भारताला संत, महात्म्यांची एक उज्ज्वल परंपरा आहे. त्यामुळेच अंत्यजांना पोटाशी कुरवाळणारे एकनाथ महाराज असो की अन्य संतमंडळी ही कायम समाजमनात आपल्या आध्यात्मिक बळावर मार्गदर्शन करीत राहिलेली आहेत. त्यामुळे दक्षिणेकडची आळूमाळू संतांची परंपरा असो की महाराष्ट्रासह उत्तर भारतातील कबीर, रविदास नंतरचे नामदेव यांनी माणसांना अनिष्ट रूढी, परंपरांपासून कायम ‘शहाणे’ करण्याचेच काम केलेले आहे. संत होणे म्हणजे षड्रिपू गळून पडणे. पण गेल्या काही वर्षात भारतात बाबा, महाराज, बापू आदींचे पेव फुटले आहे. ही मंडळी त्यांच्याप्रमाणे समाजाला वाकवण्याचा प्रयत्न करीत असतात. सामान्य माणसाचा देवभोळेपणा हेरून त्यावर आध्यात्म्याची चांगलीच पखरण करून ते माणसांना कामाला लावतात. यात काही चांगल्या पद्धतीने भक्तांना सत्मार्गाला लावणारेही आहेत. पण त्यांची संख्या अतिशय कमी आहे. हे नमणाला घडाभर तेल वाहण्याचे कारण म्हणजे, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या श्री. श्री. रविशंकर यांनी सुरू केलेल्या ‘हट्टयोगा’चे.
रविशंकर हे व्हाईट कॉलर मंडळींना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मधून आध्यात्माचे धडे देत असतात. प्राणायम केल्याने माणसाचे आरोग्य कसे सुदृढ राहू शकते, हे सांगण्याकडे त्यांचा भर असतो. अशा त्यांच्या ‘भरीव’ कामाची दखल केंद्र सरकारने घेतलेली आहे. वर सांगितल्याप्रमाणे आध्यात्माचा अभ्यास करणा-याचे षड्रिपू गळून पडतात. ते नि:संग होतात. पण रविशंकर यांना त्याचाच विसर पडला आहे, असे काहीसे वातावरण त्यांनीच निर्माण केले आहे. रविशंकर यांचा वावर समाजातील सर्वच स्तरावर आहे. देशातील व्हीआयपी आध्यात्मिक गुरूंमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळेच त्यांचा शिष्यवृंदही तितकाच मोठा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. अशा या रविशंकर यांचा शुक्रवारपासून दिल्ली येथील यमुना किना-यावर एक आध्यात्मिक महोत्सव नुकताच पार पडला आहे. या महोत्सवासाठी काही लाख भाविक येणार असल्याने तसेच त्यांच्यासाठी दिल्लीत सध्याच्या घडीला मोठी साजेशी जागा नाही. यासाठी रविशंकर यांनी थेट यमुना तीराची निवड केली होती. या महोत्सवाच्या निमित्ताने रविशंकर यांच्या संस्थेने पर्यावरणाचे उल्लंघन केले. त्यामुळे केंद्रीय हरीत लवादाने त्यांना ५ कोटींचा दंड ठोठावला आहे. पण रविशंकर यांनी हा दंड भरण्यास नकार दिला आहे. ‘प्रसंगी कारागृहात जाण्याची माझी तयारी राहील. मात्र, लवादाने(एनजीटी) ठोठावलेला दंड भरणार नाही’ अशी हट्टाग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांचे भक्त रविशंकर यांच्या भूमिकेमुळे सुखावले असतील. पण लोकशाही प्रणालीत राहणा-यांसाठी काही नियम, कायदे आहेत. त्याचे पालन प्रत्येकानेच करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास ते कायदा मोडणा-यांच्या यादीत जातात. कायदा मोडणा-यांना समाजात फारसा मान नसतो. त्यात रविशंकर यांनी जाऊ नये.
यमुना नदीचे पात्र पूरप्रवण क्षेत्र आहे. त्यात असा महोत्सव भरवणेच मुळात चुकीचे आहे. भारत हा नदीला माता मानणारा देश आहे. त्यामुळेच की काय गंगानदीला ‘गंगामाय’.. ‘गंगामय्या’ असेही म्हटले जाते. भारतात पूर्वी मातृसत्ताक व्यवस्था होती. या व्यवस्थेत नदीकिनारी अनेक वस्त्या वसलेल्या होत्या. नदीच्या पाण्यामुळे आजूबाजूचा परिसर सुपिक होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. देशातील अनेक नद्या दूषित झालेल्या आहेत. त्यांना गटारगंगेची अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळेच मोदी यांनी गंगा नदी शुद्धीकरणासह देशातील नद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यमुना ही उत्तरेकडची महत्त्वाची नदी. दिल्ली, हरियाणा आदी प्रदेशातून ती वाहते. पण गेल्या काही वर्षात या नदीची अवस्थाही देशातील इतर नद्यांसारखी झाल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे या नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणा-यांकडून रविशंकर यांच्या महोत्सवाला विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रीय हरीत लवादाने श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेला हा दंड ठोठावला आहे.
रविशंकर हे इतर महाराजांसारखे फारसे वादग्रस्त नाहीत. ते आणि त्यांचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ इतक्या परिघापुरते त्यांचे कार्यक्षेत्र आहे. अनेकदा काही सामाजिक संस्थांसाठी मदतीचा हातही त्यांनी पुढे केला आहे. ही त्यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्यायोगीच आहे. पण त्या पलीकडे समाज म्हणूनही समाजासाठी असलेल्या नियम कायदेकानून यांचेही पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच नाही का? त्यातून रविशंकरही सुटू शकत नाहीत. या महोत्सवाची तयारी सुरू झाली तेव्हापासूनच तो वादग्रस्त ठरला. लष्कराच्या मदतीने यमुना नदीवर तात्पुरता पूल बांधून घेताना त्यांनी कदाचित केंद्रात आपले ‘वजन’ वापरले असेल, पण असे करताना देशासाठी लढणा-या जवानांचा वापर खासगी कार्यक्रमासाठी करणे कितीसे संयुक्तिक? याचाही विचार होण्याची गरज आहे. सैन्याचे काम हे देशाचे रक्षण करणे व नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावून जाणे, देशात अराजकसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास त्या त्या यंत्रणांना मदत करणे हे आहे. पण केंद्रातील मोदी सरकारला कदाचित सैनिकही, सुरक्षेच्या दृष्टीने ठेवलेले व घरगडय़ासारखे राबणारे पोलीस वाटलेत का? भारत हा सर्वधर्मसमभाव मानणारा देश आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीला उपासनेचा अधिकार आहे. पण त्यासाठी नियम, कायदे तोडणे योग्य नव्हे? रविशंकर यांनी दंड न भरण्याचा हट्ट सोडला नाही तर त्याचेच पालन त्यांचे भक्तही करतील. ते कोणासही मानवणारे नाही. त्यामुळे रविशंकर त्यांनी तातडीने आपला ‘हट्टयोग’ सोडला पाहिजे.