मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर रोजच्या रोज नवनवीन घोषणा करून सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी चालवली आहे.
नवी दिल्ली- मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर रोजच्या रोज नवनवीन घोषणा करून सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी चालवली आहे. जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात पूर्वी रोज ४ हजार रुपये दिले जात होते.
शुक्रवारपासून खातेदारांना केवळ दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यातही जाचक अट म्हणजे ३० डिसेंबर6पर्यंत एका व्यक्तीला एकदाच नोटा बदलून मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर कसे चालवायचे व नोटा कशा बदलून मिळणार याची चिंता लागली आहे.
केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी गुरुवारी विविध निर्णय जाहीर केले. नोटा बदलाना आता ४५०० रुपयांऐवजी २००० रुपये मिळतील. तर ३० डिसेंबपर्यंत एका व्यक्तीला केवळ एकदाच नोटा बदलून मिळणार आहेत. देशात रोख रकमेची चणचण नसून पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लग्नासाठी अडीच लाखांपर्यंत रक्कम मिळणार
सध्याचा लग्नाचा मोसम पाहता लग्नासाठी २.५० लाख रुपये रक्कम बॅँकेतून काढण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ही रक्कम वधू किंवा वराच्या आई, वडिलांच्या किंवा वधू किंवा वराच्या खात्यातून काढली जाऊ शकते. त्यासाठी त्यांची केवायसी गरजेची आहे. त्यांना लग्न पत्रिका, प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
शेतक-यांना आठवडय़ाला २५ हजार
एपीएमसीत नोंदणी केलेल्या व्यापा-यांना ५० हजार रुपये काढता येणार आहेत. शेतक-यांना दर आठवडय़ाला पीक कर्जासाठी मंजूर केलेले २५ हजार रुपये काढता येतील. शेतकरी किसान क्रेडिट कार्डचा वापरही करू शकतील. शेतक-यांना आरटीजीएस किंवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे मिळाले असल्यास ते आठवडय़ाला २५ हजार रुपये काढू शकतात.
सरकारी ‘क’ श्रेणी कर्मचा-याला १० हजार रुपये अॅडव्हान्स
संरक्षण, रेल्वे व सार्वजनिक सेवा क्षेत्रातील ‘क’ श्रेणी कर्मचा-यांना १० हजार रुपये अॅडव्हान्स मिळू शकेल. त्यानंतर ते पैसे नोव्हेंबरच्या पगारात अॅडजेस्ट केले जातील. यामुळे बॅँकांवरील दबाव कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
टोलमाफी २४ नोव्हेंबपर्यंत
नवी दिल्ली : पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्याने निर्माण झालेला तिढा लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफी सरकारने २४ नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी सरकारने टोलमाफीची मुदत तीन वेळा वाढवली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.