मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अभिनेता संजय दत्तने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
मुंबई- मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अभिनेता संजय दत्तने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दत्तला शरण येण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ दिल्यानंतर त्याने ही याचिका दाखल केली आहे.
मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी संजयला शिक्षा सुनावली होती. बेकायदा शस्त्रास्त्र बाळगण्याच्या गुन्ह्याखाली संजय दत्तला पाचवर्षांची शिक्षा सुनावताना त्याला शरणागतीसाठी न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर संजयने शरण येण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालयाने त्याला महिन्याभरासाठी मुदत वाढवून दिली होती.
संजय दत्तने दीडवर्ष कारावासात काढल्याने त्याची अजून साडेतीन वर्षांची शिक्षा बाकी आहे. २००७मध्ये टाडा न्यायालयाने संजयला दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यात एक वर्ष कमी करुन पाच वर्षे केली होती.