीच नाही, उलट आजच्या दिवसाची प्रेरणा घेत आपण आपल्या आसपास आढळणा-या इतिहासाच्या, परंपरेच्या पाउलखुणां जपूयात, श्रमदानाने त्यांचे सुशोभिकरण करूयात.. आाणि जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करूयात..
गत काही दशकांत जागतिक पर्यटनांत झालेली वाढ आणि ऐतिहासिक वास्तू असणा-या ठिकाणांना भेट देण्याचा पर्यटकांचा कल लक्षात घेत युनेस्कोने पर्यटनाला महत्व देतानाच वारसा स्थळांपर्यंत अधिकाधिक पर्यटक यावेत, असा प्रयत्न ही थीम निवडताना केलेला आहे.
मुळातच आपल्या ऐतिहासिक वास्तू, प्राचीन परंपरा या आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या जीवनशैलीचा भाग असतात. कारण आपली जडण घडण यातूनच तर झालेली असते. एका अर्थाने वारसा म्हणजे ममत्वाचा मातृत्वाचा विषय ठरतो. असे असताना केवळ मौज मस्तीत आपणच आपल्या श्रध्दा, मानके यांचा अपमानच करतो आहोत, हे आपण कधी लक्षात घेणार? आजच्या दिवशी किमान आपला वारसा जतन करण्याकरीता आपल्या आसपासच्या ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळांची अव्याहतपणे काळजी घेणा-या संस्था, व्यक्ती यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे आभार मानूया आणि आपला वारसा जतन करण्याचा वसा घेऊया.