भारत संरक्षण दलावर सर्वात जास्त खर्च करतो; पण एवढा खर्च करूनही घेतलेले संरक्षण साहित्य किती वर्षे टिकेल, याची हमी नसते. संरक्षण दलातील हवाई दलाची कित्येक मिग विमाने नेहमीच्या सरावावेळी पडून दुर्घटना घडलेल्या आहेत. मिग विमानांना तर उडत्या शवपेटय़ा म्हटले जाऊ लागले होते.
हवाई दलातील दुर्घटना तांत्रिक कारणांमुळे घडतात आणि अशा अचानक घडलेल्या बिघाडांमुळे विमान दुर्घटना होतातच; परंतु अशा दुर्घटनेत वैमानिकही मृत्युमुखी पडतो. गेल्या तीन वर्षात संरक्षण दलात ३९ लढाऊ विमानांचे अपघात घडले असून त्यामुळे ३६ संरक्षण दलातील व्यक्तींना प्राण गमवावा लागला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही माहिती संसदेत दिली. मात्र, त्याबरोबर गेल्या काही दशकात लढाऊ विमानांच्या अपघातांचे प्रमाण कमी कमी होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
लढाऊ विमाने खर्चिक तर असतातच पण त्याचबरोबर त्यातील वैमानिकाचा जीवही अमूल्य असतो. अशा हवाई दलाच्या वैमानिकावर त्याला प्रशिक्षण देण्यापासून तो त्याची नेमणूक होईपर्यंत लाखो रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीत अपघात झाला तर देशाचे भरून न येणारे नुकसान होते. गेल्या काही वर्षात संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा सारखा ऐरणीवर येत आहे. पण त्या दृष्टीने काही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
गेल्या वर्षी मुंबईत माझगाव गोदीत बनवलेली एक युद्धनौका आणि दोन पाणबुडय़ा नौदलात दाखल झाल्या. परंतु हवाई दलाच्या संपूर्ण आधुनिकीकरणाबाबत कोणीही काही बोलताना दिसत नाही. आज आधुनिक हवाई दल सर्वाधिक चपळ हत्यार मानले जाते. आधुनिक क्षेपणास्त्रे असली तरी त्याचा वापर अत्यंत टोकाची भूमिका घेतली जाते त्याचवेळी करण्यात येतो. इतर वेळी हवाई दल शत्रूवर अचूक मारा करण्याची चोख कामगिरी बजावते. हवाई दलातील अपघात देशाचे दुहेरी नुकसान करणारे आहे. हेलिकॉप्टर अपघातही चिंताजनक आहेत. ३९ अपघातांपैकी १४ अपघात हे हेलिकॉप्टरचे आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थितीत देशात किंवा देशाच्या सीमेपलीकडेही हेलिकॉप्टरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भूकंप, दरडी कोसळणे, महापूर अशा ठिकाणी एक भक्कम आधार म्हणून हेलिकॉप्टरचाच वापर केला जातो. अपघातांची चौकशी पूर्ण झाली आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले परंतु त्याची कारणे मात्र सांगितलेली नाहीत. संरक्षण क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचा अपघात हा देशाला आर्थिक आणि मनुष्यबळाच्या संकटात नेऊ शकतो. संरक्षण दलात शेकडो पदे रिक्त असताना जर संरक्षण क्षेत्रातील अपघातांचे सत्र थांबले नाही तर या क्षेत्राकडे तरुण वळणार नाहीत. पद, मान असला तरी सतत मृत्यूच्या दारात ताठपणे उभे राहण्यासाठी तरुण मिळणार नाही. देशाचे संरक्षण हे सळसळत्या रक्ताचे जवानच करू शकतात. त्यांच्या देशभक्तीच्या जोरावरच ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशाचे संरक्षण करू शकतात. देशाच्या शत्रूशी लढत असताना शहीद होण्याऐवजी सैनिकांना जर युद्ध साहित्याचा सराव करताना मरण येत असेल तर अशा मरणामुळे देशातील तरुणांचे मनोधैर्य खच्ची पडेल.
कोणत्याही देशाची मजल ही संरक्षण दलावर असते. परंतु शांतता काळात युद्ध साहित्य आणि अमूल्य असे सैनिक गमावण्याची वेळ जर भारतावर येत असेल तर ती मोठी नामुष्की आहे. संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही दलाच्या आधुनिकीकरणाबद्दल एकही शब्द काढलेला नाही. संरक्षणमंत्री या नात्याने संरक्षण क्षेत्राला आज नेमकी कशाची आवश्यकता आहे, याचा आढावा घेऊन भारत अधिक शस्त्रसज्ज करावाच पण या शस्त्रसज्जतेला कोणत्याही प्रकारच्या अपघाताने गालबोट लागणार नाही, याची काळजीही संरक्षण मंत्र्यांनी घ्यावे. फक्त संरक्षण करार आणि संरक्षण क्षेत्रातील खासगीकरणाने हा प्रश्न सुटणार नाही.