पुढं ती पोरगी गुलाब साळुंखेने लेकरासगट पकडून आनली. तो पळवून नेणारा पोरगा सुटला. तो जिवाच्या भितीने पळून गेला. गुलाबने लेकरं जावायाचे हवाली केले. जात पंचायत बसवली. जातपंचायतीने निपक्षपाती संपूर्ण सहकार्य केलं. जातपंचायतीने त्या पोरीला सजाए मौत दिली. गुलाबरावाने इंड्रेल आनलं. गिलासभर पोरी पुढे ठेवलं. समद्यादेखत तिने घेतले. थोडय़ा वेळात विष समद्या शरीरात भिनलं. ती पाय खोरू खोरू मेली…
माझ्या मित्राची बहीण पळून गेली. मित्र अस्वस्थ आहे. आत्महत्याच करतो म्हणतात, असं त्याच्या बायकोने मला सांगितलं. आरे यार चला, आपन गेलं, पाहिजे भेटलं पाहिजे. त्याच्या उध्वस्त मनाला आधार दिला पाहिजे. मी निघालो. आलो घरी. मध्यमवर्गीय माणूस. त्याचं घर सर्वसाधारण. त्याचे मथारे मायबाप मला बघताच रडायला लागले. मी समजासुमजव केली. मित्र आणि त्याच्या बहिणीचा नवरा दारूची बाटली घेऊन बसले होते. पेत होते. मी जाऊन त्यांच्यात बसलो. मी आल्याचा त्याला, त्याच्या घरच्या समद्याला खुपच आनंद झालेला. त्याने एक ग्लास पुढे केला. मी घेत नाही, हातही लावत नाही म्हणलं. त्याने आग्रह केला, पण मी कायम नकार दिला. नाहीतर उठून जातो म्हणलं. त्याने आग्रह वापस घेतला. मग हळुहळु आमचं बोलनं सुरू झालं. त्याचे मायबाप केवीलवाणी आमच्या जवळ येऊन बसले. वहिनीने नेहमीप्रमाणे हसतमुखाने माझ्यासाठी चहा करून आनला. हळूहळू मी चहाचा घोट घेया लागलो. बोलता बोलता मित्र भावनिक झाला. ‘‘अशोक, तु मला या आवस्थेत कधी बघीतले आहे का? मी दारू वगैरे घेणारा माणूस नाही. मी माझी दुनिया तुझ्यावानीच शुन्यातून उभी केली. आरे, माझे आईवडील खेडेगावात रोजमजुरी करीत होते. पोटाला पोटभर अन्न मिळायाचं नाही. एका टायमाला उपाशी राहून, वस्तीगृहाच्या आधारानं शाळा शिकलो. शिकून कसातरी जि. प. मध्ये बाबू म्हणून नोकरीला लागलो. लहान बहिणीला शिकवू शकलो नाही. पण ती नववी शिकलेली आहे. तिचं लग्न करून दिलं. शिकलीच नाही तर नोकरीवाल्याला थोडीच देता येणार. एका सर्वसाधारण माणसाला दिली. रोजमजुरी करून जगू लागले. दोन पोरं झाली. कोणीतरी विचार करतो का तसा. पण तिने आज माझ्यासारख्या वाघ माणसाचं नाक कापलं. गावात मला लोक मान देतात. माणूस ग्रेट आहे, असं म्हणतात. दर वर्षी गावाला महादेवाची पंगत करून जेवण देतो. गाव म्हणते, मी नाव कमवलं. सालीने मला मातीत मिसळवलं. मला कुठेच सोयऱ्या धायऱ्यात जायाला नाक ठेवलं नाही. अशोक, भाऊ तु मह्यापेक्षा ग्यानी ध्यानी माणूस हाय. तुव्ही वहिनी एका टायमाला मला मान देत नाही, पण तुला मान देते. लेखक हाय म्हणते. तुव्ही इज्जत करते. साला सत्यानास केला त्या रांडीने. असं होयाला नको होतं. आत्महत्या केल्याबिगर गत्यंतर नाही.’’
‘‘पंकज काय बोलतोस हे तु, भावनावहीनी यांना समजावाना.’’
‘‘आम्ही समजवू समजवू याला कंटाळलो भाऊजी. आता तुम्हीच सांगा त्यांना समजावून. असं असते का कुठं. एकच लावत्यात आपलं टुमनं. या टुमन्यापाई मी लई कदरले हो. त्याईची आवस्था बगून जावावं वाटते निघून कोठं तरी आन सुखानं राहवावं.’’
‘‘ती गेली, आता तुही जाते का निघून.’’
‘‘काहीही बोलू नका, आमच्या खानदानीत नाही तसं तुमच्याच खानदानीत हाय. तसं बोलायला संधी दिली तर तोंड टाकूनच बोलतात. तुमच्या तोंडाला मुंगसं लावून ठेवावं लागते.’’
‘‘आरे बाबाहो मला जाऊद्या आणि मग करा तुम्ही भांडन’’
‘‘आहो भाऊजी ते काय भांडतात माझ्याशी, रात गई तो बात गई. बोला आता त्याईच्याशी भाऊजी, ते तुमचंच ऐकतात. आमचं ऐकत नाही. त्यांचं मत परीवर्तन करायला तर मी तुम्हाला बोलवीलं.’’
‘‘पंकज, तुला दुसरी बहीण होती का?’’
‘‘आरे नाही बाबा, ही दोन लेकरांची माय याला दिली नव्हती. ती पळून गेली तर गेली दोन लेकरंही घेऊन पळून गेली साली. आहो, ती कुवाऱ्या पोरासंगं पळून गेली. जातीचाच हाय. साल्यानं माती खाल्ली आन् समदा सत्यानास केला. वाह्यात निघाली साली. आम्ही ठाण्यात रिपोर्ट दिला. आता आनतील तिला पकडून. आपन पोरं भाऊजीच्या हवाली करू. पोरं चवथीला, तिसरीला आहेत हो. पोराईसाठी आपला जीव तुटते हो.’’
‘‘आहो, पळून जायाच्यातर कुवा-या पोरी पळून जातात. दोन दोन लेकराच्या माया पळून जातात का? रांडीनं तिचा सत्यानास केला, पण मव्हाभी सत्यानास केला. दिसली की तिला कापूनच फेकतो. तिची माती करतो. ती वाह्यातच होती.’’
‘‘भाऊजी जबानीला लगाम द्या. ती वाह्यातच नव्हती. तिला वाह्यात तुम्ही बनवलं. राजे तुम्हाला दारू पेयाला पाहिजे होती. चांगलंचुंगलं खायला पाहिजे होतं. ते पोरगं तुम्हाला केळा चारत होतं. त्याने तुम्हाला केळा चारून त्याने तुमची चांगली मारली. तुमचा समदा सत्यानास केला. त्या पोराला घरी कोण आनत होतं? तुम्हीच. मग खरे दोषी तुम्ही आहेत की, ती आहे. खरे गुन्हेगार वाह्यात तुम्हीच आहात. खरे बोलत जा भाऊजी, दुस-याच्या माथी पाप लावून मोकळे होत जाऊ नका. जेवढं शेन तिने खाल्लं त्याच्यापेक्षा कितीतरी पट शेन तुम्ही खाल्लं.’’
असं बोलता बोलता बरीच रात झाली. त्याईला जास्त झाली. ते जेवले नाही. मग मी एकटाच कसा जेवणार? मग मीही न जेवता तसाच परत गेलो. पुढे तिला पोलिसांनी पकडून आनले. तिने उलटा जबाब ठाण्यात दिला. तीची लेकरं तिने परत केले. आता ती सुखात त्या पोरासंगं नांदत आहे. तिने चांगले केले का वाईट केले याचं भान तुम्हाला आहेच..!
त्या काळात गुलाबराव साळुंखे जात पंचायतीचा पुढारी म्हणून खूप नावाजलेला होता. तो बिराडावर न्याय देयाचा. त्याचा न्याय सर्वानाच मान्य असायाचा. तो निपक्षपाती आणि सत्यतेने न्याय देयाचा. काहीच बेईमानी करायाचा नाही. कोणाकडून दारू पेयाचा नाही की, कोंबडं खायाचा नाही. खायाचं असेल तर स्वत:च बकरं विकत आनायाचा व समद्यांना जेऊ घालायाचा. महिन्या दोन महिन्यात पालावर तो फुकट पंगत देयाचा. त्याच्या पंगतीला समदे येऊन मुकाटय़ानं जेवायाचे. जेवताना धिंगाना फिंगाना करायचे नाही. पालावरचे गडी-बायका त्याईची खुप इज्जत करायाचे. बायका तर गुलाबरावासमोर डोक्यावरचा पदर नाही पडू देयाच्या.
गुलाबभाऊला तिन पोर व एक पोरगी होती. पोर बरोबरीचे होते. मस्त काम करायाचे. जात पांचायतीचा पुढारी बाप असल्यामुळे त्यांची चांगली बिराडावर चालायाची. तेवढी दादागिरी तर करावंच लागते. येथे गुलाब बिराडावरचे लोकाचं शोषण करायाचं नाही, पण त्याची पोरं जमंल तसा हात मारायाचे. पालावरच्या लोकांचं शोषण करायाचे. खाऊन पेऊन टामटुम राह्याचे. पोरीचं लग्न झालं होतं. पोरगी हुशार पण पोरगा असा येडपट होता. पालावर त्याची खोटारडा म्हणून छि थु होती. त्याच्या गोष्टींवर कोणीच विश्वास करायाचं नाही. तो बायकोलाही खोटंच बोलायाचा. कोणालाभी कोणाच्या चुगल्या सांगायाचा. त्याच्याकडून दारू पेयाचा. पोरगी कंटाळून गेली होती. त्याला दोन लेकरं होती. गुलाबरावाने जावायाला खूप डाव समजवलं. शिव्या देयाचा, ठोकलं, पण तो काही ऐकतच नव्हता. पुढं त्याला गुलाबराव साळुंखे यांनी सोडून दिलं. तु तुझं काय हाय ते कर. तु तुझं तुझ्या परीने जग म्हणले. जावाई व पोरीच्या देखरेखीतून थोडे बाजुला झाले.
मग तर जावायाला रान मोकळं झालं. तो जातवाल्या संग राहू लागला. बंब दारू पेऊ लागला. एक दिवस त्याच्या घरी ये-जा करणाऱ्या एका जातवाल्या पोरानी त्याची बायको व दोन लेकरं पळवून नेले. बिनपत्याचं केले. पोरगा कुंवारा होता. जावाई गुलाब साळुंखेकडे आला. पोरगी पळून गेली याचं त्याला अतीव दु:ख झालं. गुलाब साळुंखेचं पोरीनं पळुन जाऊन नाक कापलं. समद्या जातीत छि थु झाली. त्यानं पुढारीपण बंद केले. माघारी आला. नव्या उमेदीच्या लोकाना जात पंचायतीचं पुढारीपण दिलं. कोणाच्या काजकार्यात तो जायाचा नाही. आपलं काम भलं आन आपण भले, असा राह्याचा त्याच्या पोरा-बाळांनी भी माघार घेतली. ते पेयाला कोणाला दारू फिरू मागायाचे नाही. कोणाचं शोषण करायाचे नाही. कोणावर रुबाब गाजवायचे नाही. तसाही आता त्यांचा रुबाब चालायाचा नाही. कोणी त्या घराला भाव देयाचं नाही. एक खातं पितं घरानं बर्बाद झालं..
पुढं ती पोरगी गुलाब साळुंखेने लेकरासगट पकडून आनली. तो पळवून नेणारा पोरगा सुटला. तो जिवाच्या भितीने पळून गेला. गुलाबने लेकरं जावायाचे हवाली केले. जात पंचायत बसवली. जातपंचायतीला निपक्षपाती संपूर्ण सहकार्य केलं. जातपंचायतीने त्या पोरीला सजाए मौत दिली. गुलाबरावाने इंड्रेल आनलं. गिलासभर पोरी पुढे ठेवलं. समद्यादेखत तिने घेतले. थोडय़ा वेळात विष समद्या शरीरात भिनलं. ती पाय खोरू खोरू मेली तेव्हा मी आठ वर्षाचा असेन. हे समदं आमच्या डोळ्यादेखत घडलं..
पुढे समजलं की, त्या पळवून नेणा-या कुवा-या पोरानं ती मेल्याचं दु:ख सहन न झाल्यानं कंबरेला दगड बांधून नदीच्या डव्हात उडी मारली..
तेव्हा त्याचं काहीच वाटलं नाही, पण आज खुप काही वाटते…