कोळसा खाण वाटपावरुन भाजप खासदारांनी गोंधळ घातल्याने सलग बाराव्या दिवशी संसदेचे कामकाज ठप्प राहिले
नवी दिल्ली – कोळसा खाण वाटपावरुन भाजप खासदारांनी गोंधळ घातल्याने सलग बाराव्या दिवशी संसदेचे कामकाज ठप्प राहिले. शनिवार अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. केंद्र सरकारची कोळसा खाण वाटपावर चर्चेची तयारी असतानाही, आपल्या मागण्यांसाठी भाजपने एकही दिवस संसदेचे कामकाज सुरळीत चालू दिले नाही. सभागृहाचे कामकाज सुरु होताच संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजप खासदारांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन गोंधळ घालायला सुरुवात केली.
त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली. दुपारनंतर लोकसभेचे कामकाज सुरु होताच भाजप सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळया जागेत धाव घेत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी सुरु केली. यावेळी काँग्रेस आणि भाजप खासदार परस्परांविरोधात घोषणाबाजी करत होते. तर डीएमके, अण्णाद्रमुकचे सदस्य श्रीलंकन लष्कराला भारतात प्रशिक्षण देण्याचा विरोध करत होते. या गदारोळामुळे अखेर लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
राज्यसभेतही असेच चित्र होते. दुपारनंतर येथे कामकाज सुरु होताच सपा सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळया जागेत अनुसूचित जाती-जमातींना सरकारी नोक-यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या प्रस्तावाविरोधात घोषणाबाजी करत होते तर भाजप खासदार कोळसा खाण वाटपावरुन विरोध करत होते. अखेर दुपारी दोनपर्यंत राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.