आम्ही ठाकरे कुटुंबीयांना मातोश्रीतील आगमनापासून आजपर्यंत जवळून पाहिले. त्यांच्या कौटुंबिक सुखदु:खाबरोबरच राजकीय चढ-उतारही कलानगरमधील शेजारी म्हणून अनुभवले.
बाळासाहेब गेले.. मनाला चुटपूट लावून गेले. आम्ही ठाकरे कुटुंबीयांना मातोश्रीतील आगमनापासून आजपर्यंत जवळून पाहिले. त्यांच्या कौटुंबिक सुखदु:खाबरोबरच राजकीय चढ-उतारही कलानगरमधील शेजारी म्हणून अनुभवले. मी कलानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सचिव होतो. त्यावेळी, बाळासाहेब चित्रकार शंकर पळशीकरांचा प्लॉट पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर मातोश्रीचे बांधून होईपर्यंत बाळासाहेब व मीनाताई जेव्हा पाहणीसाठी इथे येत, तेव्हा माझ्या बंगल्यात येऊन गप्पा मारत असत. मी आणि बाळासाहेबांनी चित्रकलेचे धडे राजा पाटकरांकडून घेतले असल्याने गुरुबंधूचा धागा आमच्यात होताच, त्यात भर पडली ती शेजाराची. मी आणि पानसरेंनी मिळून शिवाजी पार्कातील छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बनवला होता. त्यामुळे बाळासाहेबांना माझ्याविषयी ममत्व असणे स्वाभाविकच होते.
बाळासाहेब कलानगरवासी झाल्यानंतर त्यांच्याशी झालेली मैत्री म्हणा किंवा जवळीक, ती आजपर्यंत कायम राहिली. मी तसा बाळासाहेबांपेक्षा दीड वर्षाने मोठा. त्यात मी शिल्पकार आणि बाळासाहेब व्यंगचित्रकार. त्यामुळे, गप्पांना वेळ पुरतच नसे. मात्र, बाळासाहेब नसते तर कलानगरचे आजचे स्थान काय असते, याचा विचारही करवत नाही. २६ जुलैच्या प्रलयावेळी खुद्द बाळासाहेबांनाही छोटय़ा बोटीतून बाहेर जावे लागले होते. मात्र, त्यानंतर ज्या वेगाने इथली ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यात आली, ती पाहता छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्येही बाळासाहेबांचे किती लक्ष होते, हेच जाणवते. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट जरा दुरापास्त झाली होती. मात्र, आज त्याच बाळासाहेबांना उद्धव आणि इतरांच्या खांद्यावरून जाताना पाहिल्यावर मात्र माझ्या डोळ्यांनाही अश्रू थोपवता आले नाहीत.- लक्ष्मण राजाराम आजगावकर
बाळासाहेब आज आपल्यात नाहीत, हे कटू सत्य आम्हाला पचवण्यासाठी थोडं कठीणच आहे. तसा मी साहेबांसाठी खूपच नवखा. १९८७ पासून बाळासाहेबांच्या जवळ राहायला आलो. त्यापूर्वी, इथून जवळच असलेल्या आर्किटेक्ट कॉलनीचा संस्थापक सदस्य होतो. व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने कलानगरमधील अनेक बंगल्याच्या इमारती करण्याचे काम माझ्याच वाट्याला आले. मात्र, कलानगर सहकारी संस्थेचा सदस्य म्हणून वावरताना आजही ठाकरे कुटुंबीयांचे वास्तव्य आणि त्यांचा सहवास हे शब्दात वर्णन करू शकत नाही. माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो असताना बाळासाहेबांनी आजारी असतानाही भेट देऊन आपुलकीने चौकशी केली. तसेच, लग्नाचे आमंत्रण द्यायला आलात खरे, पण मी येऊ शकणार नसलो तरी तोंड गोड केल्याशिवाय जायचे नाही, असे सांगत मिठाई खाऊ घालणारे बाळासाहेब आठवले की आता कंठ दाटून येतो. कलानगरमधील होळी, २६ जानेवारी किंवा दांडिया-गरबासारख्या अनेक कार्यक्रमांना बाळासाहेब कुटुंबीयांसह हजर राहात असत. अगदी युतीची सत्ता आल्यानंतरही अनेकदा आम्ही त्यांचा सहवास अनुभवला आहे. कलानगरवासीयांसाठी टिकूजी नी वाडीसारख्या वॉटर पार्कला किंवा भंडारदरा इथे पिकनिक आयोजित करून बाळासाहेबांनी तेही आमच्यातलेच एक आहेत, हेच कायम दर्शवले. बढेजावपणा आम्हाला कधी दिसलाच नाही. आजही मीनाताईंच्या हळदीकुंकू समारंभाची आठवण काढली की माझ्या पत्नीचे डोळे पाणावतात, इतके प्रेम ठाकरे कुटुंबीयांनी कलानगरवासीयांवर केले आहे. त्यामुळे, बाळासाहेबांचा अखेरचा जय महाराष्ट्र, हे हेडिंग वाचताना आजही विश्वास बसत नाही, हेच खरे! – प्रभाकर दाभोळकर