कन्नड विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात ढिसाळपणा होत असल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड साहित्यिकांनी आपले पुरस्कार कन्नड साहित्य परिषदेला परत केले आहेत.
बंगळूरु- कन्नड विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात ढिसाळपणा होत असल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड साहित्यिकांनी आपले पुरस्कार कन्नड साहित्य परिषदेला परत केले आहेत.
कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुंडलिक हलाम्बी म्हणाले की, कलबुर्गी यांच्या हत्येला महिना पूर्ण झाला. मात्र त्यात कोणतीही प्रगती नाही. त्यांच्या हत्येचा तपास अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे कन्नड साहित्य विश्वात अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे.
अरालू साहित्य पुरस्कार विजेत्या साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले. वीरण्णा माडीवालर, टी. सतीश जवरे गौडा, संगमेश मेनासिनाकी, हनुमंथ हालीगेरी, श्रीदेवी व्ही. अलूर, चिदानंद साळी या साहित्यिकांना २०११ मध्ये हे पुरस्कार प्रदान केले.
याच कार्यक्रमात कलबुर्गी यांना नृपतुंगा प्रशस्ती पुरस्काराने गौरवले होते. तसेच ज्येष्ठ कन्नड लेखक चंद्रशेखर पाटील यांनी राज्य सरकारचा ‘पम्पा’ पुरस्कार सरकारला यापूर्वीच परत केला आहे.
हलाम्बी म्हणाले की, कलबुर्गीच्या हत्येच्या निषेधार्थ तरुण लेखकांनीही त्यांचे पुरस्कार परत केले आहेत. या प्रकरणातील सूत्रधारांना तातडीने अटक करण्याची मागणी साहित्यविश्वातून केली जात आहे. लेखकांनी पुरस्कार परत देण्याऐवजी त्यांनी सरकारशी चर्चा करून तपासाचा वेग वाढवण्याची मागणी करावी. मात्र, लेखक आपल्या मागणीवर ठाम राहिले.