बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रभात फेरीसाठी येणा-यांची संख्या मोठी आहे.
मुंबई – बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रभात फेरीसाठी येणा-यांची संख्या मोठी आहे. सकाळचा लख्ख सूर्यप्रकाश, गर्द झाडीतून वाट काढत प्रभात फेरीचा मार्ग हे पर्यटक पूर्ण करतात. मात्र आता प्रभात फेरीसाठी येणा-या या पर्यटकांसाठी नवे सुगंधी उद्यान तयार होत आहे. हे उद्यान वन्यप्राणी रुग्णालयानजीक उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील हे पहिले वन्य सुगंधी उद्यान ठरणार आहे.
वन्यप्राणी रुग्णालयानजीकच्या सहा हजार मीटर जागेत हे उद्यान उभारण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. या उद्यानाची कामे सध्या प्राथमिक स्वरूपात सुरू आहेत. सकाळी मंद सुवासात पर्यटकांना व्यायाम करता यावा, यासाठी उद्यानात सुगंधी झाडे लावण्याचा निर्णय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीने घेण्यात आला आहे. या सुगंधी उद्यानात देशी आणि विदेशी अशी तब्बल २७ प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. यात बकुळ, लोखंडी, प्राजक्ता, तुळशी, कदंब, वेखंड, दाहमनी आदी झाडांचा समावेश आहे. उद्यानाच्या रचनेनुसार येथे ४५०० झाडे लावण्यात येतील.
रुग्णालयाच्या परिसरातील जमिनीचा पोत चांगला आहे. या मार्गावर प्रभात फेरीसाठी येणारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सुंगधी गार्डनसाठी ही जागा निवडण्यात आली आहे. – विकास गुप्ता, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संचालक