केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्क्यांची वाढ केल्याने एक कोटी कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे.
नवी दिल्ली- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे केंद्राच्या एक कोटी कर्मचारी व निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या सरकारी कर्मचा-यांना ११३ टक्के महागाई भत्ता मिळत होता, मात्र आता त्यात ६ टक्के वाढ करण्यात आल्याने तो आता ११९ टक्के होणार आहे. ही वाढ एक जुलै २०१५ पासून लागू होणार आहे. यामुळे केंद्र सरकारमधील ४८ लाख कर्मचा-यांना आणि ५५ लाख निवृत्तीधारकांना लाभ होणार आहे.
महागाईमध्ये वाढ झाल्यामुळे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. यासाठी सात हजार ६९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निवृत्तीधारकांना देण्यात येणा-या भत्त्यासाठी पाच हजार १२७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती. ही वाढ एक जानेवारी २०१५ पासून लागू करण्यात आली होती.