भाजपाचे टाग्रेट वेगळे आहे. आम्ही सांगू तीच देशभक्ती, असे समीकरण भाजपा आणू पाहते आहे. खूप सा-या गोष्टी कबूल करून भाजपा सत्तेत आला. पण कबूल केलेल्या गोष्टी देणे शक्य नाही हे कळल्यानंतर त्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ‘भारतमाता की जय’ हा नवा फंडा काढला आहे.
विचारांची स्पष्ट भूमिका नसेल तर त्या व्यक्तीचा संघवाला होतो आणि पुढे ‘सरसंघचालक’ होतो. विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांचे सध्या असेच सुरू आहे. ओठावर एक, पोटात दुसरेच. एखादी भूमिका ते मांडतात आणि काही दिवसांनी शब्द फिरवतात. ‘आरक्षणाच्या धोरणाचा आढावा घेतला पाहिजे’ असे वक्तव्य त्यांनी बिहार निवडणुकीच्या आधी केले होते. भाजपाला ते खूप महागात पडले. नंतर त्यांनी सारवासारव केली. पण बाण सुटला होता.
‘भारतमाता की जय’ म्हणायला आजच्या पिढीला सांगावे लागते’ असे बोलून काही दिवसांपूर्वी यांनी उभे केलेले वादळ अजूनही घोंघावते आहे. ‘घटनेत तसे कुठे लिहिले आहे?’ असा सवाल करून हैदराबादचे एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी आग लावली. एमआयएमचे महाराष्ट्रातील आमदार वारीस पठाण यांनी तर विधानसभेत हा विषय आला तेव्हा निलंबित होणे पसंत केले.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने नुकताच ठराव करून, हा विषय उचलून धरला. ‘भारतमाता की जय हा नारा नसून, मंत्र आहे’ असे म्हटले. एवढे सारे रामायण झाल्यानंतर नरमलेले मोहन भागवत आता म्हणतात की, ‘भारतमाता की जय’ म्हणायला सक्ती नको. ‘आम्हाला आमचे विचार लादायचे नाहीत. लोक स्वत:हून भारतमातेचा जयजयकार करतील असा भारत आम्हाला घडवायचा आहे.’
भारतमातेच्या गोष्टी करणा-या भाजपाला काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारमध्ये सामील होताना कसलीही लाज वाटत नाही. सवाल हा आहे की, देशापुढे इतर महत्त्वाचे प्रश्न असताना असले नॉन-इश्यू उकरून काढून संघ परिवार काय साधू पाहतो? आपली घटना आपण काळजीपूर्वक वाचली तर तिच्यात कुठेही कुठलाही नारा नाही. घटनेने नागरिकांची कर्तव्ये सांगितली आहेत. समानता आणि बंधुभावाची भाषा घटना करते. घटनेच्या शेडय़ूल ३ मध्ये भारत, माता किंवा भारतमाता असा कुठलाही शब्द नाही. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यात चुकीचे काहीही नाही. ती एक अभिव्यक्ती आहे. पण तसे म्हटले नाही म्हणजे ती व्यक्ती देशद्रोही ठरते असे नाही. त्याने घटनेचा अनादर केला असेही होत नाही. स्वातंत्र्यलढयात ‘भारतमाता की जय’ हा नारा नव्हताच. शहीद भगतसिंग ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा देत असत. नेताजी सुभाषचंद्र बोस ‘जय हिंद’ म्हणत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या देशप्रेमाबद्दल संशय घेण्याचे कारण नसावे. महात्मा गांधी यांनीही कधी ‘भारतमाता की जय’ म्हटल्याचे वाचण्यात नाही. मग संघ परिवाराने हा नारा कुठून आणला आणि आज त्यासाठी हट्ट धरण्यामागे भाजपाचे काय षड्यंत्र आहे?
एकेकाळी या परिवाराचा नारा वेगळा होता. ‘भारत में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा असा नारा एकेकाळी दिला जाई. तेव्हा भाजपा विरोधी पक्षात होता. आज सत्तेत आहे. वंदे मातरम्चा नारा आम्ही सोडून दिला, असे सरसंघचालक भागवत म्हणाले नाहीत. कारण भाषा बदलली तरी, अजेंडा तोच आहे. हिंदू राष्ट्र. ते स्वप्न साकार करण्यासाठी परिवार वेगवेगळ्या खेळी खेळत असतो.
हुकूमशहा हिटलरने हेच केले. हिटलरने राष्ट्रवाद उकरून काढला. भाजपाही त्याच चालीवर आहे. सारे भयंकर लोक हेच करतात. कुठले गाणे देशभक्तीचे आणि कुठले देशद्रोही? याचा निर्णय सत्ताधारी कसे करू शकतात? देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार त्यांना घटनेने दिलेला नाही. देशभक्ती ही प्रेरणा आहे. स्वातंत्र्याची भावना व्यक्त करायचे ते एक माध्यम आहे. त्याला चाकोरीत बांधून ठेवता येत नाही आणि हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात देशभक्ती व्यक्त करायला कुणाला वेळ आहे? प्रचंड गरिबी, बेकारी, गळेकापू स्पर्धा असलेल्या या देशात सामान्य माणसानेच हा देश एकजिनसी राखला आहे. त्याचा देव, त्याची निष्ठा, त्याचे प्रेम वेगवेगळे असेल, पण त्याच्या विचाराची बैठक मजबूत आहे. कुणी दगडाला पूजतो तर कुणी समुद्राला. भरत, भारत, भारतमाता.. भरतावरून भारत हे नाव पडले. प्राचीन भारतवर्षात ‘भरत’ नावाचे असंख्य महापुरुष आढळतात.
ग्रीक लोक सिंधू नदीच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील प्रदेशातील लोकांना ‘इंडोल’ असे म्हणत असत. त्यावरून ‘इंडियान’ हा शब्द बनला आहे. भारताच्या राज्यघटनेत या देशाला ‘इंडिया’ म्हटले आहे. स्वातंत्र्य लढयात अनेक मुस्लीम फासावर गेले. मुस्लिमांविषयी आज शंका घेणा-या लोकांचा त्या लढयात मात्र पत्ता नव्हता. कवी इक्बाल यांनी एका व्यासपीठावरून ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ म्हटले तेव्हा त्यांनाही कल्पना नसेल की, १०० वर्षानंतरही भारताची ओळख स्वत:ला पटवण्यासाठी घराघरात याच ओळी गायल्या जातील. इक्बाल म्हणतात, ‘मजहब नाही सिखाता, आपस मे बैर रखना, हिंदी है हम, वतन है, हिंदोस्ता हमारा.’ किती जणांची या ओळींवर श्रद्धा आहे? खरेच, आपण स्वत:ला पूर्णवेळ भारतीय मानतो का? कधी आपण हिंदू असतो तर कधी मुसलमान. कधी मराठा तर कधी ब्राह्मण. कधी श्रीमंत असतो तर कधी गरीब.
केवळ भारतीय म्हणून जगावे असे आपल्यापैकी किती लोकांना वाटते? इक्बाल म्हणतात, ‘गुरबत हो अगर हम, रहता है दिल वतन मे, समझो वही हमे भी, दिल हो जहा हमारा.’ जिथे आपले मन, तिथेच आपला देश, असे इक्बाल यांना अपेक्षित होते. स्वातंत्र्य तर मिळाले; पण मनातला हा ‘वतन’ कुठेतरी हरवला. कुणी आपल्या धर्मात देश शोधू लागला, तर कुणी आपल्या राज्यात. ‘सारे जहाँ से अच्छा’ आज उरले ते केवळ मोबाईलवरील रिंगटोनपुरते. हे दिवस पाहायला गांधीजी जिवंत नाहीत, तेच बरे. ते असते तर ‘हे राम’ म्हणण्याची वेळ त्यांच्यावर पदोपदी आली असती.
भाजपाला हे छान कळते. पण वळत नाही. कारण भाजपाचे टाग्रेट वेगळे आहे. आम्ही सांगू तीच देशभक्ती, असे समीकरण भाजपा आणू पाहते आहे. खूप सा-या गोष्टी कबूल करून भाजपा सत्तेत आला. पण कबूल केलेल्या गोष्टी देणे शक्य नाही हे कळल्यानंतर त्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ‘भारतमाता की जय’ हा नवा फंडा काढला आहे. १९९० अयोध्या आंदोलनाने भाजपाला ताकद दिली होती.
आता भाजपा तसलीच धार्मिक धुंदी आणू पाहात आहे. इंग्रजांचे राज्य होते तेव्हा कदाचित ‘भारतमाता की जय’ हा नारा योग्यही असेल. पण आज ७० वर्षानंतर देशाला ‘भारतमाते’पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. दिल्लीच्या नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया याच विचाराने पुढे येतोय. त्याच्या नेतृत्वात देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत, हा शुभ संकेत मानावा लागेल.