सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना डावलून अन्य जिल्ह्यांतील कामगारांची भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईडीसीएल) घेतला आहे.
![26 MLV 002](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/07/26-MLV-002-300x150.jpg)
मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना डावलून अन्य जिल्ह्यांतील कामगारांची भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईडीसीएल) घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय तर होतोच पण, याबरोबरच अन्य जिल्ह्यांतून येणा-या उमेदवाराला जिल्ह्याचे भौगोलिक ज्ञान नसल्यामुळे कामावरही परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एमएसईडीसीएलने सर्वच जिल्ह्यांत त्या त्या ठिकाणच्या भूमिपूत्रांनाच सेवेत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष नितेश राणे यांनी शुक्रवारी मालवण येथे एमएसईडीसीएलच्या अधिका-यांबरोबर झालेल्या बैठकीत केली.प्रत्येक जिल्ह्यातील भूमिपुत्रांवर अन्याय करणारे धोरण एमएसईडीसीएलच्या वरिष्ठ अधिका-यांनी चालवले आहे. मात्र भूमिपुत्रांवर अन्याय करणारे हे धोरण कदापि या जिल्ह्यात राबवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगार व वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता अजित महादार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील तरुणांनी तुटपुंज्या पगारावर गेली नऊ वष्रे काम केले आहे. वीज वितरणची वसुलीही करून दिली आहे. परंतु ज्या वेळी कायमस्वरूपी भरती करायची वेळ आली त्या वेळी मात्र कंपनीने अन्य जिल्ह्यांतील युवकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यांतील कंत्राटी कामगारांनी हे निदर्शनास आणल्यावर, नितेश राणे यांनी एमएसईडीसीएला सूचना करून जिल्ह्यातीलच कंत्राटी कामगारांनाच सेवेत कायम करावे अशी मागणी केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी मालवण येथे नितेश राणे यांच्याकडे त्यांची भूमिका मांडली. या वेळी महादार यांनी, जिल्ह्यातील युवकांना कंपनीने कायमस्वरूपी सेवेत घ्यावे असा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला आहे. परंतु वरिष्ठ पातळीवर वेगळा निर्णय झाल्याने नुकत्याच झालेल्या नवीन भरतीमध्ये ज्याप्रमाणे येथे कामगार हजर होतील, त्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना कमी करावे लागणार आहे, अशी भूमिका स्पष्ट केली.
वीज वितरणच्या वरिष्ठ पातळीवर याबाबतचे धोरण ठरले असले तरी ते आपण या जिल्ह्यात राबवू देणार नाही, असे स्पष्ट करत नितेश राणे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील भूमिपुत्रांना स्थानिक पातळीवरच एमएसईडीसीएलने नोकरीत सामावून घेतले पाहिजे. जिल्ह्यातील तरुणांनाच सेवेत सामावून घेतल्यास तो त्या जिल्ह्यात योग्य पद्धतीने काम करू शकतो. परंतु एका जिल्ह्याच्या तरुणाला दुस-या जिल्ह्यात सामावून घेतल्यामुळे त्याच्या कामावर निश्चितच परिणाम होतो.त्यामुळे एकप्रकारे त्या उमेदवारांवरही अन्याय होतो. त्यांना कुटुंबकबिल्यासह दुस-या जिल्ह्यात मुक्काम हलवावा लागतो. त्यामुळे सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो वा जळगाव, पुणे सर्वच जिल्ह्यांमधील स्थानिकांना त्यांच्याच जिल्ह्यांमध्ये सामावून घेतले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी मांडली.