नर्मदा नदीला मध्य प्रदेशची जीवनदायिनी समजलं जातं. अमरकंटक येथे उगम पावणा-या या नदीचं भेडाघाट येथे वेगळंच रूप पाहायला मिळतं. इथे ती धबधब्याच्या रूपात ‘धुवाधार’ कोसळते आणि मार्बल रॉक्समधून शांत, संथ वाहते. हे दोन्ही नजारे डोळ्याचं पारण फेडणारे असतात.
मध्य प्रदेशला भारताचं हृदय समजलं जातं. काही वर्षापूर्वीपर्यंत भारतातील क्षेत्रफळाने सगळ्यात मोठया असलेल्या या राज्यात अनेक निसर्ग आणि मानवनिर्मित पर्यटन स्थळं आहेत. इथलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे नर्मदा नदी. भारतातल्या पाच प्रमुख नद्यांमध्ये समावेश असलेली नर्मदा अमरकंटक येथे उगम पावते. तिथून मध्य प्रदेशला समृद्ध करत महाराष्ट्र, गुजरात राज्यांतून १३०० किलोमीटरचा प्रवास करत ती अरबी समुद्राला मिळते. नर्मदेला मध्य प्रदेशमध्ये माता म्हणजे आई या विशेषणाने संबोधलं जातं. ओंकारेश्वर येथून नर्मदेची परिक्रमा करता येते. गोनिदांनी आपल्या ‘भ्रमणगाथे’त या ३ हजार किलोमीटरच्या नर्मदा परिक्रमेचं नितांतसुंदर वर्णन केलं आहे.
अमरकंटक येथे उगम पावल्यावर संथ, शांत लयीत वाहणारी ही नर्मदा वेगळंच रूप धारण करते भेडाघाट येथे आल्यावर. भेडाघाट या नावावरून हा एक घाट असल्याचं लक्षात येतं. घाट म्हणजे लोक वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात तो नदीकिना-याचा भाग. मोठया नद्यांच्या किनारी असे अनेक घाट पाहायला मिळतात. अनेक नद्यांवर पक्के घाटही बांधलेले दिसतात. नर्मदेवरही असे अनेक घाट आहेत. त्याच मालिकेतला एक भेडाघाट. जबलपूरहून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भेडाघाटमध्ये नर्मदा नदीची शांत आणि विक्राळ अशी दोन्ही रूपं पाहायला मिळतात. ही नदी इथे धबधब्याच्या रूपाने ५० फूट खोल कोसळते आणि मार्बल रॉक म्हणजे संगमरवराच्या डोंगरांमधून नीरव वाहते. यातल्या धबधब्याला ‘धुवाधार’ या नावाने ओळखलं जातं. या नदीचं पाणी इथे इतक्या वेगाने खाली कोसळतं की, तिचे तुषार दूरवर उडतात. विशेषत: पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहत असते तेव्हा धबधब्याच्या परिसरात धुकं पसरल्यासारखं वातावरण असतं. त्यामुळेच या धबधब्याला असं नाव पडलं आहे. तसं कधीही गेलं तरी थोडयाफार फरकाने हे धुवाधार दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतं. हा धबधबा ओलांडून पलीकडच्या काठावर जाण्यासाठी अलीकडे तिथे रोप-वेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
धबधब्यात फेसाळत कोसळल्यावर नर्मदा पुन्हा शांत होते. त्यानंतर ती प्रवास करते मार्बल रॉकमधून. नर्मदेच्या दोन्ही बाजूंना हे संगमरवराचे पर्वत उंच भिंतीसारखे उभे आहेत. घाटावर वल्ह्यांच्या नावा घेऊन असलेले नावाडी आपल्या या नदीची काही किलोमीटपर्यंत म्हणजे जवळजवळ धुवाधार धबधब्यापर्यंत सैर करून आणतात. अर्थात, तुम्ही नावाडयाला किती पैसे देणार? यावर अंतर ठरतं. ही संपूर्ण होडी घेतल्यास त्याचे बाराशे रुपये मोजावे लागतात. या होडीत आठ-दहा माणसं बसू शकतात. एकटयाने असलेल्या पर्यटकांना शंभरेक रुपयात हा जलविहार घडतो. सिझनप्रमाणे दर कमी-जास्तही होतो. घाटावर नावांची भरपूर संख्या असल्याने गर्दी असली तरी पटकन नंबर लागतो. या संगमरवरी डोंगराचं वैशिष्टय़ म्हणजे ते सफेद, निळे, पिवळे, काळे अशा वेगवेगळ्या रंगाचे आहेत. त्यामुळे या रंगीबेरंगी संगमरवरी डोंगरातून नदीची सैर करणे हा अद्भुत अनुभव असतो. विशेषत: रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात चमकणा-या डोंगरांचा नजारा नेत्रदीपक असतो. त्यामुळे इथे पौणिमेच्या रात्री नदीतून सैर करण्यासाठी इथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
या जलसफर गमतीदार करतात ते इथले नावाडी. प्रत्येक बोटीत साधारणपणे तीन नावाडी असतात. त्यातले दोन नाव वल्हवण्याचं काम करतात तर एक गाइडची भूमिका बजावत या जलसफरीत लागणा-या सगळ्या ठिकाणांची माहिती देतो. त्यांची ही कथनशैली अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असते. तिच्यात विनोद, काव्य, गेयता असे अनेक रस असतात. उदाहरणार्थ, इथे अमुक एका चित्रपटाचं शूटिंग झालंय, हे सांगताना हा नावाडी कम गाइड सांगतो, ‘फिल्लम मे थी रे२२२खा, किसीने नही दे२२२खा’ ही कॉमेंट्री तुम्ही कुठे शिकलात, असं विचारल्यावर त्यांच्यातल्या एकाने सांगितलं, ‘आमचे एक गुरू होते. त्यांनीच ही सगळ्यांना शिकवलीय.’ कुठल्याही बोटीत बसलं तरी तुम्हाला अशाच प्रकारची कॉमेंट्री ऐकायला मिळते.
भेडाघाटमधलं आणखी एक बघण्यासारखं ठिकाण म्हणजे इथलं चौसष्ठ योगिनी मंदिर. या मंदिरात योगिनी म्हणजे योगाच्या वेगवेगळ्या अवस्थेत असलेल्या स्त्रीप्रतिमा आहेत. या चौसष्ठ योगिनी ६४ तंत्रशक्तींचं प्रतीक आहेत, असंही म्हटलं जातं. यातल्या काही मूर्ती मोडतोड झालेल्या अवस्थेत आहेत. भारतात खजुराहोसारख्या इतर काही ठिकाणीही ६४ योगिनी मंदिरं असली तरी भेडाघाटमधलं मंदिर सर्वात मोठं योगिनी मंदिर आहे. या गोलाकार मंदिराचा बाह्य व्यास १३१ फूट असून त्यात ८४ चौकोनी स्तंभ आहेत. या मंदिरात एकूण ८१ लहान लहान दालनं असून त्यात योगिनींच्या मूर्ती आहेत. तसंच मंदिराला तीन प्रवेशद्वारं आहेत. योगिनी संप्रदाय नवव्या ते बाराव्या शतकापर्यंत लोकप्रिय होता. इथे असलेल्या शीलालेखावरून कलचुरी राजा नरसिंहाची आई आल्हानादेवी हिने बाराव्या शतकात हे मंदिर बांधलं. त्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत या मंदिराचा वापर होत होता. त्यानंतर हा संप्रदाय नामशेष झाल्यावर मंदिरंही गडप झालं. एकोणिसाव्या शतकात लॉर्ड कनिंगहॅमने त्याचा शोध लावला. हे मंदिर पाहून योगिनी या गूढ पंथाविषयी उत्सुकता अधिक वाढली. मात्र, या मंदिराविषयी माहिती द्यायला कुणी नव्हतं.
भेडाघाटमध्ये फिरताना संगमरवराच्या वस्तूंची विक्री करणारी अनेक लहानमोठी दुकानं दिसतात. परंतु, गंमत अशी की, इथे संगरवराचे डोंगर असले तरी इथे संगमरवराचं उत्पादन होत नाही. त्यामुळे या वस्तू इथे बनत नाहीत. तरीही पर्यटक या वस्तू खरेदी करताना दिसतात. असं हे भेडाघाटचं निसर्गसौंदर्य मनाला जसं भुरळ घालणारं आहे, तसंच तिथलं चौसष्ठ योगिनी मंदिर पुरातत्त्व महिमाही अधोरेखित करणारं आहे.