काँग्रेस संयुक्त नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवेल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई – काँग्रेस संयुक्त नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवेल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ज्या विभागात ज्या नेत्याचे नेतृत्व भक्कम असेल त्याला त्या संपूर्ण विभागाची जबाबदारी दिली जाणार आहे.
शिवाय त्यांना विशेष अधिकारही दिले जातील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. यानुसार गुरुवारपासून विभागवार बैठका घेतल्या जाऊन प्रत्येक नेत्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना काँग्रेसने पक्षातील सर्वच प्रमुख नेत्यांना पक्षाकडून अधिक ताकद देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागातील नेत्याकडे संपूर्ण विभागाचेच नेतृत्व दिले जाईल. उमेदवार कोण असावेत, निवडून कोण येऊ शकतो, विभागातील रणनीती काय असावी, मुद्दे कोणते असावेत याबाबतचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात येणार आहे.
मात्र उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही याच नेत्यांवर असणार आहे. शिवाय विभागाच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या सूचनाही अंमलात आणल्या जातील. अशा पद्धतीने संयुक्त नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यादृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे. सुरुवातीला प.महाराष्ट्र व मराठवाडय़ाबाबत निर्णय होणार आहे. त्यानंतर इतर विभागांच्या बैठका होऊन जबाबदा-या निश्चित केल्या जातील.
जागावाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित नाही
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला अजून निश्चित नसल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय जागा वाढवून दिल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीकडून आपल्याकडे कोणीही केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ५० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना ठाकरे बोलत होते. तटकरेंनी केवळ कार्यकर्त्यांची भावना काय आहे ते सांगितले. त्यांनी ५० टक्के जागांची मागणी केली नाही, असे ते म्हणाले.