अपंग व्यक्ती हा समाजातील एक घटक आहे. त्याच्याही इतरांप्रमाणे गरजा आहेत, याचे भान असणे हे परिपक्व मानसिकतेचे लक्षण आहे. त्यानुसार हा घटक त्यांच्यातील शारीरिक उणिवांमुळे समाजातील सोयी-सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातील घटकाने लक्ष द्यायला हवे. अपंगांची संख्या कमी असली तरी त्यांच्या अस्तित्वाची दखल घेत त्यांनाही इतर सामान्य ग्राहकांसारखे खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी पूरक अशा साधनसामग्रीची निर्मिती झाली पाहिजे आणि वाढलीही पाहिजे. अपंगांच्या सर्वसमावेशक सक्षमीकरणासाठी समाजाने जागरूक राहायला हवेच.
आज ‘जागतिक अपंग दिन’. जगामधले सर्वत्र पसरलेले पण अल्पसंख्याक (मायनॉरिटी) असणारे अपंग. कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपंगत्वाचा सामना करणारे, ते सहन करणारे, त्यासह जगणारे, जगताना इतरांनाही मदत करणारे असे एकूण १५ टक्के अपंग आहेत. जगाच्या लोकसंख्येच्या १५ टक्के देशपरत्वे त्यांच्या प्रमाणात बदल होतोच. पण तरीही अनेक वेळा त्यांच्या गरजांची जाणीव ठेवली जात नाही, कधी तर अस्तित्वाची दखलही घेतली जात नाही. ही वस्तुस्थिती, माणुसकीपासून समाज कसा दूर जातोय, त्याची निदर्शक समजायला हवी. अशा प्रकारे ‘दिन’ साजरा करण्याने या विशिष्ट दिवशी तरी सर्व समाजाने आपल्या या बांधवांना समजून घ्यावे, त्यांच्यासाठी काही कार्य करण्याचे योजावे, हा हेतू थोडाफार सफल होतो.
‘युनायटेड नेशन्स’कडून तर अपंगांचे काही हक्कही जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याबाबत जागतिक पातळीवर विचार होतोय आणि होईल. मात्र, आपल्या वैयक्तिक व सामाजिक भानामध्ये आपण अपंगांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव करतो का, याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
हे अपंगसुद्धा ग्राहक असतात. केवळ त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यास आवश्यक अशा उपकरणांचे किंवा औषधांचे नव्हेत, तर सर्वसामान्य माणसांसारख्या त्यांच्याही गरजा असतात. लक्षात घ्या. उपनगरी रेल्वेमध्ये अपंगांसाठी राखीव डबा/छोटासा हिस्सा मिळण्यास किती उशीर झाला होता? आता गेली काही वर्षे असा डबा उपलब्ध झाला आहे; पण त्यामध्ये ‘केवळ अपंग’च किंवा पेशंटच असतात, असे दिसते का? आपल्या सोयीसाठी त्या डब्यात प्रवास करणा-या धडधाकट रेल्वे प्रवाशांना जोपर्यंत त्यांची विवेकबुद्धी अडवीत नाही, तोपर्यंत या अपंगांना खरा न्याय मिळाला, त्यांचा प्रवास सुखकर झाला, असे म्हणता येईल का? तेसुद्धा तिकीट काढूनच प्रवास करतात. त्यांच्या अपंगत्वाकडे दयेच्या नव्हे तर सहानुभूतीच्या नजरेने पाहून, त्यांना वैयक्तिक पातळीवर आदरयुक्त पद्धतीने वागवणा-यांची संख्या समाजात वाढायला हवी आहे.
ग्राहक म्हणून त्या व्यक्तींना बाजारात, दुकानात अगर गर्दीच्या ठिकाणी सहज जाणे जमावे, अशी परिस्थिती नाही. पण, नव्याने उभ्या राहत असलेल्या मॉल्समध्ये तरी अशी सोय आहे का? व्हीलचेअर सर्वत्र जाऊ शकेल, अगदी शौचालयातसुद्धा अशा सोयीसुविधा या ग्राहकांसाठी कराव्यात, अंध ग्राहकांसाठी एखादा सहाय्यक असावा, अशा प्रकारचा विचारही कोणी करीत नाही. परदेशी ग्राहकांसाठी एक वेळ दुभाषा असेल पण मूक-बधीर ग्राहकांसाठी त्यांची (हाताच्या बोटांनी-मुद्रांनी संभाषण साधणारी) भाषा येणारी व्यक्ती आठवड्यांतून एखादा दिवस नियमितपणे उपलब्ध करून द्यावी, असे कुणाला सुचतच नाही. यामुळे मग अशा व्यक्ती आपापल्या गटांमध्येच राहतात आणि जगतात. त्यांना ठरावीक परिघाबाहेर काढण्याचा प्रयत्न, त्यांच्या मनात विश्वास जागवण्याचा प्रयत्न सर्वसामान्य व्यक्ती करताना दिसत नाहीत. ‘अपंगमैत्री’ केवळ त्या नावाच्या संस्थांमधूनच करता येते, असं नाही तिला ‘सोशलवर्क’ असं नावसुद्धा असायला नकोय. बालवीर किंवा वीरबालेचा गणवेश उतरला, की अपंगाबद्दल करावयाचे कामही बंद होते. कारण त्या कामाला मग ‘मार्क’ मिळत नसतात.
ग्राहक जगताने, म्हणजे आपण सर्वानीच ग्राहक म्हणून अपंगांना काय अडचणी येतात, येऊ शकतात, त्या निदान समजून घेतल्या पाहिजेत. ग्राहक म्हणून त्यांनाही इतर सर्वसामान्य ग्राहकांसारखे हक्क आहेत, त्याची जाणीव करून दिली पाहिजे. ‘दूरदर्शन’वर मूक-बधिरांसाठी बातमीपत्र असते. तसे इतर कुठल्या चॅनलवर दिसलंय का कधी? कारण, १५ टक्क्यांपर्यंत असणारे या नागरिकांचे अस्तित्व आणि त्यांच्या समस्या, याबाबत सर्वसाधारण समाजच जणू बहिरा व मुका झाला आहे. हा बधीरपणा सामाजिक आरोग्य चांगले नसल्याचे लक्षण आहे.
अपंग व्यक्तींमध्येसुद्धा गुण असतात. त्यांच्याकडूनही समाजासाठी खूप उपयुक्त कार्य घडू शकते. इतकेच नव्हे तर कधी कधी सर्वसामान्य, धडधाकट व्यक्तींपेक्षा त्यांच्यामधली जिद्द-विजिगिषू वृत्ती फार मोठी व दाद देण्यासारखी असते. पण, त्यासाठी ‘युनायटेड नेशन्स’ने सुचवल्याप्रमाणे सर्वसमावेशक प्रगती करताना अपंगांनाही बरोबर घेणे आवश्यक ठरते. याचे भान मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच ठेवले आहे. त्यामुळे अनुदानित शाळांप्रमाणे मूक-बधिरांच्या शाळेमध्येही आमचे कार्यकर्ते आपणहून जातात. त्या विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने, चित्र व तक्ते यांचा आधार घेत, ‘जागरूक ग्राहकत्वा’चे धडे त्यांना देतात. यामध्ये वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यां लीलाताई गोखलेंपासून अनेक जणी उत्साहाने व जबाबदारीने आपला वाटा उचलतात. या मूक-बधिर विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोहोचवण्यासाठी वेळप्रसंगी ‘नाटुकली’सुद्धा सादर करतात. भेसळीची प्रात्यक्षिके करून दाखवतात. शाळांमधले शिक्षकसुद्धा त्यात त्यांना सहकार्य करतात. कारण जागरुक ग्राहकत्वाचे भान हे एक प्रकारे आयुष्यभर पुरणारे असे उपयुक्त ज्ञान आहे, याची जाणीव सा-यांनाच आहे.
या व इतरही अपंगांसाठी अशी माहिती, त्यांना समजेल अशा प्रकारे देण्यास, संस्थेच्या शिक्षण विभागाचे कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात. तसेच काही कार्यकर्ते ‘तोंड व पाय’ यांच्या साहाय्याने चित्र काढणा-या (हात गमावलेल्या) अपंगांच्या कलेला दाद देऊन (mouth and foot artists) त्यांनी बनवलेली ‘ग्रीटिंग्ज’ विकत घेतात. करणा-याला त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे करायला सक्षम करणं, शक्य ती मदत करणं हे सामाजिक भानसुद्धा सुजाण ग्राहकत्वाचेच एक अंग ठरते.