३ ऑगस्ट १७३० रोजी चिमाजी आप्पांच्या पोटी जन्मलेले सदाशिवरावभाऊ म्हणजे पानिपतच्या त्या लढाईतील मराठय़ांचे सेनापती. आज त्यांचा जन्मदिन. अल्पवयातच राजकारणात उतरलेल्या भाऊंनी सांगोला स्वारी, उद्गीरची लढाई असे पराक्रम गाजवतच पानिपतच्या मोहिमेची सूत्र हाती घेतली होती. या मोहिमेत त्यांना आलेले अपयश आणि वीरमरण ही मराठय़ांच्या इतिहासातील मर्मस्थळे ठरली. भव्य कल्पना, अफाट कर्तृत्व, बुद्धिमत्तेचे तेज, तडफ, कारभारातील प्रभुत्व, दृढनिश्चय, असे अनेक गुण असूनही भाऊ अपयशी ठरले. दि. १४ मार्च १७६० रोजी भाऊंनी पानिपतकडे कूच केले. दिल्ली तख्त फोडण्याचा पराक्रम केला. अब्दालीच्या तोंडचे पाणीच पळाले. पण अनपेक्षित कुमक न आल्याने भाऊ हतबल झाले. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. ‘हे महाराष्ट्र शौर्याचे कुरूभूमीवरचे तेज’ पुन्हा दिसले नाही. सदाशिवरावभाऊंनी त्या कुरूभूमीवर प्राण्यांच्या समिधा अर्पण केल्या. पण पराभवाचा कलंक ते धुऊन काढू शकले नाहीत. कवी दु. आ. तिवारी म्हणतात,
कुरूभूमीवरच्या वीरा । तुज नमन असो हे माझे
जाहला पराजय जरिही । तव शौर्य – दुंदुभी गाजे
गायिली जरी तव गीते । होईना तृप्त मन माझे
कुरूभूमीचे मैदान । एकटा लढशी बेभान
हे चित्र जाईना पुढून ।
कविता ही मम गहिवरली । भाऊवर गर्दी झाली.