महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढण्याची सर्वाचीच हौस पुरी झाली. वारंवार स्वबळासाठी दंड थोपटणारा राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. काँग्रेसलाही तिस-या क्रमाकांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे मिशन १५१ सपशेल फसले. नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्रात बहुमतातील एकहाती सरकार आणण्याच्या भाजपच्या स्वप्नाचाही भंग झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार निवडून आला. सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल मान्य करून काँग्रेसने सरळ विरोधी बाकावर बसणे पसंत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र कुणीही मागितलेला नसताना भाजपला सपशेल पाठिंबा देऊन टाकला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायम सस्पेन्स निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळीही असे फासे टाकले की, त्याचा उलगडा करताना अनेकांना पुढील अनेक दिवस चिंतन करावे लागेल. दुस-या क्रमांकावर राहूनही शिवसेनेची अत्यंत केविलवाणी अवस्था झाली. त्यातच भाजपमध्ये जो सत्तासंघर्ष रंगला त्यावरून आम्हीही काही वेगळे नाही, हेच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले.
पंचवीस वर्षानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच पंचरंगी निवडणुका झाल्या. २५ वर्षाची शिवसेना-भाजपची युती तुटली, पंधरा वर्षाचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा संसार मोडला. गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्वबळाचे वेध लागले होते. विशिष्ट मतदारसंघ गेल्या पंधरा-वीस वर्षापासून आघाडी-युतीमध्ये वाटल्याने काही भागात विशिष्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधीच राहिली नव्हती. त्यामुळे तेथे पक्षवाढीसाठी मर्यादा येत होत्या. पक्षाचा वर्धापनदिन असो की विभागीय मेळावा, त्यात विरोधी पक्षापेक्षा आपल्या मित्र पक्षावर तोफा डागल्या जायच्या. मित्र पक्ष आपली कशी अडचण करीत आहे, असा सूर कार्यकर्त्यांतून व्यक्त व्हायचा आणि आता हे जोखड झुगारून देत स्वतंत्रपणे लढावे, अशा आरोळय़ा दिल्या जायच्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुका जाहीर व्हायच्या तेव्हा पुन्हा युती आणि आघाडी व्हायची. शिवसेना-भाजप युती ही हिंदुत्वाच्या विचारावर अधिष्ठित असल्याने ती भक्कम आहे, असे छातीठोकपणे सांगितले जायचे. तर धर्माध शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, असे आघाडीच्या वतीने सांगितले जायचे. मात्र सत्तेच्या स्पर्धेत तत्त्व अनेकदा गुंडाळून ठेवली जातात. यावेळी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याने भाजपचा भाव वधारला. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच फारच ताणली गेली. अखेर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना भाजपने पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबची २५ वर्षाची युती संपुष्टात आल्याचे जाहीर करून टाकले. त्यानंतर एक तासाच्या आत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. केवळ घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेस थांबले नाही तर त्यांनी तत्काळ काँग्रेस सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार अल्पमतात आले आणि विधानसभा निवडणुकांना केवळ १९ दिवस बाकी असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
मित्र जेव्हा दुरावतो तेव्हा तो शत्रूपेक्षा घातक ठरतो, याचे प्रत्यंतर विधानसभा निवडणूक प्रचारात आले. भाजपने युती तोडताना आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असे सांगितले होते. मात्र शिवसेनेने काहीही हातचे न राखता भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत ज्या प्रमाणे भाजपचे एकहाती सरकार आले आहे, त्याच प्रमाणे महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्यासाठी स्वत: नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली. मोदी यांनी महाराष्ट्रात एकूण सत्तावीस प्रचारसभा घेतल्या. देशाच्या पंतप्रधानाने एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी इतक्या सभा घेण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असावी. नरेंद्र मोदी आता आपल्याला रोखल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री पटल्याने शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकरली. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना थेट अफझल खानाची उपमा दिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांच्या वडिलांपर्यंत शिवसेना पोहोचली. महाराष्ट्र तोडण्यासाठी आलेल्या अफझलखानाच्या फौजा रोखा अशा शेलक्या शब्दात शिवसेनेने भाजपवर दुगाण्या झाडल्या. आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असे म्हणणा-या भाजप नेतृत्वानेही मग शिवजयंती साजरी करण्यासाठी खंडणी वसूल करणारी शिवसेना ही ‘हप्तेवाली पार्टी’ आहे, अशा शब्दात समाचार घेतला. भाजप नेतृत्वाने शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपले लक्ष बनवले. स्वत: नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख ‘भ्रष्टवादी पार्टी’ असा केला.
अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात २७ प्रचार सभा घेऊनही भाजपला सत्तेच्या जवळ जाता आले नाही. भाजपला १२२ आणि मित्र पक्ष असलेल्या रासपला १ जागा मिळून महायुती १२३ वर पोहचली. त्यातच शपथविधी सोहळा पार पडायच्या आतच भाजपचे नांदेड जिल्ह्यातील आमदार गोंविद राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांचा आकडा १२२ वर अडकला आहे. शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४१ जागा घेऊन चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले तसे आपला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकरणातील आपले फासे फेकायला सुरुवात केली. पूर्ण निकाल लागायच्या आतच त्यांनी राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला. शरद पवार हे सध्या तरी महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुभवी नेते आहेत. एक मुरलेले राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. शरद पवार जेव्हा बोलतात त्याचा अर्थ सहा महिन्यांनी कळतो, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. ते अगदी खरे आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या आत शरद पवार यांनी ‘जातीयवादी’ म्हणून टीका होत असलेल्या पक्षाला सपशेल पाठिंबा दिला. जय-पराजय निश्चित होण्याच्या आधीच धर्मनिरपेक्षतेच्या लढाईत पवारांनी पांढरे निषाण फडकावले. त्यामुळे राजकारणाची सर्व गणितेच बदलून गेली. भाजप १२२ जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. तर शिवसेना ६३ जागा मिळवून दुस-या क्रमांकावर आहे. पवार यांनी पाठिंबा दिला नसता तर कदाचित शिवसेना-भाजप हे निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप विसरून पुन्हा एक झाले असते. सहज गणित सुटले असते. मात्र पवारांनी पाठिंबा दिल्याने भाजपला पर्याय उपलब्ध झाला. भाजपने अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारलेला नाही, परंतु तो धुडकावलेला नाही. ज्यावेळी पवार यांनी तातडीने भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी भाजपचा नैसर्गिक मित्र असणा-या शिवसेनेने मात्र ताठर भूमिका घेतली. भाजपकडून प्रस्ताव येईल, तेव्हा पाठिंबा द्यायचा की नाही हे आम्ही ठरवू, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. स्वाभिमानी शिवसैनिकांची छाती तीन इंच फुगली. काय आपल्या साहेबांचा बाणेदारपणा, असे त्यांना वाटू लागले. ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे, असे त्यावेळी वाटत होते. कारण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना सोबत घेऊन भाजप कधीही सत्ता स्थापन करणार नाही, काँग्रेस कधीही पाठिंबा देणार नाही आणि सर्व लहान पक्ष आणि अपक्ष बरोबर घेतले तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारा आकडा भाजपला गाठता येत नाही. अशा वेळी शिवसेनेला शरण येण्याशिवाय भाजपला पर्याय उरणार नाही, असे शिवसेनेला वाटत होते. वरवर पाहाता हे गणित अगदी सरळ आणि सोपे आहे. मात्र वास्तवातील बेरीज- वजाबाक्या राजकारणात नेहमी फसतात. शिवसेनेचे गणितही सपशेल फसले. भाजप आपल्या दारी येईल, असे वाटत होते मात्र कोण पाठिंबा देणार याची फिकीर न करता सरळ सत्ता स्थापनेच्याच हालचाली केल्या. ना पाठिंबा देऊ केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद दिला नाही, ना नैसर्गिक मित्र असलेल्या शिवसेनेकडे पाठिंब्याची मागणी केली. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील अस्वस्थता वाढली. सत्तेची उब दिसू लागताच सुरुवातीला पोलादासारखा दिसणारा शिवसेनेचा कणा हळूहळू नरम पडू लागला. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे दिसताच शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्लीचे दार ठोठावून पाहिले. मात्र भेटीची वेळ न ठरवता आलात, असे सांगून कोणतीही चर्चा न करता परत पाठवून दिले. इतके अपमानित केल्यानंतर खरे तर शिवसेना नेतृत्वाने जनतेने दिलेला कौल शिरसावंद्य मानून विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवायला पाहिजे होती. तेच शिवसेनेच्या हिताचे होते. मात्र सत्तेची उब जसजसी दिसू लागली, तसा शिवसेनेचा स्वाभिमान फार ढिल्ला पडायला लागला. ‘सामना’तून रोज प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष युती घडवून आणण्यासाठी अगतिकता मांडण्यात येऊ लागली. भाजपने मात्र त्याच्याशी आपल्याला काही घेणे देणे नाही, अशा थाटात नेतानिवड, शपथविधी सोहळा याची तयारी सुरू केली. शपथविधी सोहळा एकट्या भाजपच्या मंत्र्यांचा करून हे सरकार फक्त भाजपचे आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना द्यायचा होता. म्हणूनच कुणाशी चर्चा न करता त्यांनी ही तयारी सुरू केली. विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन शपथविधी सोहळय़ाची तारीख ठरल्यानंतर तर शिवसेना इतकी घायकुतीला आली की त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच मागितलेला नसताना पाठिंबा देण्याचे संकेत ‘सामना’च्या अग्रलेखातून दिले. ‘मुख्यमंत्री कोणीही होवो, महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना मोठय़ा हिकमतीने आणि हिमतीने त्याच्या पाठिशी राहील’ असे सांगून सपशेल लोटांगण घातले. शिवसेना नेतृत्व सत्तेसाठी असा लाळघोटेपणा करीत होते, तेव्हा सामान्य शिवसैनिकांच्या भावना मात्र अत्यंत तीव्र होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कणखरपणे पक्ष चालवला, ज्या स्वाभिमानाने ते वागले त्याच्या नेमके उलटे सध्याचे नेतृत्व वागत असल्याच्या भावना शिवसैनिक व्यक्त करत होते. शिवसेनाप्रमुख असते तर भाजपच्या मग्रुरपणाला चोख उत्तर दिले असते. न मागता पाठिंबा देत सत्तेच्या भोवती घुटमळण्यापेक्षा शिवसेनाप्रमुख म्हणाले असते, ‘महाराष्ट्रातील माझ्या जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानापेक्षा मला कोणतेही पद मोठे नाही. विरोधी पक्षात बसून आम्ही या सरकारला महाराष्ट्र हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडू.’
न मागता पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्यानंतरही भाजपने त्यासाठी दखल घेतली नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, अशाही बातम्या पसरू लागल्या. तरीही पुढे काय करायचे यासाठी शिवसेनेच्या बैठका झडू लागल्या तेव्हा सामान्य शिवसैनिक कमालीचा अस्वस्थ झाला.
सत्ता स्थापनेच्या लगीनघाईत भाजपने ना राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा स्वीकारला, ना शिवसेनेच्या इशा-यांकडे लक्ष दिले. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पुन्हा स्वत: जाहीर करून टाकले की, ‘‘भाजपला जर आमचा बाहेरूनही पाठिंबा नको असेल, तर आम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहून भाजपला मदत करू.’’ शरद पवार यांच्या या भूमिकेने शिवसेनेची कोंडी झालेली आहे, मात्र भाजपलाही त्यांचा पाठिंबा घेणे तसे सोयीचे ठरणार नाही. ज्यांच्यावर निवडणुकीच्या प्रचारात भ्रष्टाचाराचे आरोप केले. विशेषत: विदर्भातील सिंचन प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तोफा डागल्या. त्यांचा पाठिंबा घेतला तर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या गाळाने भाजपचे तोंडही रंगण्याची भीती आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंब्यासाठी का अगतिक आहे, याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. केवळ सिंचन घोटाळाच नाही, तर राज्य सहकारी बँकेतील घोटाळय़ाचे प्रकरणही गाजत आहे. भ्रष्टवादी म्हणून ज्यांची गणना केली, त्यांचा पाठिंबा घेणे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होणार आहे. तरीही भाजपने त्यांच्या पाठिंब्यावर अद्याप तरी आपले कोणतेही म्हणणे स्पष्ट केलेले नाही.
सरकार स्थापण्यासाठी स्पष्ट बहुमत नसतानाही भाजपमध्ये जो सत्तासंघर्ष दिसला, त्यावरून सर्व पक्ष एका माळेचे मणी आहेत हे दिसून आले. सत्ता समोर दिसू लागताच भाजपमधील अनेकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली. काहींनी अप्रत्यक्ष निर्देशित केले तर काहींनी थेट आपला दावा दाखल केला. ‘मी केंद्रात खूश आहे. मला आता महाराष्ट्रात यायचे नाही,’ असे सांगणारे गडकरी दिवाळीला नागपूरला येतात आणि पन्नास-साठ आमदार त्यांच्या स्वागताला धावतात. ‘गडकरीसाहेब आगे बढो’च्या घोषणा होतात आणि तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार सांगतात. गालातल्या गालात हसत गडकरी पुष्पहार स्वीकारतात आणि मग ‘पक्षo्रेष्ठींनी जबाबदारी दिली तर ती पार पाडेल’ असे सांगतात, याला काय म्हणावे? दिल्लीत रमलो आहे, असे गडकरी कितीही सांगत असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यांना खुणावत होते. गडकरी महाराष्ट्रात आले नाही किंवा नरेंद्र मोदी यांनी त्यांना महाराष्ट्रात जाण्यास परवानगी दिली नाही, तर बहुजन चेहरा म्हणून ते आपले नाव पुढे करतील, अशी आशा मुनगंटीवार यांना वाटत होती. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी संघर्षयात्रा काढली. या दरम्यान त्यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आणण्यात आले. तेव्हा आपण दावेदार नाही, असे सांगणा-या पंकजा मुंडे सत्ता स्थापन होत आहे, असे दिसताच मी दावेदार नाही, मात्र लोकांनी माझे नाव चर्चेत आणले आहे, असे सांगत आपली सुप्त इच्छा प्रकट केली होती. तर माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे सर्वात ज्येष्ठ असल्याने मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावे, असे त्यांना वाटत होते. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच त्यांनी तशी इच्छा प्रकट केली होती. भाजपच्या यशात उत्तर महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. आतापर्यंत उत्तर महाराष्ट्राला एकदाही मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. म्हणून ते उत्तर महाराष्ट्राला मिळावे, असे वक्तव्य त्यांनी जाहीररीत्या केले होते. इतकेच नव्हे तर खडसे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुक्ताईनगरमध्ये मिरवणूक निघाली, एका मंदिरात यज्ञ करण्यात आला. आता एखाद्या मंदिरात यज्ञ करून मुख्यमंत्रीपद मिळत असते तर विनोद तावडे यांनी नवीन मंदिर बांधून त्यात अखंड वर्षभर यज्ञ चालू ठेवला असता. अर्थात नाथाभाऊंनी आपली खदखद नेता निवडीच्या दिवशी व्यक्त केलीच. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून सूचक होण्याची वेळ त्यांच्यावर आली.
पंचवीस वर्षानंतर झालेल्या पंचरंगी निवडणुकीचा धुरळा बसला. पूर्ण बहुमत नसतानाही भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लोकांना अनेक स्वप्ने निवडणूक काळात दाखवण्यात आली. त्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी भाजपवर आहे. हे आव्हान फडणवीस कसे पेलतात, हे काळच ठरवील.