सनातनच्या समीर गायकवाड याला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई- सनातनच्या समीर गायकवाड याला कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. या आरोपीला सोडवायला २५ ते ४० वकिलांची फौज न्यायालयात आली होती. यामागे कोणाचे डोके आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. सरकारच्या मदतीनेच हे होत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
वाशी येथे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. सनातनचा समीर गायकवाड याला सोडविण्यासाठी वकिलांची फौज कोणी उभी केली हा सवाल करून अजित पवार यांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
मोदी सरकार फक्त निवडणूक काळात पैसे वाटण्याची घोषणा करते. इतर वेळी मात्र लक्ष देत नाही. बिहारमध्ये निवडणुका असल्याने सव्वा लाख कोटी रुपयांची मदत घोषित केली. मात्र राज्यात दुष्काळपीडित शेतक-यांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही, असेही त्यांनी सांगितले. मोदी हे त्यांच्या सभेत किती आíथक मदत पाहिजे असा पुकारा करून लोकांचा लिलाव मांडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यांत्रिकीकरण वाढत असल्याने भविष्यात माथाडी कामगारांना आधुनिकीकरणाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुढील पिढीस चांगले शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सल्ला पवार यांनी दिला. राज्य सरकार कायम पैसे नाहीत, अशी टेप लावते. मग एलबीटी कशाला रद्द केला असा सवालही त्यांनी केला. सनातनवरील चौकशीमध्ये जे समोर येत आहे त्यावरून सरकारने गांभीर्याने चौकशी करून कारवाई करावी, असे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केले.