चित्रपटाच्या यशात त्यातल्या गाण्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक सुमार चित्रपटही त्यातल्या गाण्यांमुळे यशस्वी झालेले आहेत. गेल्या आठवडयात संजय जाधव यांच्या ‘तू ही रे’ या चित्रपटाचे संगीत अनावरण झाले. त्यातल्या गाण्यांनी सगळयांनाच मंत्रमुग्ध करून टाकले. त्या वेळी झालेल्या चर्चेत संजय जाधव याच्या गाण्यांच्या निवडीविषयीही ऊहापोह झाला. आपल्या चित्रपटात चांगली गाणी घेणा-या दिग्दर्शकांची एक फार मोठी परंपरा आपल्याकडे आहे. अशा काही दिग्दर्शकांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा…
भारतीय चित्रपटसृष्टीत बोलपट आले व त्यानंतर चित्रपटात संवाद आले. केवळ संवादांच्या आधारावरच मनोरंजन करण्याची आपली परंपरा नव्हती. आपल्या करमणुकीच्या कल्पनेमध्ये संगीताला अनन्यसाधारण असे महत्त्व होते. कोणत्याही साध्यासुध्या कौटुंबिक प्रसंगांमध्येही या संगीताचे, गाण्याचे अस्तित्व होतेच होते. भारताला एका मोठया शास्त्रीय संगीताची परंपरा होती.
अनेक वाद्य व वादक, त्याचप्रमाणे अनेक संगीतकारांची, रागांची परंपरा होती. त्याला जोड होती ती चांगल्या काव्य परंपरेची, छंद, वृत्त यांच्या साधनाने शब्दांची रचना करण्याचं बाळकडूच भारतीयांना होते. ही सारी परंपरा नव्याने हाती गवसलेल्या चित्रपट या माध्यमात येणार नाही असं होणारच नव्हतं.
जस जसं या तंत्राचा विकास होत गेला तस तसं भारतीयांनी आपली खरी ओळख या माध्यमात आणायला सुरुवात केली. चित्रपटात गाणी आली. प्रेक्षकांचीही या संगीताशी लागलीच नाळ जुळली. त्यातून सुरू झाला तो चित्रपट संगीताचा प्रवास.
प्रेक्षक या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देतात हे पाहिल्यावर मग चित्रपटनिर्मितीत संगीत हे अनिवार्य झाले. त्याचा परिणाम चित्रपट क्षेत्रात झालेल्या एका निरोगी अशा स्पर्धेवर झाला. त्यातून मग चित्रपट संगीताचा विकास झाला. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातच हिंदी चित्रपटसृष्टीला कुंदनलाल सैगलसारखा एक मोठा गायक लाभला. त्यानंतरही गाणा-या चांगल्या अभिनेत्यांची परंपरा लाभली व चित्रपट संगीत विकसित होत गेले. स्वातंत्र्यानंतरच्या वा-यांमुळे मग त्यात शास्त्रीय संगीताच्या जोडीला अनेक प्रवाह आले व भारतीय चित्रपट संगीत अधिकच विकसित होत गेले.
आपल्या चित्रपटात कोणत्या प्रकारचे संगीत हवे हे ठरवण्याचा अधिकार मग आपसुकच कॅप्टन ऑफ शिप म्हणून दिग्दर्शकांकडे आला. चित्रपटाच्या सर्वच अंगांवर ज्याप्रमाणे दिग्दर्शकाचं विशेष मत असतं त्याप्रकारेच मग संगीतावरही आलं. काही दिग्दर्शकांनी अगदी रितसर अभ्यास करून आपल्या चित्रपटातलं संगीत अधिक चांगलं कसं होईल हे पाहिलं तर काही दिग्दर्शकांनी अगदी चांगली माणसं निवडली. अनेक प्रयोग केले. काही वेळा धाडसही दाखवलं.
चित्रपटाच्या या संगीत परंपरेत अनेक नावं अग्रक्रमाने घ्यावी लागतील. त्यातही गुरुदत्त, व्ही शांताराम, के.आसिफ, राज कपूर, यश चोप्रा, राज खोसला अशा अनेक दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात नावीन्यपूर्ण संगीत असण्यावर भर दिला. ती परंपरा अगदी आजतागायत सुरू आहे.
करण जोहर, संजय लीला भन्साली, विधुविनोद चोप्रा, राजकुमार हिराणी अगदी गेला बाजार रोहित शेट्टी यांच्यापर्यंत राहिली. ती आणखीही पुढे अशाच प्रकारे चालणार आहे ही देखील समाधानाची बाब आहे. यातही आपल्या प्रेक्षकांना जे आवडतं त्याचबरोबर त्यांना आवडावं असं काही वेगळया प्रकारचं संगीतही देण्यात आलं.
नौशाद यांनी एकदा असं मत व्यक्त केलं होतं की ‘आवाम को जो पसंत है वही ना दिया जाये. आवाम को कुछ अच्छा दे जिसकी उसकी रुचीमे फरक आए’. याच आपल्या उक्तीच्या जोरावर त्यांनी ‘बैजू बावरा’सारख्या चित्रपटात खास शास्त्रीय संगीताचा वापर करून सर्वसामान्य प्रेक्षकांनाही त्यांच्याशी जोडून घेतले होते. के. आसिफ यांनी आपल्या मुगल-ए- आझम या चित्रपटातही संगीताला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले होते.
या चित्रपटातल्या एका एका गाण्यासाठी त्याने अनेक वेळा बैठका घेतल्या. आपल्या नेहमीच्या संगीतकारापेक्षा त्याने खास तो दरबारी पैलू लक्षात ठेवून नौशाद यांना या चित्रपटाचे संगीत दिले होते. त्यावेळी अशा प्रकारचे प्रयोग अगदी सहज केले जात होते. गुरुदत्त यांनीही त्या काळात आपल्या चित्रपटासाठी अनेक गाणी ऐकून त्यातून प्यासा व इतर चित्रपटांतली गाणी निवडली होती.
ज्या काळात फडकत्या गीतांची चलती होती त्या काळात ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’सारखं अगदी संथ लयीतलं गाणं आणून ते यशस्वी करून दाखवण्यामध्ये गुरुदत्त यांचं साहस तर होतंच त्याचबरोबर त्यांची दूरदृष्टीही होती. व्ही शांतारामही आपल्या चित्रपटातल्या एका एका गाण्यांसाठी कष्ट घेत.
संगीतकाराने ऐकवलेल्या अनेक धून ऐकून त्यातून आपल्या मनासारखी धून निवडणे व नंतर त्यावर कायम राहून त्याच्याप्रमाणे ते लोकांसमोर आणण्यामध्ये या दिग्दर्शकांना साहसच होते. अनेक फसलेल्या गाण्यांच्या अपयशाचं खापर ज्याप्रमाणे संगीतकारांवर येते त्याचप्रमाणे ते दिग्दर्शकांवरही येते.
आपल्या चित्रपटांमधून दिसून येणारी प्रयोगशीलता व्ही. शांताराम यांनी आपल्या संगीतातही जपली. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे संगीत हे वेगळे असे. त्यांनीही भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्चात्य संगीताचाही आपल्या चित्रपटात वापर केला. त्यांनी अनेक नव्या वाद्यांचाही वापर केला. आपल्या चित्रपटातल्या प्रसंगानुरूप व कथेचा बाज अधोरेखित होईल अशा प्रकारची गाणी निवडणे हे व्ही. शांताराम यांचे वैशिष्टय़ होते.
व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक अजरामर गाणी भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेली आहेत. राज कपूर यांचा तर संगीताचा अभ्यास होता. ते स्वत: अनेक वाद्यं वाजवू शकत होते. त्यामुळे आपल्या कोणत्याही चित्रपटात त्यांच्या आवडीच्या एका एका वाद्याच अधिक वापर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो.
चित्रपटातलं संगीत तर लोकांच्या लक्षात यावंच त्याचबरोबर या चित्रपटाच्या शेवटी आलेल्या संगीतातून पुढच्या चित्रपटाची ओळख व्हावी किंवा त्याचा फिल यावा असाही प्रयोग राज कपूर करत असत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची साखळी त्यांच्या कालाप्रमाणे जर कधी पाहिली तर ही गोष्ट सहज लक्षात येते. अशा प्रकारचा प्रयोग नंतरही अनेक दिग्दर्शकांनी केलेला जाणवतो.
चित्रपटाच्या संगीताबरोबरच चित्रपटाच्या पार्श्वसंगीतालाही असेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या चित्रपटाचा मूड, प्रत्येक पात्राचे स्वभाववैशिष्टय़ अधोरेखित व्हावीत अशा प्रकारचे त्या पात्राला देण्यात आलेले पार्श्वसंगीत यातून चित्रपटाची खुमारी अधिक वाढत असते. दिग्दर्शक ही गोष्टी अगदी बरोबर हेरतो. त्यातून अनेक चित्रपटांचे पार्श्वसंगीतही आपल्या अगदी सहज लक्षात येते.
गाण्यातून प्रेक्षकांना आनंद देता देताच त्यांना एक आश्र्वयाचा धक्का देणारीही अनेक गाणी दिग्दर्शकांनी वापरली आहेत. त्यात लोकसंगीताचाही वापर झाला, त्याचप्रमाणे अगदी वेगळया पद्धतीचाही वापर झाला. शोले या चित्रपटातलं मेहबुबा ओ मेहबुबा हे गाणं म्हणजे त्या चित्रपटाच्या एकंदरीत रचनेपेक्षा अगदी वेगळं होतं. मात्र तो प्रयोगही यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळाला.
गमनसारख्या चित्रपटातून ‘सिने मे जलन’सारखी एक अप्रतिम गझल प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयोगही असाच. बरसात की रात या चित्रपटात जवळजवळ पंधरा मिनिटांची कव्वाली सादर करण्यात आली, त्यात शास्त्रीय संगीतातले अनेक राग वापरण्यात आले. हा प्रयोगही त्यावेळी प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला होता.
आजही चित्रपटाच्या संगीतात पाश्चात्यसंगीतावर आधारित धून ऐकायला येत असतानाच मध्येच एखादं राधा तेरी चुनरीसारखं खास भारतीय सुरावटीचं गाणंही ऐकायला येते व पुन्हा प्रेक्षक त्यांना भरभरून दाद देताना दिसतात. चांगलं संगीत असलेल्या चित्रपटांनी आपल्याला आतापर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांचा आनंद दिला आहे. वर सांगितलेली उदाहरणं ही त्रोटक स्वरूपातली असली तरी आपल्या सगळयांच्याच मनात अशी अनेक गाणी व अनेक चित्रपट तरंगत असतीलच, त्यांची आठवण या निमित्ताने आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.
कसे असते संगीत
चित्रपटाची कथा तयार होत असतानाच त्यातल्या गाण्यांचे प्रसंग तयार होत असतात. पटकथेत त्या प्रसंगांची खास जागा ठेवण्यात आलेली असते. त्यानंतर दिग्दर्शक आपल्या चित्रपटातल्या गाण्यांची एक योजना तयार करतो. त्याप्रमाणे मग गीतकाराला पाचारण करण्यात येते. त्या प्रसंगानुसार मग गीतकार गाण्यांचे शब्द तयार करतो. त्यानंतर या शब्दांवर संगीतकार आपल्या गाण्यांची चाल बांधतो.
कधी कधी दिग्दर्शक व संगीकार यांनी आपल्या गाण्यांची धून आधीच तयार केलेली असते. त्या धूनवर आधारित शब्द मग गीतकाराला देण्यात येतात. त्या धूनला व चित्रपटातल्या प्रसंगाला साजेसे गीत मग तयार होते. संगीतकारांची प्रतिभा ही अविरत सुरू असते. त्यातून त्यांना अनेक चाली सुचत जात असतात. त्या चाली ते आपल्या पद्धतीने बांधून घेत असतात. अशा तयार झालेल्या चालींसारखा प्रसंग त्यांना दिसला की मग ती चाल दिग्दर्शकाला ऐकवण्यात येते.
सहसा एका गाण्यासाठी दिग्दर्शक अनेक अशा प्रकारच्या धून ऐकतात. त्यातून मग ते आपल्या आवडीच्या गाण्याची निवड करतात. त्याचवेळी गीतकारही आपल्या गीताचे अनेक आराखडे तयार करतात. त्यात अनेक बदल करून मग गीताचे फायनल शब्द तयार होतात. या नंतर या गीतासाठी संगीत संयोजकांना पाचारण करण्यात येते. ते गीताची चाल पाहून त्यानुसार वाद्यांची रचना समजावतात. संगीतकाराच्या बरोबर झालेल्या अनेक बैठकांनंतर या गीतासाठीचे निश्चित असे संगीत संयोजन तयार होते.
आपल्याला एखाद्या गीतात एखादं वाद्य मध्येच ऐकायला येतं. कधी ढोलक तर कधी मध्येच पखवाज ऐकायला येतो. एखाद्या गीतात मध्येच सतारीचे सूर येतात. गाण्याच्या दोन कडव्यांच्या मधली जागा ही संगीताने भरली जाते. ती कशी भरायची त्यासाठी कोणते ताल-सूर व वाद्य वापरायची याचा विचार संगीत संयोजक व संगीतकार करतात. त्यानंतर अर्थातच गायकाचा शोध येतो. त्या गाण्याच्या जातकुळीप्रमाणे आवाजाची पातळी असलेल्या गायकाला मग बोलावलं जातं.
काही काही गाण्यांमध्ये कोरसला महत्त्व असतं. त्याचाही विचार केला जातो. या सा-यांमधून मग हे गाणं शेवटी रेकॉर्डिगला जातं. संगणकाच्या आधी सगळया वादकांना बोलावून नंतर त्यांना गाण्याचं व त्यांच्या वाद्यांचे नोटेशन दिले जाते. त्यानंतर गायकाच्या बरोबरीने हे गाणं रेकॉर्ड केलं जात असे. आता मात्र संगणकामुळे एक एक वादक आपलं नोटेशन वाजवून जाऊ शकतो. त्यानंतर हे संगीत गायकाला ऐकवून त्याच्याकडून गाणं गाऊन घेतलं जातं. साऊंड डिझायनर मग हे सारे तुकडे एकत्र जोडतो व त्यातून एक सुरेख गीत तयार होतं.
किस्सा
व्ही. शांताराम यांच्याविषयीचा एक किस्सा पिंजराचे संगीतकार राम कदम सांगत असत. त्या काळी व्ही. शांताराम कोल्हापुरातून आपली चित्रपटनिर्मिती करत होते. ज्या कलाकाराला काम द्यायचं आहे, त्याची चाचपणी ते तिथे करत असत. त्यासाठी त्या कलाकाराला कोल्हापुरचं रिटर्न तिकीट दिलं जात असे. त्यांच्या मर्यादित वास्तव्याच्या काळात त्यांनी व्ही. शांताराम यांना त्यांचं संगीत ऐकवायचं व नंतर त्यांनी ते फायनल करायचं असा प्रघात होता.
राम कदम यांनाही पिंजराच्या संगीतासाठी असंच बोलावण्यात आलं होतं. अर्थातच, रिटर्न तिकीट देऊन. ते दररोज बापूंना अनेक धून ऐकवत असत. व्ही. शांताराम यांची एक शैली होती, ते काम आवडलं नाही असं तोंडावर सांगत नसत. ज्यांचं काम आवडलं त्यांचं रिटर्न तिकीट रद्द करण्याच्या सूचना ते आपल्या माणसांना देत. या एका वाक्याचा अर्थ असा होई की आता आपल्याला व्ही.
शांताराम यांच्याबरोबर काम करायचं आहे. जर तसा निरोप दिला नाही तर आपलं सामान बांधायचं व परतीची गाडी पकडायची. राम कदम अनेक धून ऐकवत होते तरी एकदाही व्ही. शांताराम यांनी त्यांचं तिकीट कॅन्सल करायला सांगितलं नाही. याचा अर्थ त्यांचं काम त्यांना पसंत पडत नव्हतं. असं करता करता शेवटचा दिवस आला. तरीही त्यांच्याकडून सूचना आली नाही.
राम कदमांना याचं टेन्शन आलं. शेवटच्या रात्री त्यांनी रात्रभर जागून दोन चांगल्या धून तयार केल्या. दुस-या दिवशी सकाळी त्या बापूंना ऐकवल्या. बापूंच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले. यांचं तिकीट कॅन्सल करा. राम कदमांचा जीव भांडयात पडला. व्ही. शांताराम यांना दोन्ही धून आवडल्या होत्या. त्यांनी राम कदमांना एकाच गाण्यात या दोन्ही धून वापरायला सांगितल्या. ते गाणं पुढे अजरामर झालं ते गाणं म्हणजे दे रे कान्हा चोळी लुगडी. या गीताच्या ध्रुपदात एक व अंत-यात एक अशा दोन चाली आहेत.
मुगल-ए-आझम
के. आसिफ जेव्हा मुगल-ए-आझम तयार करत होते तेव्हा त्यांना तानसेनच्या तोंडी शोभेल असा एक आलाप हवा होता. नौशाद यांनी तो आलाप तयार केला होता. के. आसिफ यांनी नौशाद यांना सांगितले की, हा आलाप भारतातल्या सर्वात मोठया गायकाकडून गाऊन घ्यायचा आहे. कोण आहे असं? त्यावर नौशाद म्हणाले की, सध्याचे भारतातले सगळयात मोठे शास्त्रीय गायक आहेत बडे गुलाम अली.
मात्र ते चित्रपटांसाठी गात नाहीत. मात्र के. आसिफ अगदी हट्टाला पेटले. हा आलाप तेच गाणार असं म्हणाले. हे दोघे जण गुलाम अली साहेबांकडे गेले. नौशाद यांनी हा आलाप त्यांना ऐकवला. गुलाम अली यांना त्यांना टाळायचे होते. त्यांनी मानधनाचा आकडा सांगितला तो पंचवीस हजार. नौशाद अगदी चाट पडले. त्या काळात आघाडीचे गायकही एका गाण्यासाठी फार फार तर दीड हजार रुपये घेत होते.
गुलाम अली साहेबांनी मात्र त्यांच्या मैफलीचंच मानधन सांगितलं होतं. नौशाद यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. हट्टाला पेटलेल्या के. आसिफ यांनी मात्र त्यांना पंचवीस हजार देण्याचं कबूल केलं. ताबडतोब त्यांना तिथल्या तिथे दहा हजार रुपये दिले.
दुस-या दिवशी स्टुडिओत गाणं गाण्याआधी पंचवीस हजार रुपये देण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे दुस-या दिवशी गुलाम अली साहेब आले. त्यांना के. आसिफ यांनी पंधरा हजार रुपये दिले. तो आलाप रेकॉर्ड झाला. के. आसिफ यांना तो ऐकवण्यात आला. त्यांनी आपली नापसंती दर्शवली. ते म्हणाले की, हा आवाज फार पहाडी लागला आहे. मला तो मुलायम हवा आहे. बडे गुलाम अली खान साहेबांना असं सांगण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती.
मात्र के. आसिफ दिग्दर्शक होते. मला हवं तसंच गाणं हवं यावर ते अडून बसले. इथे गुलाम अली यांचाही इगो होताच. शेवटी नौशाद साहेबांनी एक कल्पना राबवली, ते गुलाम अलींना म्हणाले की, हा चित्रित करण्यात आलेला प्रसंग आम्ही आपल्याला दाखवतो, त्यानंतर तुम्ही ठरवा की कोणत्या प्रकारचा आवाज हवा ते. त्याप्रमाणे धावपळ करून स्टुडिओत प्रोजक्टर आणण्यात आला.
रिळं मागवण्यात आली. त्यानंतर गुलाम अलींनी तो प्रसंग पाहिला. या कलाकाराचा मोठेपणा असा की त्यांनाही आसिफ काय म्हणताहेत ते कळलं. ते म्हणाले, मी पुन्हा गातो यावेळी तुम्हाला हवा तसा सूर येईल. त्यांनी ते गाणं वेगळया पद्धतीने के. आसिफ यांना हवं तसं गायलं. पुढे ही आलापीही तितकीच प्रसिद्ध झाली.