गेल्या काही वर्षात देशातील किरकोळ व्यापारात झपाटयाने वाढ झाली आहे. नागरीकरणांचा वेग वाढला असून बाजारपेठेतील मागणीही तितक्याच प्रमाणात वाढत आहे.
मुंबई- गेल्या काही वर्षात देशातील किरकोळ व्यापारात झपाटयाने वाढ झाली आहे. नागरीकरणांचा वेग वाढला असून बाजारपेठेतील मागणीही तितक्याच प्रमाणात वाढत आहे. ज्यामुळे संघटित किरकोळ बाजारपेठ ४० अब्ज डॉलरवरून २०० अब्ज डॉलपर्यंत वाढेल, असा विश्वास भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नुकताच मुंबईत झालेल्या रिटेलवरील राष्ट्रीय वार्षिक परिषदेत व्यक्त करण्यात आला.
येत्या काही वर्षात किरकोळ व्यापारात विकासाच्या मोठया संधी आहेत. ग्राहकांची मागणी उत्तरोत्तर वाढत जाणार असून ५ ते ७ वर्षात किरकोळ व्यापाराची उलाढाल २०० अब्ज डॉलपर्यंत वाढेल, असे रेअर एंटरप्राइसचे भागीदार आणि या परिषदेतील वक्ते राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले. फुड आणि ग्रॉसरीजबरोबरच फुटवेअर आणि लाइफस्टाइल उत्पादनांना मोठी मागणी असेल, असा अंदाजही त्यांनी या वेळी व्यक्त केला. शेअर बाजारात एफएमसीजी आणि लाइफस्टाइल कंपन्यांच्या शेअरची कामगिरी उंचावली असून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
२०१४ रिटेल क्षेत्रासाठी समाधानकारक गेले. लोकसंख्येत वाढ होत असून त्याचबरोबर त्यांचे दरडोई उत्पन्नही वाढत आहे. ज्याचा फायदा या क्षेत्राला होणार असल्याचे मत या परिषदेला उपस्थित असलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. स्थानिक आणि परदेशी कंपन्यांमुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध झाल्या असून यात अनेक पर्याय आहेत. रिटेलमध्ये परदेशी गुंतवणुकीची नियमावली शिथिल केली असली तरी स्थानिक कंपन्यांच्या उत्पादनांना ग्राहकांची पसंती असेल असे सीआयआय रिटेल कमिटीचे अध्यक्ष जे. सुरेश यांनी सांगितले.