अभिनेता संजय दत्त याला पुण्यातील येरवडा कारागृहात शरण येण्याची परवानगी ‘टाडा’ न्यायालयाकडे मागीतली आहे.
मुंबई- मूलतत्त्ववादी संघटनांकडून ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याने पुण्यातील येरवडा कारागृहात शरण येण्याची विनंती अभिनेता संजय दत्तने टाडा न्यायालयाकडे केली आहे. त्याच्या या याचिकेवर टाडा न्यायालयाने सरकार आणि सीबीआयचे मत विचारले असून, बुधवारी याबाबतची सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय दत्तला शरणागतीसाठी अतिरिक्त मुदत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
संजय दत्तच्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाचे काम रखडल्याने ते पूर्ण करण्यासाठी त्याला शरणागतीसाठी आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी दोन निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने मंगळवारी ही याचिका फेटाळून लावत अतिरिक्त मुदत देण्यात येणार नसल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर संजय दत्तने काही तासांतच येरवडा कारागृहात शरण येण्याची परवानगी देण्याचा अर्ज टाडा न्यायालयापुढे सादर केला. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने त्याला थेट कारागृहात शरण येण्याची परवानगी दिली नाही, तर त्याला टाडा न्यायालयासमोरच हजर व्हावे लागणार आहे.
‘मूलतत्त्ववादी संघटनांकडून जीवाला धोका असल्याने येरवडा कारागृहात शरण येण्याची परवानगी मुन्नाभाईने त्याच्या अर्जात मागितली आहे. ‘‘शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २००६मध्ये शिक्षा झाल्यानंतर मुंबईहून पुण्याला येरवडा कारागृहात नेताना प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी व छायाचित्रकारांनी त्याचा १२० किलोमीटपर्यंत पाठलाग केला होता. या वेळी याची पुनरावृत्ती होऊन नये म्हणून थेट येरवडा कारागृहात शरण येण्याची परवानगी मागत आहे,’’ असेही संजयने अर्जात म्हटले आहे.
थेट कारागृहात शरण येता येणार नाही
येरवडा कारागृहात शरण येण्याचा अर्ज टाडा न्यायालयाने फेटाळल्यास त्याला टाडा न्यायालयापुढे शरण यावे लागेल, असे मत ज्येष्ठ कायदातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबईत १९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्याखाली संजयला टाडा न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे कायद्याच्या प्रक्रियेनुसार त्याला टाडा न्यायालयासमोरच शरण यावे लागणार आहे, थेट येरवडा कारागृहात शरण होता येणार नाही, असे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम आणि उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अॅड. गणेश सोवनी व अॅड. उर्मिला चव्हाण यांनी ‘प्रहार’ला सांगितले.