पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर एऩडीएतील नेत्यांनी आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची शपथ घेतली.
नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा या मागणीवर भाजप ठाम असून पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर एऩडीएतील नेत्यांनी आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची शपथ घेतली आहे.
कॅगच्या अहवालानंतर कोळसा खाण वाटपावरुन भाजप खासदारांनी गोंधळ घातल्याने शेवटच्या दिवशीही संसदेचे कामकाज झाले नाही. शुक्रवारीही विरोधकांनी संसदेचे कामकाज बंद पाडले. गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. यामुळे महिनाभर चाललेले हे अधिवेशन सर्वांत निष्फळ अधिवेशन ठरले. पावसाळी अधिवेशन 8 ऑगस्टला सुरू झाल्यापासून 80 टक्के कामाचे तास आणि करदात्यांच्या सुमारे दहा कोटी रुपयांचा नाहक चुराडा झाला.
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर एऩडीएतील नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी संसदेपासून रस्त्यापर्यंत आंदोलन करण्याची शपथ घेतल्याचे तसेच हे आंदोलन तळागाळापर्यंत पोहचवले जाईल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले.
कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी पंतप्रधानांचा राजीनामा आणि सर्व कोळसा खाणींच्या वाटपाचे परवाने रद्द करण्याची मागणी या मुद्यांवर एनडीएतील भाजप, जेडीयू, शिरोमणी अकाली दल आणि शिवसेनेच्या खासदारांनी शुक्रवारी संसद भवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव, शिरोमणी अकाली दलाचे हरसिमरत कौर आणि शिवसेनेच्या अनंत गीते यांनी सरकारवर टिका केली.
संसदेचे कामकाज बंद पाडल्याने जनतेच्या पैशाची हानी झाल्याचे सुषमा स्वराज यांनी मान्य केले. मात्र यामुळे देशाचाच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर देशाचा काही लाख कोटी रुपयांचा फायदा होणार असेल तर संसदेचे कामकाज बंद पाडून 10-20 कोटी रुपयांचे नुकसान झाले तर काही बिघडणार नाही, असे त्या म्हणाल्या.
टू-जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणाच्या वेळीही भाजपाने संसदेचे कामकाज बंद पाडले होते. त्यावेळीही जनतेच्या पैशाचे नुकसान झाल्याचा आरोप केला होता. मात्र त्यामुळे स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आणि स्पेक्ट्रम वाटप अखेर रद्द झाले.
कोळसा खाण वाटप घोटाळ्यात भाजपाच्या नेत्यांचा समावेश असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.