शेतजमीन कशीही असली तरी जिद्द, प्रयत्नांतील सातत्य, अभ्यासू वृत्ती, चौकसपणा आणि त्यांना कष्टाची जोड दिली की शेती व्यवसायात यशस्वी होता येते. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील वनिता आणि मुरलीधर गुंजाळ या दांपत्याने हे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. पारंपरिक पिकाऐवजी शतावरीसारख्या अपारंपरिक भाज्यांसारखी गुणवत्तावर्धक व फायद्याची पिके त्यांनी घेतली. २००५ साली सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना एन.जी. रंगा कृषिभूषण हा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
पुणे जिल्ह्यातील कांदळी हे पाच हजार लोकवस्तीचे लहानसे खेडे. शेती हाच येथील प्रमुख व्यवसाय. त्याला पशुसंवर्धनाची जोड. मात्र गुंजाळ दांपत्य शेती व्यवसायात अपघातानेच आले. आठवी पास एवढेच दोघांचे शिक्षण. १९९६ मध्ये मुरलीधर मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरीला होते. कंपनीत संप झाला नि त्यांची नोकरी गेली. १९९८ मध्ये त्यांनी शेती करायची हे ठरवले. त्यांच्याकडे जेमतेम ४.५ एकर शेतजमीन. तीही सरासरी दर्जाची. सर्वप्रथम त्यांनी पुस्तकांतून माहिती मिळवून कारली आणि टोमॅटो यांची शेती करण्यास सुरुवात केली. यासाठी ते आवश्यकता पडल्यास इतरांकडूनही मार्गदर्शन घेत असत. मात्र बाजारभावाचा मेळ न बसल्याने पहिल्याच प्रयत्नांत त्यांना २२,००० रुपयांचा तोटा झाला. साहजिकच सर्वानी शेती सोडण्याचा त्यांना सल्ला दिला. त्यानंतर तीन महिने शेतीत काहीच केले नाही. या काळात त्यांनी ४५ शेतक-यांच्या मुलाखती घेतल्या. ते काय उत्पादन घेतात, कुठच्या बाजारपेठेत आपला माल विकतात, याचा अभ्यास केला. यातून त्यांना बरेच काही शिकायला मिळाले.
यशाची चार सूत्रे
- बाजारात जे विकले जाते, तेच पिकवले पाहिजे
- पॅकिंग, ग्रेडिंग केले पाहिजे
- आपल्या उत्पादित मालाचा दर ठरवता आला पाहिजे
- उत्पादनखर्च जेवढा कमी, तेवढा नफा जास्त
शेतीतील हीच चारसूत्री प्रणाली त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणली. याचदरम्यान विदेशी भाजीपाला यासंबंधी एक लेख त्यांनी वाचला. यातूनच त्यांनी शतावरी (अस्पॅरॅगस) या भाजी पिकाची लागवड करायचा निर्णय घेतला. मार्केटिंगमध्ये स्वत: लक्ष घातले. यात अडचणीही आल्या. तरीही मध्यस्थामार्फत फाइव्ह स्टार हॉटेलला शतावरीचा पुरवठा सुरू केला. हॉटेल प्रति किलो शतावरीस २४० रुपये देत असे. आम्हाला मात्र ९० रुपये प्रति किलो असा दर मिळे. यातून महिन्याला २२ ते २४ हजार रुपये मिळत असत, असे गुंजाळ यांनी सांगितले.
याच काळात विदेशी भाज्यांविषयी माहिती मिळाली. त्या वेळी तीन कंपन्या अशा भाजी उत्पादन क्षेत्रात कार्यरत होत्या. मात्र त्या माहिती द्यायला तयार नव्हत्या. सर्वसामान्य शेतक-यांकडे या भाज्यांचे उत्पादन घेतले जात नव्हते. योगायोगाने बंगळूरुच्या एका शेतक-याकडून ही माहिती मिळाली. एक-एक गुंठा क्षेत्र निवडून प्रयोग सुरू केला. या भाज्यांची त्या वेळी नावेही माहिती नव्हती. शतावरी, पार्सल, बेसिल, लिक, चायनिज कॅबेज या भाज्यांचे हळूहळू उत्पादन सुरू केले. पुढे भाज्यांचे २०-२२ प्रकार सुरू झाले. ‘ग्रीन पल्लवी’ या ब्रँडनेमने भाज्या विकायला सुरुवात केली. गोवा, मुंबई येथील फाइव्ह स्टार हॉटेलला माल विकायला सुरुवात केली. यश मिळत गेले. आज भरपूर मागणी आहे. आता आम्हीच उत्पादनात कमी पडतो, असे ते म्हणाले.
एका कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भाज्या पाहिल्या. दुस-या दिवशी त्यांनी थेट शेतावरच भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांनी आमच्या या शेती प्रयोगाची दखल घेतली. २००४ साली महाराष्ट्र सरकारने जिजामाता कृषिभूषण पुरस्कार दिला. २००५ला भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) वैविध्यपूर्ण शेतीसाठी त्यांना एन.जी. रंगा पुरस्काराने गौरवले. केंद्रीय विज्ञान व तंत्रविज्ञान विभागाच्या राष्ट्रीय नवप्रवर्तन फौंडेशनने आमच्या प्रयत्नांची नोंद घेतली. त्यांच्या आग्रहामुळे आम्ही अन्य शेतक-यांना माहिती द्यायला विविध प्रदर्शनांत येतो. इतर शेतक-यांनीही आपली आर्थिक स्थिती सुधारावी हाच यामागे उद्देश असल्याचे मुरलीधर गुंजाळ यांनी सांगितले. गुंजाळ यांचा नागपुरात झालेल्या कृषी वसंत या प्रदर्शनात स्टॉल लागला होता. नवप्रवर्तक शेतकरी म्हणून त्यांना ‘आयसीएआर’ने निमंत्रित केले होते.
उत्पादनाचे नियोजन, मार्केटिंग याची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझी पत्नी वनिता ही उत्पादनातील अन्य बाबी, मजुरी देणे हे व्यवहार सांभाळते. तुषार, ठिबक सिंचन, जैविक कीटकनाशके-बुरशीनाशके, जीवामृत, बीजामृत, गांडूळखत अशी आमची शेती पद्धत आहे. खर्च वजा जाता महिन्याला ४०-५० हजार रुपये मिळतात. – मुरलीधर गुंजाळ, प्रयोगशील शेतकरी