कोकणच्या निसर्गरम्य भूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात समुद्रकिनारी वसलेले छोटेसे गाव म्हणजे पाल होय. वेंगुर्ले शहरापासून केवळ नऊ कि. मी. अंतरावर हे गाव आहे.
पाल – कोकणच्या निसर्गरम्य भूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात समुद्रकिनारी वसलेले छोटेसे गाव म्हणजे पाल होय. वेंगुर्ले शहरापासून केवळ नऊ कि. मी. अंतरावर हे गाव आहे. निसर्गाचा वरदहस्त असलेले हे गाव ग्रामपंचायत, शाळा, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, वाहतूक व अन्य सोयीसुविधांनी परिपूर्ण आहे. येथील लोकांचे शेती हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. शेती आणि आंबा-काजू फळबागायती ही शेतीमधील मुख्य उत्पादने असून खरिप हंगामात भात (तांदूळ) उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
तर रब्बी हंगामात मिरची, भुईमूग, नाचणी, चवळी, उडीद, कुळीथ ही उत्पादने शेतकरी घेतात. याबरोबर नारळ, कोकम यांचेही उत्पादन आहे. श्रमदानातून कच्चे बंधारे उभारून व शेतविहिरींच्या पाण्याचा वापर करून शेतकरी बागायती शेती करीत आहेत. कृषी विकासाला श्रमदानाची जोड मिळत असल्यामुळेच हे गाव समृद्ध बनले आहे.
पाल ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जमिनीचा वापर जास्त प्रमाणात शेतीसाठी केला जातो. शेतकरी बागायतीमधूनही उत्पन्न घेत आहेत. पावसाळ्यात भात, नाचणी ही पिके घेतली जातात. तर उन्हाळी हंगामात भाजीपाला, मिरची लागवड, भुईमूग लागवड केली जाते. यांच्या जोडीला आंबा, काजू, नारळ, कोकम आदी फळांचेही उत्पादन घेतले जाते. गावात प्रदूषण होणार नाही या बाबतीत ग्रामस्थ जागरूक आहेत. म्हणूनच या गावाला २००९ साली सरकारचा ‘निर्मलग्राम पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गावातील ही निर्मलता ग्रामस्थांनी आजही टिकवून ठेवली आहे.
गावात सार्वजनिक विहिरी २१, खासगी विहिरी १४ असून पाच विंधनविहिरी आहेत. गावाला सरकारच्या विविध पुरस्कारांमधून सुमारे ३ लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. या पैशाचा विनियोग ग्रा. पं. ने गावात सौरदीप बसविणे व वैयक्तिक बक्षिसे देण्यासाठी केला आहे. २००५ मध्ये गावाला विमा ग्राम पुरस्कार, २००८ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला असून तंटामुक्त गाव करण्याचा पहिला मान तालुक्यातून या ग्रामपंचायतीला मिळाला आहे.
गावात ऊर्जेबाबत जागृती आहे. येथे बायोगॅस व धूर न येणा-या चुलींचा स्वयंपाकासाठी जास्त प्रमाणात वापर केला जातो. गावातील महिला बचत गटांमार्फत खाद्यपदार्थ, भाजीपाला लागवड, काजू युनिट, फळ प्रक्रिया युनिट चालवून त्यातून उत्पादन व विक्री करून येथील महिला सक्षम बनत आहेत. ग्रामस्थही आपली संस्कृती व कला जोपासणारे आहेत. म्हणूनच गावात नाटके, विविध कार्यक्रम सादर होतात. तसेच युवक मंडळांमार्फत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर, श्रमदान आदी समाजोपयोगी उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. गावातील श्री खाजणादेवी मंदिर प्रसिद्ध आहे. येथे वार्षिक जत्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होतो. याव्यतिरिक्त श्री भूमिका देवी मंदिर, श्री कुलदेव मंदिर व श्री गावडेश्वर मंदिर अशी मंदिरे प्रसिद्ध आहेत.
त्याचप्रमाणे श्री खाजणादेवी विद्यामंदिर, श्री देव कलदेव विद्यामंदिर, श्री देव झेंडोबा विद्यामंदिर, पाल बालवाडी (टेंबवाडी) अशा शाळा कार्यरत आहेत. गावात गोडावणेवाडी, वादळवाडी, खाजणवाडी, देऊळवाडी, कदमवाडी, घाडीवाडी, परबवाडी, टेंबवाडी, धाऊसवाडी, तळेबांधवाडी, काथरवाडी, मिरखोलकरवाडी, खालचीवाडी अशा वाडय़ा आहेत. या कृषी संपन्न गावातून अणसूर नदी वाहत असून ती अरबी समुद्राला मिळते. या ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती नयनी पालकर, उपसरपंच रामदास परब, सदस्य प्रसाद गावडे, सुप्रिया गावडे, रूपाली गावडे, ग्रामसेवक राजेश परब तर तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून सावळाराम गावडे काम पाहत आहेत. हे सर्व जण ग्रामस्थांना एकत्र घेऊन गावविकासासाठी प्रयत्न करत आहेत. या गावातील वैशिष्टय़ म्हणजे येथील अणूसर पाल हायस्कूलच्या स्थापनेपासून आजपर्यंत दरवर्षी दहावीचा निकाल १०० टक्के लागण्याची परंपरा आहे.
दृष्टिक्षेपात पाल..
पाल ग्रा. पं. स्थापना : १९५९
एकूण लोकसंख्या : १४७३
गावाचे क्षेत्र : ६५७-७७-८८ हेक्टर
लागवडीखाली क्षेत्र : ४३०-००-०० हे.