लोकपाल विधेयक मंजूर केल्याबद्दल अण्णांनी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्यांचे आभार मानले.
राळेगणसिद्धी– लोकसभेने लोकपाल विधेयक मंजूर केल्यानंतर या विधेयकासाठी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करणा-या अण्णा हजारे यांनी नऊ दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेतले. राज्यसभेच्या मंजूरीनंतर दुस-याच दिवशी लोकसभेनेही लोकपाल विधेयकावर मंजूरीची मोहर उठवली आणि राळेगणसिद्धीमध्ये अण्णा आणि त्यांच्या सहकार्यांनी जल्लोष केला.
लोकपाल विधेयक मंजूर झाल्यानंतर अण्णांनी यासाठी आंदोलन करणा-या सर्व सहकार्यांचे आभार मानले. तसेच हा कायदा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी अस्तित्वात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विधेयक मंजूर केल्याबद्दल अण्णांनी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्यांचे आभार मानले.
जर कायद्याची योग्य प्रकारे अमलबजावणी झाली नाही तर त्याचा फायदा सामान्य जनतेला होणार नाही. लोकपाल विधेयकाची अमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर समिती स्थापन करणार असल्याचे अण्णा सांगितले. या समितीमध्ये निवृत न्यायाधीश, माजी पोलिस प्रमुख आणि अन्य सदस्य असतील.