सहारणपूर येथील दंगलीस चौकशी समितीने प्रशासकीय अधिका-यांना जबाबदार ठरवले आहे.याप्रकरणात भाजप खासदाराचा हात असल्याचा आरोपही समितीने केला आहे.
लखनऊ – सहारणपूर येथील दंगलीस चौकशी समितीने प्रशासकीय अधिका-यांना जबाबदार ठरवले आहे. याप्रकरणात भाजप खासदाराचा हात असल्याचा आरोपही समितीने केला आहे.
गेल्या महिन्यात सहारणपूर येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मंत्री शिवपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये ग्रामविकास मंत्री अरविंद सिंग गोपे, समाजवादी पक्षाचे नेते आशू मलिक आणि हाजी इक्रम कुरेशी यांचा समावेश होता.
समितीकडून याप्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात भाजप खासदारावरही दंगलीबाबत आरोप ठेवण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव नरेश अग्रवाल यांनी सांगितले. सहारणपूर दंगलीवर नियंत्रण मिळवण्यास जिल्हा प्रशासकीय अधिका-यांना पू्र्णपणे अपयश आले. रमजानच्या महिन्यात कोणत्याच गटास त्या जमिनीवर बांधकाम करण्यास प्रशासकीय अधिका-यांनी परवानगी द्यायला नको होती, असे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, भाजप खासदारांवर केलेला आरोप भाजपचे प्रवक्ते विजय बहादूर पाठक यांनी अमान्य केला आहे. ही दंगल रोखण्यास प्रशासकीय अधिका-यांना अपयश आले असताना भाजप या दंगलीस कसा काय कारणीभूत ठरु शकतो असा सवाल पाठक यांनी केला आहे. हा सरकारचा अहवाल नसून पक्षाचा आहे. यावेळीही समाजवादी पक्ष भाजपला दोष देत आहे. असे पाठक म्हणाले.
१६ जुलै रोजी सहारणपूर येथील जमिनीच्या वादावरुन दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला होता तर २० जण जखमी झाले होते.