वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सम-विषम योजनेला दिल्ली उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.
नवी दिल्ली- वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सम-विषम योजनेला दिल्ली उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे येत्या १५ जानेवारीपर्यंत सम विषम योजना सुरू राहणार आहे.
ही योजना लागू केल्यापासून दिल्लीतील प्रदूषण किती प्रमाणात कमी झाले, याची आकडेवारी सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केली.
दिल्लीमध्ये वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आठवडाभरासाठी दिल्ली सरकारने हा नियम लागू केला होता. आठ जानेवारीला या योजनेची मुदत संपली. मात्र प्रदूषण कमी झाल्याचे निष्कर्ष काढता येणार नसल्याने आणखी काही दिवस हा नियम सुरू ठेवावा, असे दिल्ली सरकारने विनंती केली होती.
त्यानुसार ११ तारखेपर्यंत हा नियम सुरू ठेवावा आणि आकडेवारी देण्यात यावी, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यावर सोमवारी निर्णय घेण्यात आला आहे. या सम-विषम योजनेसंदर्भात पुढील सुनावणी आता १५ फेब्रुवारीला होणार आहे.