आपल्या पहिल्याच कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात, गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक.
![shevgyachya shenga](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/05/shevgyachya-shenga.jpg)
लेखक / दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे
कलाकार : अतिशा नाईक, कादंबरी कदम, निखिल राज, संजय मोने, स्वाती चिटणीस
आपल्या पहिल्याच कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात, गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक. त्यांच्या पहिल्या एकांकिकेनं त्यांच्याविषयी रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या. त्यांच्याकडे काही एकांकिका लिहून तयार आहेत, असंही कानावर आलं आणि हा लेखक बहुप्रसवा आहे, याची खात्रीच, नजीकच्या काळात, त्यांनी पटवून दिली. आपल्या आत्मविष्काराचा, जे सांगायचं आहे.. मांडायचं आहे. त्याचा पट ते विस्तारित गेले. एकांकिकेनंतर त्यांनी ‘नाटक’ लिहिलं ते ‘उंच माझा झोका गं’ ते लता नार्वेकर यांनी आपल्या ‘श्री चिंतामणी’ या नाटय़संस्थेतर्फे रंगमंचावर आणलं, त्याला उत्तम व्यावसायिक यश लाभलं.
पहिलीच नाटय़कृती व्यावसायिकदृष्टया यशस्वी होऊनही अहिरे रंगभूमीवर फारसे रमले नाहीत. त्यांना अधिक सशक्त, आव्हानात्मक माध्यम खुणावू लागलं होतं. ‘उंच माझा..’ त्याच मध्यवर्ती कल्पनेवर त्यांनी ‘सरीवर सरी’ हा चित्रपट घेतला. इथं ते रमले, पण ‘पांढर’ते ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’पर्यंत त्यांनी चित्रपटात आपला वेगळा ठसा उमटवला.
कधी एखादा विषय, त्याचा स्वत:चाच फॉर्म घेऊन सर्जकाच्या मनात अवतरतो. त्या फॉर्माशिवाय अन्य फॉर्ममध्ये त्याचा विचारच होत नाही. विविध वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये निर्माण होणा-या नातेसंबंधांचा विचार गजेंद्र अहिरेंना असाच सुचला, पण त्या आविष्कारासाठी त्यांना ‘नाटक’ हेच माध्यम सुयोग्य वाटलं. झपाटल्यागत त्यांनी ते लिहून काढलं. त्याचं नामकरण केलं ‘शेवग्याच्या शेंगा.’ (शेवग्याच्या शेंगांना स्त्री-पुरुष संबंधामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहेच.)
‘शेवग्याच्या शेंगा’चे वैशिष्टय असं की यात ‘नातेसंबंध’ या विषयालाच प्राधान्य आहे, त्यामुळे खालील पात्रं ही लेखकाच्या विकारांना, विधानांना पुरस्कृत करण्यासाठी येतात.. पण तरीही ही पात्रं दुय्यम स्तरावर जात नाहीत. (कसं? त्यासाठी हे नाटकच पाहायला हवं.) याची मांडणी ‘रिव्ह्यू पद्धती’ची त्याला सलग कथानकाची आवश्यकता नसतेच. पण तरीही त्याचं अंतर्गत सूत्र मात्र हरवता नये, हे बंधन असतं, त्याचा प्रत्यय या लेखनात येतो.
आपल्याला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं आहे याचा पक्का आराखडा महेंद्र अहिरे यांच्या डोक्यात असतो. म्हणूनच इथंही, त्यांची पात्रं कृत्रिम वाटत नाहीत. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या वागण्या-बोलण्याला भवतालच्या परिस्थितीची दिलेली पार्श्वभूमी त्या पात्रांना रसिकांच्या आसपासच्या, ओळखीच्या माणसांपर्यंत आणून सोडण्याची ताकद अहिरेंच्या विचारात आहे. सुधीर ससाणे आणि विमन बर्वे ही एकाकी माणसं, पण त्यांची एकाकीपणाची दु:खं वेगळी आहेत. त्यांचा सहजीवनाचा अर्थ वेगवेगळा, पण तरीही आता सहका-याशिवाय अधुरा. आता उतारवयात ती दोघं एकत्र येऊन नवं सहजीवन सुरू करू शकतील. पण पुन्हा सामाजिक संकेत, ‘त्यांची’च ‘आपली’ माणसं आणि ‘समाज’ यांच्या अडथळ्यानं, त्यांच्या सहजीवनाचं स्वप्न पूर्ण होणार का? (ते पाहायलाच हवं.) एकाकीपण दूर होणार का?
त्याच ‘सोसायटी’त एकाकी राहणारी आरती मध्यमवयीन घटस्फोटिता ती सृजनशिल. ‘माती’च्या भांडयात आपली ‘कला’ जोपासतानाच आपला ‘वेळ’ घालवणारी खरं तर ‘शेवग्याच्या शेंगा’मधील सारीच पात्र आपल्या परीनं जीवनाला अर्थपूर्ण करण्याची, जीवन जगण्याची धडपड करणारी आहेत.
विजया-राहुल हे तरुण पिढीचे प्रतिनिधी. याचं ‘प्रेम’पूर्वक नातं जपणं आजच्या व्यावहारिक जगात ओढग्रस्तीचं झालंय. आजच्या पिढीसमोर भावना, माणुसकी, नातेसंबंधापेक्षा पैसा, व्यवहार, करिअर याला महत्त्व. विद्या ही विचारापेक्षा भावनेला कॉल देणारी, तर राहुल ‘व्यवहारा’त गुंतलेला. विमलचा मुलगा रंजन हाही आत्यंतिक व्यवहारवादी. आपली आई आणि ससाणे एकत्र आले, तर ‘प्रॉपर्टी’त एक हक्कदार वाढेल, याची त्याला भीती. त्यासाठी आपल्या आईच्या आवश्यकतेपेक्षा, गरजेपेक्षा तो स्वत:ची ‘सोय’ पाहतो. तर आपल्या ‘प्रेमा’त कुणी वाटेकरी आहे, हे कळताच ‘विजया’चं काय होतं? तिने स्वत:साठी छायाचित्रणाचा घेतलेला ‘छंद’ तिच्या जाण्याचा, स्वत:ला गुंतवून ठेवण्याचाच भाग, पण सहजीवनात ‘जोडीदारा’ची जागा छंद घेऊ शकेल काय?
विमलनं घरातल्या बागेची काळजी घेणं काय, आरतीचं मातीची भांडी, मुखवटे घडवणं काय किंवा विजयाचं छायाचित्रण हे सारं स्वत:लाच ‘गुंतवून’ घेणं आहे. एवढंच नव्हे तर ससाणेंचं पानाच्या गादीवर येणा-यांची, त्यांच्या सवयी-व्यसनांची नोंद घेणं हेही ‘टाईम किलिंग’ करणारं आहे. गजेंद्र अहिरे यांनी हे सारं ज्या नजाकतीनं नाटकातून, प्रयोगातून मांडलं आहे, ते विलोभनीय आहे.
रिव्ह्यू पद्धतीच्या नाटकांमध्ये विविध स्थळं येतात, त्यासाठी प्रतिभावंत नेपथ्यकार असेल, तर दिग्दर्शकाचं काम सोपं होतं. ‘श्री चिंतामणी’च्या बहुतांश नाटकांचं नेपथ्य करणा-या नितीन नेरुरकर यांनी कल्पकतेनं निर्माण केलेल्या नेपथ्यातून विविध स्थळं, दृष्य परिणामकारकतेनं दाखवणं शक्य झालं. पुन्हा पात्रांच्या आर्थिक स्तराप्रमाणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना समांतर असे संदर्भ नेपथ्यातून दर्शविले आहेत. त्याचा दिग्दर्शकानंही सुबकपणे वापर करून घेतलाय. दिग्दर्शनात अहिरे यांनी प्रयोगाला एक प्रसंगानुसारी लय दिलीय. विजयाचं गांभीर्य अन् महत्त्व जपल्याचं त्यातून जाणवतं. शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेतून त्यांनी कालसंदर्भ तर दिलेच, पण त्या त्या प्रसंगांचा सूड, भावना निर्माण करण्यास सहाय्यही केलं. त्यामुळे प्रेक्षकांवर अपेक्षित परिणाम करणं शक्य झालं. तेजश्री आक्रे (वेशभूषा) आणि सचिन जाधव (रंगभूषा) यांनीही पात्रांची व्यक्तिमत्त्वं ठळक करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. गजेंद्र अहिरेंच्या गीतांना नरेंद्र भिडेंनी दिलेली चाल, नाटकाचं पार्श्वसंगीतही उत्तम.
नाटयपरिणाम रसिकांप्रती ठसण्यासाठी कलावंतांचा अभिनय, इतर तांत्रिक अंग यांचा सुयोग्य संगम व्हावा लागतो. सुदैवानं ‘शेवग्याच्या शेंगा’मध्ये हे मस्त जुळून आलंय. निर्मात्या लता नार्वेकर यांनी आपल्या ‘श्री चिंतामणी’ अशी स्वत:ची टीम तयार केलीय. विमल बर्वे आणि सुधीर ससाणे यांच्या भूमिका स्वाती चिटणीस आणि संजय मोने यांनी केल्या. या दोन्ही कलावंतांनी आपल्या पात्रांची मानसिकता, एकाकीपणाचं दु:ख, सहवासाची अपेक्षा आणि समाजसंकेतामुळं होणारी कुचंबणा परिणामकारकतेनं व्यक्त केली. संजय मोने यांनी लंगडत चालण्याच्या लकबीतून जोडीदाराच्या जाण्यानं आयुष्यं ‘ओढण्या’ची प्रतिकात्मकता दर्शवली. त्यांची ही लकब त्या व्यक्तिमत्त्वाला गडद करणारी. मुखवटयामागे दु:ख लपवणारी, ‘माती’तून सौंदर्य जोपासणारी, पण समाजाच्या सृजनात्मकतेत कमी पडलेली आरती, तिच्या थोडया नकारात्मक रंगानेही उठून दिसणारी ‘आरती’ अतिशा नाईक यांनी उत्साहपूर्ण, चैतन्यदायी केली. कादंबरी कदमांची, ‘विजया’ आमच्या ‘समजूतदार’ पिढीची प्रतिनिधी, तर राहुल, रंजन करणारे निखिल राऊत हे व्यवहारवादी वाटले. सीमा पारकर यांनी भाजीवाली, मॅनेजर, ऋतुजा या तिन्ही भूमिकांत ठेवलेलं वैविध्य लक्षणीय. ‘सहजीवना’ची वेगळी चव चाखणा-या शेवग्याच्या शेंगा चाखण्याजोग्या!